मुंबई - अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात पोलिसांनी गर्दी करण्यास मनाई केल्याने जमावाने थेट पोलिसांवरच दगडफेक करत हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. "राज्यकर्त्यांनो, पोलिसांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान मानता ना? मग या महाराष्ट्रात, दररोज महाराष्ट्राचा अपमान होत आहे." अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.
संगमनेरमध्ये संचार बंदी काळात पोलीस गस्त घालत होते. यावेळी दिल्ली नाका परिसरात जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. या जमावाने पोलिसांनी तात्पुरत्या उभारलेल्या चेकनाक्याचीही तोडफोड केली. याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. केशव उपाध्ये यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, "राज्यकर्त्यांनो, पोलिसांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान मानता ना? मग या महाराष्ट्रात, दररोज महाराष्ट्राचा अपमान होत आहे. दिवसागणिक पोलिसांवर हल्ले होत आहेत, भर दिवसा पोलिसांचे मुडदे पाडले जात आहेत, महाराष्ट्राची मान अपमानाने आणि शरमेने झुकत आहे, आणि तुम्ही मात्र मूग गिळून गप्प बसला आहात. कुठे गेली तुमची अस्मिता?"
"संगमनेरमध्ये गर्दी करू नका सांगणाऱ्या पोलीसावर जमावाने काल हल्ला केला. पण अजूनही पोलीसांचा अपमान झाल्याचा साक्षात्कार संजय राऊत यांना कसा झाला नाही? हल्लेखोर कोण पाहून टोपी फिरवली की काय?" असेही उपाध्ये म्हणाले. "पोलिसांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत या बंद खोलीत कॅमेऱ्यासमोर केलेल्या घोषणा एवढ्यातच कसे विसरलात? धोरणलकवा आणि निर्णयलकव्यात गुरफटलेले सरकार पोलिसांना संरक्षण देणार की त्यांच्यावर होणारे हल्ले षंढपणाने पाहात बसणार? महसूलमंत्र्यांच्या संगमनेर शहरात या राज्यात नियमांचे पालन करण्यासाठी पोलिसांनी कर्तव्य बजावणे हा त्यांचा गुन्हा आहे का?" असा सवालही उपाध्ये यांनी केला आहे.
"संगमनेरमध्ये पोलिसांनी अजूनही कठोर कारवाई केली नाही. नवाब मलिक तुमचे गृहखाते टोपी पाहून कारवाईचा निर्णय घेते का ?" असा टोला उपाध्ये यांनी मलिकांना लगावला आहे. "संगमनेरातील गुन्हेगारांवर कारवाईच्या नावाखाली पांघरूण घालण्याचे षडयंत्र रचले जाणार असेल तर त्याचा जाब सत्ताधाऱ्यांना द्यावा लागेल. संगमनेरमध्ये कोरोना नियमांचे धडधडीत उल्लंघन झाले तरी कारवाई कोठे ? नानाजी पटोले तुम्ही बाळासाहेब थोरातांचे गाव म्हणून गप्प बसलात काय ? दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या बुधवार पेठेत तडीपार गुंडाने पोलीस हवालदाराचा निर्घृण खून केला. पोलीस दल हादरले, पण गृहखाते ढिम्म आहे. दोन आठवड्यांपूर्वी पुण्यातच फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतच एका तडीपार गुंडाने पोलिसांवर कोयत्याने हल्ला चढविला. पोलिसांचे मनोबल खच्ची करणाऱ्या अशा गुंडगिरीला जबाबदार कोण? तीन दिवसांपूर्वी नागपूरजवळ टोली येथे अवैध दारूधंद्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने जीवघेणा हल्ला केला. तुफान दगडफेक करून दहशत माजविली,"असेही उपाध्ये ट्विट करुन म्हणाले.