जिल्हा परिषदेचे नाव सातासमुद्रापार नेणारा शिक्षक

    30-May-2021
Total Views |

Ajay Patil _1  
 
नाटकांची आवड जोपासणारे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अजय पाटील यांनी विद्यार्थ्यांमध्येही नाटकाची गोडी निर्माण केली. अशा या विद्यार्थीप्रिय शिक्षकाविषयी...
 
 
अजय पाटील हे मूळचे रायगड जिल्ह्यातील काळेश्री गावचे. लहानपणापासूनच त्यांना नाटकांची आवड होती. आपल्या नाटकाच्या आवडीला वाव मिळेल, या उद्देशाने त्यांनी ठाणे गाठले आणि त्यांनी शिक्षकीपेशा स्वीकारला. शाळेत त्यांच्या नाटकांच्या आवडीला खतपाणी मिळत होते, पण तेवढ्यावर त्यांचे समाधान होत नव्हते. जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी करीत असताना, आपण ज्या नाट्यकलेचा आनंद घेत आहोत, तो शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही मिळाला पाहिजे, असे त्यांना सतत मनोमन वाटत असे.
 
 
त्यासाठी त्यांनी 1992 पासून बालनाट्य लेखन आणि दिग्दर्शनास प्रारंभ केला. कल्याणमधील जिल्हा परिषद शाळा वाहोलीमधील विद्यार्थ्यांना घेऊन त्यांनी ‘भन्नाट पोरं’, ‘एक घर सुधारतंय’ ही नाटकं सादर केली आणि ती गाजलीसुद्धा! या नाटकांमध्ये अगदी वनवासी विद्यार्थ्यांनीदेखील सहभाग नोंदविला. नाटकांत काम करीत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांसोबत एक चांगले ‘ट्युनिंग’ जमले असतानाच, अजय यांची बदली झाली. ते कल्याण तालुक्यातील पिसवली जिल्हा परिषद शाळेत 2006 साली रूजू झाले. ही शाळा इयत्ता सातवीपर्यंत असल्याने मोठ्या मुलांना घेऊन काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
 
 
अजय हे नाट्यकलेकडे एक आनंद देणारी कला म्हणून पाहतातच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेत काहीतरी नावीन्यपूर्ण उपक्रम करायला मिळतात, त्यातून त्यांना आनंद मिळतो. तसेच नाट्यकलेच्या माध्यामातून विद्यार्थीही हसतखेळत शिक्षण घेत असल्याचा उद्देश सफल होत असल्याचे अजय सांगतात. पिसवलीच्या शाळेतही त्यांनी अनेक नाटकं बसवून धम्माल उडवून दिली होती. त्यामध्ये झाडांना आपला मित्र मानणारे ‘आमचा मित्र’, डोंबारी समाजातील शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्याची गोष्ट सांगणारे ‘बिर्‍हाड’, ‘मैत्री’, ‘आम्ही सार्‍याजणी’ ही नाटकं विशेष गाजली. ठाण्याचे गडकरी रंगायतन, दादरचे शिवाजी नाट्यमंदिर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई येथील नामवंत रंगमंदिरांमध्ये गेली 12 वर्षं पिसवलीच्या बालकलाकरांना घेऊन अजय हे वेगवेगळी नाटकं अगदी उत्साहाने सादर करीत आहेत.
 
 
महाराष्ट्र राज्य बालनाट्य महोत्सवातदेखील त्यांनी विद्यार्थ्यांसह सहभाग नोंदवला. अजय यांच्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील ‘आम्ही फुले बोलतोय’ या नाटकाला जेव्हा जिल्हा पातळीवरील उत्कृष्ट नाटकाचे पारितोषिक मिळाले, त्यावेळी ग्रामस्थांनी वाजतगाजत गावातून विजेत्यांची मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला. अजय यांच्याकडे एका नाटकाचे बालकलाकरांचे तीन-तीन संच तयार असायचे. ही जिल्हा परिषद शाळेतील मुले टीव्हीवर झळकली, तर त्यांनासुद्धा मोठ्या पडद्याचे व्यासपीठ मिळेल, असा विचार अजय यांच्या मनात आला. या विद्यार्थ्यांमधील असलेली गुणवत्ता त्यांनी ओळखली होती. पण, त्यांच्याकडे कमतरता होती ती एका संधीची. संधीची वाट पाहत न बसता आपणच संधी निर्माण करायची असा निश्चय अजय यांनी मनाशी पक्का केला. त्या दिशेने ते तयारीलाही लागले. ऑडिओ आणि व्हिडिओ क्षेत्रात काम करताना त्यांचे प्राथमिक ज्ञान आपल्याला असणे आवश्यक आहे, त्यासाठी त्यांनी मुंबईत कुर्ला येथे एका खासगी संस्थेचा ‘फिल्म मेकिंग’चा सहा महिन्यांचा अर्धवेळ अभ्यासक्रम पूर्ण केला.
 
 
या अभ्यासक्रमातून ‘फिल्म मेकिंग’चे धडे गिरविल्याने अजय यांच्यात आत्मविश्वासही निर्माण होता. आपण लघुपट निर्मिती करू शकतो, हा आत्मविश्वास त्याला मिळालेली प्रचंड इच्छाशक्तीची जोड आणि मेहनत यांच्या जोरावर त्यांनी कामाला सुरूवात केली. पण, अडचणी एवढ्यात संपणार्‍या नव्हत्या. लघुपटांची निर्मिती करायची तर आर्थिक पाठबळ ही सर्वात मोठी समस्या समोर होती. लघुपट बनविणे हे काम मोठ्या खर्चाचे होते. अजय यांनी त्यांच्या स्वकमाईतील दीड ते दोन लाख रुपये लघुपटासाठी खर्च करण्यासाठी बाजूला काढून ठेवले होते. पण, तेवढ्या रकमेने काही भागणारे नव्हते. अजय यांनी आपली अडचण सहकारी शिक्षकांकडे बोलून दाखविली. त्यावर काही शिक्षकांनी स्वखुशीने या उपक्रमाला पाठबळ देण्याची तयारी दर्शविली. मग अजय यांनी कंबर कसली ती लघुपट निर्मितीसाठी लागणार्‍या कथेसाठी.
 
 
‘पर्यावरणपूरक होळी आणि धुळवड‘ या विषयावर त्यांनी कथा तयार केली. शाळेला ग्रामस्थांकडूनही आर्थिक साहाय्य लाभले. त्यामुळे कामाने अधिक वेग घेतला. ‘आम्ही फुले बोलतोय’ या नाटकावर लघुपट तयार करायचे त्यांनी ठरविले. आज हाच लघुपट फुले दाम्पत्याच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त सर्व शाळांमध्ये दाखविला जातो. समाजात जनजागृती करणारे अनेक विषय त्यांनी असेच लघुपटांच्या माध्यमातून मांडले. त्यामध्ये ‘बंधारा’ या लघुपटातून दुष्काळाचा विषय मांडला. ‘मासिक पाळी’, ‘वायुप्रदूषणावरील एअर’, ‘तुळस’ असे अनेक लघुपट तयार केले आहेत. त्यांचा सर्वात गाजलेला लघुपट जो अमेरिकेच्या ‘मियामी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’मध्ये ही पोहोचला तो म्हणजे ‘माझ्या गुरूजीची गाडी.’
 
 
अजय यांचा मुलगादेखील त्यांच्या मदतीने लघुपटाचे इंग्रजी भाषेतील उपशीर्षके बनवू लागला आणि ‘ऑनलाईन’ लिंक तयार केली. त्यामुळे ‘माझ्या गुरूजींची गाडी’ या चित्रपटाने इतिहास घडविला. हा लघुपट अमेरिकेसह 187 देशातील चित्रपट महोत्सवात दाखविला गेला, तर ‘धुळवड’ हा चित्रपट 87 देशांत पाठविला गेला. ‘बंधारा’ हा लघुपट अत्यंत मानाचा समजला जाणार्‍या ‘एनसीईआरटी दिल्ली’ आयोजित ‘ऑल इंडिया चिल्ड्रन एज्युकेशन ऑडिओ-व्हिडिओ फेस्टिवल’मध्ये ही दाखविला गेला. विशेष म्हणजे, सलग पाच वर्षं या लघुपटांनी फेस्टिवलमध्ये पारितोषिक पटकविण्याचा मान मिळविला. अजय यांच्या पत्नी अजिता पाटील यांना ‘आम्ही फुले बोलतोय’ या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कारदेखील मिळाला. अशा अनेक पुरस्कारांनी त्यांच्या लघुपटांना गौरविण्यात आले आहे. कल्याणकर असलेले पाटील हे सध्या भिवंडी तालुक्यातील राहनाळ या शाळेत कार्यरत आहेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे शुभेच्छा.