अहमदनगर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्व ठिकाणी संचारबंदी लागू आहे. त्यामुळे गर्दी करण्यास सक्त मनाई आहे. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात पोलिसांनी गर्दी करण्यास मनाई केल्याने जमावाने थेट पोलिसांवरच दगडफेक करत हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात हा प्रकार घडला. सध्या याचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. पोलिसांनी हल्लेखोरांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
संगमनेरमध्ये संचार बंदी काळात पोलीस गस्त घालत होते. यावेळी दिल्ली नाका परिसरात जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. या जमावाने पोलिसांनी तात्पुरत्या उभारलेल्या चेकनाक्याचीही तोडफोड केली. गस्त घालत असताना पोलिसांना काही लोक गर्दी करुन उभे असल्याचे दिसले. यावेळी जमाव बंदीचा आदेश असताना गर्दी का केली ? अशी विचारणा करत पोलिसांनी जमावाला हटकले. पोलिसांनी जमावाला घरी जाण्यास सांगितले असता जमाव आणि पोलीस यांच्यात शाब्दिक वाद झाले. मात्र यामुळे जमाव अचानक आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिसांवर हल्ला करत दगडफेक केली. तसंच परिसरात उभारलेल्या चेकनाक्याची नासधूसही जमावाने केली.
जमावाने पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण केली. तर जमावाने पोलीस कर्मचाऱ्यांचा पाठलाग केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केले असून परिसरातील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले आहे. यामधून काही जणांची ओळख पटली असून विविध कलमानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती उपविभागीय आयुक्त राहुल मदने यांनी दिली आहे.दरम्यान, हल्ला करणाऱ्या जमावाने पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण केली. जमावाने पोलीस कर्मचाऱ्यांचा पाठलाग करत हल्ला केल्याचेही सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत दिसत आहे. हल्लेखोरांनी यावेळी पोलीस चौकीसह पोलिसांच्या गाड्यांचीही तोडफोड केली.