मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून राजकारण रंगताना दिसत आहे. दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी प्रकल्पग्रस्त आग्रही आहेत. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी शिवसेना नेते आक्रमक झाले आहेत. याच मुद्द्यावर भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली.
या विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे या मागणीकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने गुरुवारी, १० जून रोजी सकाळी १०वा. रायगड ते अगदी मुंबईपर्यंत मानवी साखळी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज ठाकरेंची भेट घेत विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली. “नवी विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी आमची जुनी मागणी आहे. या मागणीला घेऊन २४ जूनला आम्ही सिडकोला घेराव घालणार आहोत. या आंदोलनाची आणि आमच्या मागणीची राज ठाकरे यांना माहिती दिली. मनसेची राज ठाकरेंची काय भूमिका आहे हे तेच स्पष्ट करतील,” असे प्रशांत ठाकूर म्हणाले.
यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. “नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी आहे. तर बाळासाहेबांचं नाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यातून संघर्ष होत असून पाठिंबा मागण्यासाठी माझ्याकडे प्रशांत ठाकूर आले होते. महाराजांचं नाव देणार असतील तर आम्ही विरोध करणार नाही असं प्रशांत ठाकूर म्हणाले आहेत,” असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
पुढे ते म्हणतात,"प्रशांत ठाकूर माझ्याकडे येऊन गेले. नवीन होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याची त्यांची मागणी आहे. सरकारची भूमिका आहे बाळासाहेबांचं नाव देण्याची, त्याच्यातून हा संघर्ष सुरु आहे. मोर्चे, धरणं सुरु आहे. माझा पाठिंबा घेण्यासाठी ते आले होते. मी वस्तूस्थिती समोर ठेवली. कोणतंही विमानतळ येतं, ते शहराबाहेर येतं. तेव्हाची मुंबई पकडली, ते विमानतळ सांताक्रूझला गेलं. त्यावेळी मुंबई विकसित झालेली नव्हती. मग वाढवत ते सहारपर्यंत गेलं आणि मग त्याला सांताक्रुझ विमानतळ आणि सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्यात आले. मागे जेव्हा असं विमानतळ बनवायचं ठरलं, जीव्हेकेंना मी विचारलं हे कसलं विमानतळ आहे. त्यांनी माहिती दिली होती, आताचं विमानतळ आहे ते डोमेस्टिक असेल, आणि ते विमानतळ आंतरराष्ट्रीय असेल. आता जे विमानतळ नवी मुंबईत होत असलं तरी ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुनच टेक ऑफ होणार आहे. त्यासाठी शिवडी-न्हावाशेव रोड होत आहे. ते मुंबई आंतराराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळेच त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव राहणार", अशी स्पष्ट भूमिका राज ठाकरेंनी घेतली आहे. त्यामुळे मनसेच्या या भूमिकेवर राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.