मुंबई - देशावर आलेल्या संकटकाळामध्ये दरवेळी भारतीय रेल्वेने देशाची साथ दिली आहे. देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी झगडत असताना भारतीय रेल्वे आॅक्सिजन दूत बनून देशाचा मदतीला धावली. गेल्या काही दिवसांमध्ये रेल्वेमार्फत देशातील विविध भागांमध्ये २,५११ मेट्रिक टनापेक्षा जास्त लिक्विड आॅक्सिजन पोहोचवण्यात आला आहे.
भारतामध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान भारतीय रेल्वेने उत्कुष्ट कामगिरी बजावली होती. त्यावेळी रेल्वेकडून आत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा देशभर करण्यात आला होता. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळीही रेल्वे देशाच्या मदतीला धावली आहे. आॅक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून आॅक्सिजनचा तुटवडा भासणाऱ्या राज्यांना रेल्वेने मदत केली आहे. गेल्या महिन्याभरात रेल्वेने ४० आॅक्सिजन एक्सप्रेस वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठवल्या आहेत. त्याव्दारे १६१ टॅंकरच्या मदतीने २,५११ मेट्रिक टनांपेक्षा जास्त लिक्विड आॅक्सजिनचा पुरवठा केला आहे. यामध्ये महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, हरियाण, तेलंगणा आणि दिल्लीचा समावेश आहे. राजस्थानमध्ये हापा येथून जाणारी पहिली आॅक्सिजन एक्सप्रेस रवाना झाली आहे.
आॅक्सिजनच्या वाहतूकीसाठी विनंती करणाऱ्या राज्यांना कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लिक्विड आॅक्सिजन पोहोचवण्याचा भारतीय रेल्वेचा प्रयत्न आहे. आतापर्यंत आॅक्सिज एक्सप्रेसव्दारे महाराष्ट्रात १४४ मेट्रिक टन, उत्तर प्रदेशामध्ये ६८९ मेट्रिक टन, मध्यप्रदेशात १९० मेट्रिक टन, हरियाणामध्ये २५९ मेट्रिक टन, तेलंगणामध्ये १२४ मेट्रिक टन आणि दिल्लीला सर्वाधिक १०५३ मेट्रिक टन लिक्विड आॅक्सिजनचा पुरवठा रेल्वेने केला आहे. सध्या खासदार, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली येथे ४०० टनांपेक्षा जास्त आॅक्सिजन वाहून नेण्याचे काम २२ टँकरच्या मदतीने सुरू आहे.