मुंबई : राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्राने देशातील अग्रस्थान कायम राखले आहे. विशेष म्हणजे, राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५० लाखांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो.
राज्याच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे. लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र सुरूवातीपासून देशात आघाडीवर असून त्यामध्ये सातत्य कायम राखले आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात २ कोटी, ७ हजार, ७० नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या सुमारे ५० लाख, ८ हजार, ४७६ एवढी आहे. महाराष्ट्र पाठोपाठ उत्तर प्रदेशात २ कोटी, १५ लाख, ६५ हजार, नागरिकांना लस देण्यात आली असून गुजरातमध्ये १ कोटी, ९१ लाख, ८८ हजार नागरिकांचे, तर राजस्थानमध्ये १ कोटी, ८४ लाख, ७६ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे.