वनवासी पोरका झाला...

    09-May-2021
Total Views |

आप्पा बर्वे_1  


रा. स्व. संघाचे प्रचारक, विद्यार्थीप्रिय शिक्षक तसेच वनवासी कल्याण आश्रमाचे पूर्णवेळ कार्यकर्ते भालचंद्र वासुदेव बर्वे ऊर्फ बापू (आप्पा) बर्वे यांचे दि. १० एप्रिल रोजी निधन झाले. बर्वे यांना गुरुतुल्य मानणार्‍या गिरीश जोशी यांनी आप्पांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा...


मागील महिन्याच्या (एप्रिलच्या) शनिवारी १० तारखेला विनायकचा फोन आला, “आप्पा बर्वे गेले.” मनात दुःख दाटून आले नाही की डोळ्यात अश्रू तरळले नाहीत. कारण, अशी व्यक्ती जाऊच शकत नाही, ती अमर्त्य आहे, चिरंजीव आहे. यम आला न्यायला तरी नेणार कसा? कारण, आप्पा अनेकांच्या हृदयात घर करून बसले आहेत. बातमी ऐकली आणि मन मात्र अनेक वर्षे म्हणजे ६५-७० वर्षे मागे गेले. जुन्नरला! पुणे जिल्ह्यातील तालुक्याचे १२-१५ हजार वस्तींचे, शिवनेरीच्या पायथ्याशी वसलेले गाव. आमचे गाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान, याचा आम्हाला कोण अभिमान. आजही अभिमानाने सांगतो सर्वांना, आमचे बालपण आणि शालेय शिक्षण येथे झाले.



आम्ही बाल असल्यापासूनच शाखेचे स्वयंसेवक होतो. प्राथमिक शाळेचा शेवट आणि माध्यमिक शाळेची सुरुवात असा तो काळ होता आणि एक दिवस अचानक एक तरुण, माझ्यापेक्षा आठ ते नऊ वर्षांनी मोठा, संघस्थानावर आला. तो तरुण म्हणजे हे आप्पा! सर्व जण त्यांना ‘बापू बर्वे’ किंवा ‘वनवासी बापू’ या नावाने ओळखतात, पण आमचे सर्वांचे ‘आप्पा’च आहेत. उंची फक्त ५-५.२५ फूट. व्यायामाने कमावलेले पिळदार शरीर. हसतमुख तरी करारी तेजस्वी चेहरा. सर्वांना आकर्षित करणारे असे ते व्यक्तिमत्त्व. हा हा म्हणता म्हणता, प्रत्येकाला त्यांनी आपलेसे करून घेतले. असे हे आप्पा म्हणजे एक उत्साही व्यक्तिमत्त्व! सर्व कार्यक्रमांमध्ये अतिशय उत्साहाने भाग घेत. आम्हा सर्व मुलांना त्यात सहभागी करून घेत. सर्वांना मदतीचा हात देऊन उत्तम सहजीवनाची व एकमेकांना सहकार्य करण्याच्या वृत्तीची बीजे आमच्या जीवनात आपोआप पेरली गेली. उर्वरित जीवनात सगळ्यांनाच त्याचा खूप फायदा झाला.

काही माणसे अशी असतात की, ती आपल्या संपर्कात आली की कायमची आपल्या घरची होऊन जातात. आप्पा तर आमच्या प्रत्येक स्वयंसेवकाच्या हृदयातच येऊन वसले. शाखा बहरू लागली. जुन्नरमध्ये एकाच्या चार शाखा झाल्या. अनेक नवीन स्वयंसेवक निर्माण झाले, जोडले गेले. पुरुषोत्तम, जो वाया गेलेला मुलगा म्हणून ओळखला जायचा, त्याचे पूर्ण परिवर्तन झाले आणि नंतर तो चक्क शाखेचा शिक्षक झाला. जुन्नरची माध्यमिक शाळा शाखामय झाली. अरुण, तीन-चार चंदू, पद्माकर, अशोक, पुरुषोत्तम, प्रल्हाद, विनायक, दत्ता, बंडू, बबन किती नवे घेऊ, एकमेकांचे चांगले मित्र झाले ते आजतागायत, आजन्म...

आप्पा यांचे हुतुतू, खोखो यांसारख्या अनेक खेळांत प्रावीण्य होते. आमची शाळा आंतरशालेय स्पर्धेमध्ये नारायणगावच्या सबनीस शाळेकडून अंतिम सामन्यात नेहमी हरायची. आप्पांनी चंग बांधला की, यावर्षी जिंकायचेच! शाळेच्या टीमची खूप मेहनत करून त्यांनी तयारी करून घेतली. प्रल्हाद आमचा तगडा हुतुतू पटू. त्याच्यावर सर्व भिस्त होती. ती त्याने सार्थ ठरवली आणि शाळेला प्रथमच हुतुतूची ढाल मिळवून दिली. आप्पांनी त्याला खांद्यावर घेऊन गावात मिरवणूक काढली. माझ्या शरीरयष्टीला हुतुतू खेळ मानवणारा नव्हता. पण, खोखोत माझी चांगली तयारी करून घेतली आप्पांनी आणि त्यामुळे शाळेपासून ते इंजिनिअर होऊन कॉलेज संपेपर्यंत दरवर्षी शाळा-कॉलेजकडून खोखो खेळलो. शाखेत दत्ता हुतुतू खेळण्यात पटाईत होता. उलटी लाथ मारून गडी बाद करण्यात पारंगत होता. एके दिवशी त्याची तो उलटी लाथ माझ्या मध्यभागी बसली आणि मी वेदनेने कोसळलोच. आप्पांनी मोठ्या भावाप्रमाणे मला चक्क मांडीवर घेऊन माझे सांत्वन केले, मला धीर दिला, तो प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही. असे प्रेमळ होते आप्पा... कोणी आजारी पडला, बरं नसेल तर त्या स्वयंसेवकाच्या घरी जाऊन त्याची सेवा विचारपूस आप्पांनी केली नाही, असे कधीच झाले नाही. सर्वजण आप्पांचे झाले आणि आप्पा सर्वांचे झाले.

अजून एका आठवणीचा प्रसंग आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. दरवर्षी डिसेंबरमध्ये शाखेचे हिवाळी शिबीर पुण्यात भरत असे, कधी मोतीबागेत तर कधी आरण्येश्वरला. एके वर्षी आप्पांनी आम्हा सर्व स्वयंसेवकांना घेऊन जाण्याचे ठरवले, तेही सायकल वरून. जुन्नर-पुणे अंतर ५५ मैल. जुन्नर-पुणे आणि परत असा सायकलवरचा प्रवास ठरला, तोही रात्री. रात्री १० वाजता आप्पांबरोबर निघालो. त्या काळी रस्ते कच्चे होते, खाचखळगेही खूप. त्यामुळे मर्यादित वेगानेच जावे लागे. मंचरजवळ आल्यावर पद्माकरची सायकल पंक्चर झाली. मध्यरात्रीची अंधारी रात्र, काहीच करणे शक्य नव्हते. पुढे दोन घाट होते. दहा मैल अंतरावर खेड (आत्ताचे राजगुरू नगर) होते. आप्पांनी पद्माकरला आपल्या सायकलीवर बसवले. एका हाताने त्याची सायकल आणि दुसर्‍या हाताने आपली स्वत:ची सायकल चालवत घाटातला अवघड प्रवास करून खेड गाठले, पंक्चर काढले आणि पुढे मार्गस्थ झालो. शिबीर व्यवस्थित आटपून जुन्नरला परतलो. ही आप्पांची आठवण स्मृतीत कायमची कोरली गेली.आप्पा चार-पाच वर्षं प्रचारक म्हणून जुन्नरला आले, पण जुन्नरशी त्यांची नाळ जुळली ती कायमची. वारंवार त्यांचे जुन्नरला येणे चालूच होते. जुन्नरचा अरुण गाजरे (जोशी) आणि नारायणगावचे मोहन ठुसे यांची घरे हे त्यांचे राहण्याचे ठिकाण. अरुण माझा खूप जवळचा मित्र. त्याचे किराणामालाचे आणि औषधाचे दुकान होते. आप्पांच्या मुशीतून निघालेला. त्यामुळे सदैव दुसर्‍यांच्या मदतीकरिता प्रथम धावून जाणारा अरुण अल्पायुषी ठरला आणि मेंदूच्या आजाराने आपल्यातून निघून गेला. तो गेल्यानंतर वहिनींचा विचार करून आप्पांनी त्याच्याकडे राहावयास जाणे बंद केले, लोकापवाद नको म्हणून. जाणे येणे, विचारपूस करणे मात्र चालूच होते.


मॅट्रिक झाल्यावर पुढील शिक्षणाकरिता जुन्नर सोडले. तसे शाखेचा आणि आप्पांचा सहवास ही कमी झाला. नियमित शाखेत जाणे बंद झाले. फक्त शाखेचे उत्सव आणि गंगाजळी इतपतच संबंध राहिला. जवळ जवळ १०-१५ वर्षे अशी गेली. जुन्नरला मधून मधून जायचो तेव्हा ‘आप्पा’ हा विषय ठरलेला असायचा. आप्पांचा मुक्काम माझ्या मनात आणि घरात कायम होता. माझ्या बोलण्यातून आप्पा माझ्या पत्नीचे चांगले ओळखीचे झाले होते, तिने त्यांना कधीही पाहिले नव्हते तरीही. एक दिवस आप्पा अचानक माझ्या घरी आले. मी कामाला कारखान्यात गेलो होतो. दोन चार वाक्ये बोलणे झाले. आप्पांनी विचारले की. “वहिनी, ओळखलेत का?” ती लगेच म्हणाली, “हो, तुम्ही आप्पा, आप्पा बर्वे.” आपल्या जवळ असूनही आपल्यापासून दूर राहणारी खूप माणसं असतात, पण आपल्यापासून लांब राहूनही आपल्या जवळच असणारे आप्पांसारखे थोडेच! ’जनसेवा ही ईश्वर भक्ती’ या भावनेने आप्पांनी आपले आयुष्य जनसेवेकरिता समर्पित केले. अविवाहित राहून, त्यांच्यावर अवलंबून असलेल्या बहिणीबरोबर राहून, केवळ उदरनिर्वाहाकरिता लागणारे पैसे सोडले तर बाकी सर्व दुसर्‍यांकरिता खर्च केले. मुंबईच्या शीवच्या शाळेत नोकरी करताना शिल्लक पैसा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता खर्च केला. एक पैशाचीही संपत्ती साठवली नाही.

नोकरीतून निवृत्त झाल्यावर आपले सर्व आयुष्य ‘वनवासी कल्याण आश्रमा’ला वाहून घेतले. संपूर्ण भारतभर, मिझोरामपासून कन्याकुमारीपर्यंत हिंडून वनवासी लोकांमध्ये घालविले. शारीरिक शिक्षण आणि खेळ याची जबाबदारी त्यांनी मुख्यत्वेकरून सांभाळली. मुलांमधील गुण ओळखून अनेक वनवासी मुलांना राज्यस्तरावर स्थान मिळवून दिले आहे. जेथे पायी जाणेही कठीण, जिथे वनवासी लोक कुत्रे मारून उदरनिर्वाह करत अशा दुर्गम ठिकाणी जाऊन त्या लोकांमध्ये ते राहिले. मिळेल ते अन्न आणि असेल तसे पाणी पिऊन, तर कधी उपाशीपोटी त्यांनी तेथे दिवस काढले. त्यामुळे ‘नारू’सारखे आजारही सहन करावे लागले. त्यात त्यांच्यावर कर्करोगाकरिता शस्त्रक्रिया करावी लागली. अपघाताने पायाची हाडे मोडली. तरीही न डगमगता ‘फिनिक्स’ पक्ष्याप्रमाणे पुन्हा भरारी घेऊन आपले कार्य करत राहिले. वय झाले तसे महाराष्ट्र हे त्यांनी आपले मुख्य कार्यक्षेत्र बनवले. वेगवेगळ्या ठिकाणच्या ‘वनवासी कल्याण आश्रमा’ची सर्व जबाबदारी पार पडली. आश्रमाकरिता निधी जमविण्याची जबाबदारी ही त्यांच्यावर सोपविण्यात आली. ठरावीक काळात ते पुण्यात येत. काही महिने पुण्यातच त्यांचा मुक्काम असे. नोव्हेंबर महिन्यात त्यांचे हमखास पोस्टकार्ड यायचे, निधी देण्याची आठवण करण्याकरिता. त्यांचा मुक्काम आश्रमाच्या कार्यालयातच असायचा. दुसरे घर कोठे होते या माणसाला? त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन मी चार-पाच जणांची देणगी देऊन यायचो आणि काही जणांकडे त्यांना घेऊन जायचो. असे बरेच वर्षं चालले होते. असे करत करत आप्पांनी कल्याण आश्रमाकरिता एक कोटी रुपयांचा निधी जमा केला. ’आप्पा कोट्यधीश झाले’ म्हणून सर्वांनी त्यांचे कौतुक केले. पण, स्वत: मात्र ते कायमचे सेवाव्रतच राहिले.



आप्पांशी माझा संपर्क वाढत गेला. घरी येणे-जाणे होऊ लागले. कधी घरी राहावयासही येत. तेव्हा ’साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा’ असे व्हायचे आम्हाला! पण, असा योग वारंवार येणे हे आप्पांनाच मान्य नसायचे. पहाटे ४.३०-५ वाजता उठणे, व्यायाम करणे, शाखा करणे वगैरे कधीही चुकत नसे आणि हे सर्व संसारी माणसाला गैरसोईचे होते, असे त्यांना वाटायचे. उच्च विचारसरणीबरोबर आप्पांची राहणी अगदी साधी होती. ते फक्त स्वदेशी वस्तू वापरत. मी अमेरिकेतून आणलेला स्वेटर आणि इतर काही गोष्टी भेट देऊ केल्या, पण त्यांनी ठामपणे प्रेमपूर्वक नाकारल्या. मुंबईला, माणगावला अथवा इतर ठिकाणी जाण्याकरिता बसचे तिकीट काढायचा प्रसंग यायचा. त्यांनी कधीही लक्झरीचे तिकीट काढू दिले नाही. म्हणायचे, ‘’गिरीश, ही चैन मला, वनवासींना नाही परवडत. खर्चच करायचे असतील तर आश्रमाला आणखी निधी दे.” आप्पांनी नेहमी एसटीच्या लाल डब्यानेच प्रवास केला. आप्पांचे स्वतःचे असे त्यांच्या जवळ काय होते? त्यांचे अंगावरचे कपडेही त्यांचे नव्हते. म्हणायचे, ‘’गिरीश, हा लेंगा आता विरायला लागला आहे, या सपाता फारच झिजल्या आहेत.” ज्यांचा देहच त्यांचा स्वत:चा नव्हता, तेव्हा त्याच्यावरचे कपडे आणि पादत्राणेही त्यांचे कशी असतील म्हणा! असे आपल्या सर्वस्वाचा त्याग करणारे माझे गुरू कसे जीवन जगले माहीत आहे-
असू आम्ही सुखाने पथ्थर पायातील।
मंदिर उभविणे हेच आमुचे शील॥
आम्हास नको मुळी मानमरातब काही।
कीर्तीची आम्हा हाव मुळीही नाही॥
सर्वस्व अर्पिले मातृभूमीचे ठाई।
हे दैवत अमुचे ध्येय मंदिरातील॥
असू आम्ही सुखाने पथ्थर पायातील।
मंदिर उभविणे हेच आमुचे शील॥
असे हे समर्पित जीवन १० एप्रिलला अजरामर झाले. ’हे विश्वची माझे घर’ असे म्हणत आणखी मोठ्या कार्याकरिता अनंतात विलीन झाले. १९५७-५८-५९ साली अकारावी पास झालेल्या आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे संमेलन जवळ जवळ ४० वर्षांनी म्हणजे १९९९ साली आम्ही आमच्या शाळेत (न्यू स्कूल जुन्नर) येथे भरविले होते. त्यावेळेस हयात असलेल्या तीन शिक्षक आणि आप्पांचा आम्ही शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला होता. त्या संमेलनाच्या प्रसंगाने माझी पत्नी शैला (मेघना) हिने एक कविता लिहिली होती. त्यात तिने फक्त दोन ओळीत, जे मला माझ्या वरील संपूर्ण लिखाणातून करता आले नाही, ते आप्पांच्या आयुष्याचे वर्णन केले आहे - आप्पांची शिकवण ही तर आयुष्याची कमाई। वनवासींना मार्ग दाविते देव घरातील ही समई॥
तीच दिव्याची ज्योत वनवासींच्या मनाच्या कोनाड्यात सतत तेवत राहणार आहे.
मग मी कसं म्हणू की, वनवासी पोरका झाला!


- गिरीश जोशी