मुंबई - अरबी समुद्रात तयार झालेले तौत्के चक्रीवादळ शमण्याच्या वाटेवर असताना आता बंगालच्या उपसागरामध्ये एका चक्रीवादळाच्या निर्मितीला सुरुवात झाली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. परिणामी वादळाच्या निर्मितीला सुरुवात झाली आहे. या चक्रीवादळाचे नाव 'यास' असून पुढच्या आठवड्यात रोजी ते पश्चिम बंगालच्या पूर्व किनारपट्टीला धडकणार आहे.
तौत्के चक्रीवादळाने भारताच्या पश्चिम किनापट्टीवर थैमान घातले. यामध्ये प्रामुख्याने गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वादळांचे परिणाम कमी होत असताना आता भारतच्या पूर्व किनारपट्टीवर एक वादळ तयार होते. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. सोबतच समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचे तापामानही वाढले आहे. हे वातावरण चक्रीवादळाच्या निर्मिती पूरक आहे. या वादळाचे नाव 'यास' असून ते ओमान या देशाने ठेवले आहे.
अंदमान निकोबार बेटानजीकच्या सागरी परिक्षेत्रामध्ये या वादळाच्या निर्मितीला सुरुवात झाली आहे. अजून हे वादळ पुढे सरकलेले नाही. या वादळाचे परिणाम पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये जाणवतील. २३ ते २४ मे रोजी वादळ पूर्णपणे तयार झाल्यानंतर 2२७ ते २९ मे दरम्यान ते पश्चिम बंगालच्या किनाऱ्याला धडकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे अंदमान निकोबार बेट, ओडिशा आणि पश्चिम बंगालला या वादळाचा फटका बसणार आहे. यावेळी ताशी १४० ते १५० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.