हसर्‍या रेषा पाणावल्या...

    01-May-2021
Total Views | 374

rajkendra sarag_1 &n


पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी, पत्रकार, लेखक व प्रसिद्ध व्यंगचित्रकार राजेंद्र सरग यांचे दि. 3 एप्रिल रोजी कोरोना संकटाशी दोन हात करता करता निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांना भावांजली अर्पण करणारा हा लेख...


एक संवेदनाशील माणूस, एक कर्तव्यतत्पर सरकारी अधिकारी, एक साक्षेपी लेखक/पत्रकार आणि भोवतीच्या व्यंगात्म विसंगतींवर मार्मिक भाष्य करणार्‍या हसर्‍या रेषांचा राजा-राजेंद्र सरग यांच्यावर अगदी अनपेक्षितपणे कोरोना विषाणूने हल्ला चढवला आणि काळाने निष्ठुर, क्रूरपणे एका सज्जन, सहृदय माणसाला आपल्यातून हिरावून घेतले. विविध क्षेत्रांतील अगणित मित्र प्रेमाने संग्रही जपणारे, प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे, लहान-थोर कुणीही असो, प्रत्येकाशी अगदी नम्रपणे बोलणारे, मितभाषी, मृदू व्यक्तिमत्त्व अशी राजेंद्र सरग यांची प्रतिमा त्यांच्या सहवासात येणार्‍या प्रत्येकाच्या मनावर कायमची ठसली गेली आहे.अगदी ‘अजातशत्रू’ हे विशेषण शोभावं, असा सरग सरांचा मित्रपरिवार त्यांनी स्नेहाच्या धाग्याने बांधून ठेवला होता. विशेषतः ‘प्रिंट मीडिया’ आणि विविध ‘इलेक्ट्रॉनिक’ वृत्तवाहिन्यांचे पत्रकार यांच्याशी त्यांचे फार स्नेहशील नाते होते. सरकारी उच्च पदस्थ अधिकारी आणि विविध वृत्तसंस्था यांच्यातला ते एक पक्का दुवा होते.


शालेय वयापासून त्यांचे रंगरेषांशी खास नाते जडले. चित्र काढण्यात रंगून जाणार्‍या या कलावंत मनाला नंतर मोठं झाल्यावर मात्र व्यंगचित्रांनी आकर्षित केले. प्रभाकर झळके यांच्या व्यंगचित्रांनी प्रभावित होऊन त्यांनी ही कला आत्मसात करण्याचा ध्यास घेतला आणि बघता बघता त्यावर प्रभुत्व मिळवले. सन १९८७ पासून त्यांची व्यंगचित्रे विविध मासिके, वृत्तपत्रे व दिवाळी अंकांमधून झळकू लागली. कालांतराने तर एका वेळी १०० दिवाळी अंकांत व्यंगचित्रे प्रसिद्ध होण्याचा मान त्यांना लाभला होता. अशा या आगळ्या-वेगळ्या अनोख्या शतकवीराला कितीही सलाम ठोकले तरी कमीच आहेत. पण, फक्त व्यंगचित्रे रेखाटणे यावर त्यांचे या कलेवरचे हे प्रेम थांबले नाही, त्यांनी विविध वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणार्‍या व्यंगचित्रांचा अभ्यास करून प्रबंधलेखन केले व औरंगाबाद विद्यापीठात तो प्रबंध सादर केला. औरंगाबाद येथेच त्यांनी ‘वृत्तपत्र विद्या पदवी’ शिक्षण घेतले. त्यावेळी धारूरकर सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचा उल्लेख ते कृतज्ञतेने करीत असत. वृत्तपत्र शिक्षणाची पदवी मिळताच लगेचच औरंगाबाद येथे ‘देवगिरी तरुण भारत’मध्ये पत्रकार, उपसंपादक अशा जबाबदार्‍या कुशलतेने पूर्ण केल्या. येथे त्यांना संपादक मनोहर कुलकर्णी यांच्या हाताखाली पत्रकारितेचे धडे गिरवण्याची संधी मिळाली आणि त्यांनी या संधीचं सोनं केलं. मनोहर कुलकर्णी यांचा शांत स्वभाव, सकारात्मक दृष्टिकोन व विधायक आणि विकासाचा वेध घेणारी पत्रकारिता यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला होता.


वैयक्तिक आयुष्यात संघर्षाच्या काळात आपल्याला नवा मार्ग दाखवणारे मनोहर कुलकर्णी व धारूरकर सरांसारखे मार्गदर्शक गुरू लाभले, हे आपले भाग्य, असे ते मानत. कारण, या दोघांच्या प्रेरणेतूनच पुढे त्यांनी सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा दिल्या आणि त्यात उत्तम तर्‍हेने यशस्वी होऊन ते महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागात अधिकारी म्हणून रुजू झाले. पुढे आपल्या मेहनतीच्या बळावर आणि प्रामाणिक कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावत असताना लवकरच बढती मिळून ते ‘जिल्हा माहिती अधिकारी’ या जबाबदारीच्या उच्चपदी पोहोचले. परभणी, बीड, औरंगाबाद व नगर येथे त्यांनी ‘जिल्हा माहिती अधिकारी’ म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. सन २०१७ पासून ते आतापर्यंत पुण्याचे ‘जिल्हा माहिती अधिकारी’ म्हणून कार्यरत होते. असे समजते की, येत्या १५ दिवसांत त्यांना पुढचे प्रमोशनही मिळणार होते.


पुणे येथील माहिती विभागाचे काम खूपच आव्हानात्मक आहे. राज्य शासनाची सर्व आयुक्तालये, विभागीय आयुक्तालय, विभागीय कार्यालये, मंत्री परिषदा, उच्चस्तरीय बैठका यांच्या जवळ जवळ रोज होणार्‍या कामकाजाच्या प्रसिद्धी व प्रचाराची आणि नियोजनाची जबाबदारी त्यांनी आपल्या टीमच्या सोबतीने फार कौशल्याने व तत्परतेने सांभाळली. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मंत्रिमहोदय अशा उच्च पदस्थ महत्त्वपूर्ण व्यक्तींशी कामकाजानिमित्त येणारे संबंध नंतर वैयक्तिक स्नेहबंधात नकळत बांधून टाकण्याचा एक गोडवा त्यांच्या स्वभावात होता, म्हणूनच ते जेव्हा ससूनमध्ये कोरोनाशी झुंज देत होते, तेव्हा स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त या सर्वच महत्त्वपूर्ण व्यक्ती त्यांच्यावरील उपचारावर देखरेख ठेवून होते. पण, शेवटी व्हायचा तो घात झालाच. कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेत त्या इवल्या जीवाणूने आपले रंगरूप व हल्ल्याची पद्धत बदलली. काही कळायच्या आत हे आक्रमण थेट एखाद्या अवयवावर कब्जा करते आणि शरीरांतर्गत भयंकर गुंतागुंतीची अशी परिस्थिती निर्माण होऊन उपचारांना प्रतिसादच मिळत नाही. राजेंद्र सरांच्या बाबतीत हाच प्रकार झाला. शेवटपर्यंत ‘फीट अ‍ॅण्ट फाईन’ असणार्‍या या माणसाची ‘शुगर लेव्हल’ एवढी वाढली की, ती शेवटपर्यंत कमीच झालीच नाही. झाला तो थेट अंत! या घटनेचा त्यांच्या भोवती वावरणार्‍या सर्वांनाच खूप धक्का बसला. कारण गेल्या वर्षी जेव्हापासून कोरोना महासाथीची आपत्ती उद्भवली, तेव्हापासून ते स्वतः व त्यांची टीम माहिती व प्रसाराच्या कामाला अगदी काही झटून लागली होती. रोजचे कोरोनाचे माहितीविषयक बुलेटीन वेळोवेळी प्रसारित करणे, सरकारी सूत्रांकडून जनतेला व्यवस्थित माहिती देण्यासाठी सतत पत्रकार परिषदांचे आयोजन करणे, कोरोनाविषयक नवीन उपलब्ध सुविधांची अद्यावत माहिती प्रसृत करणे, यंत्रणा व जनता यांच्यात समन्वय साधणे, या सर्व कामांचे त्यांचे नियोजन अगदी चोख असे.


कोरोनाविषयक उपाययोजनांविषयी जनजागृती करण्यासाठी त्यांचा सतत जनतेशी ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून संवाद असे. आकाशवाणीवरूनही त्यांनी दिलखुलास कार्यक्रमात तज्ज्ञांच्या मुलाखती घेऊन माहितीचा स्रोत अखंड ठेवला. कोरोना आरोग्यकेंद्रावर काम करणार्‍या डॉक्टर, नर्सेस, आरोग्यसेवक यांना प्रत्यक्ष धीर देण्याचं काम त्यांनी केलं. विविध केंद्रावर अशा ‘कोरोना फायटर्स’चा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. पण, हे करताना ते स्वतःसुद्धा प्रत्यक्षात एक ‘कोरोना फायटर’च होते, हे त्यांच्या कधी लक्षात आले होते की नाही, कुणास ठाऊक. माहिती उपलब्ध करून देण्याची ते जी आवर्जून दक्षता घेत होते, त्या सर्व कामाचा कोरोना आपत्तीत प्रभावी उपयोग झाला होता. या काळात पुण्याचे जिल्हा माहिती कार्यालय हे जणुकाही कोरोना आपत्तीला तोंड देणारे आपत्ती व्यवस्थापन केंद्रच झाले होते. कोरोना संकटात झपाट्याने काम करून वेळेत धावून जाण्याच्या त्यांच्या या कामाची पत्रकार संघाकडून यथोचित दखल घेण्यात आली व महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. पुण्याच्या ‘सूर्यदत्ता’ संस्थेच्या वतीनेही त्यांना कोरोनाकाळातील याच कामासाठी ‘सूर्यादत्ता’ पुरस्काराने सन्मानित केले होते. याशिवाय लेखनविषयक व व्यंगचित्र कलेतील अनेक मानाचे आणि प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांच्या नावावर जमा आहेत.


वाचनातून पुस्तकांशी लहानपणापासून मैत्र जडलेल्या राजेंद्र सरग यांचं पुस्तकांवर फार प्रेम होतं. सरकारी कामकाजाचा व्यापताप सांभाळून ते नवीन लेखकांच्या पुस्तकांचा स्वागतपर परिचय लिहित असत. तरुण लेखकांच्या पुस्तक प्रकाशनाला आवर्जून उपस्थित राहत असत. स्वतः त्यांचे काही लेखन संकल्पही डोक्यात होते. निरस, यांत्रिक आणि तांत्रिक अशा सरकारी कामकाजातसुद्धा काही खूप छान अनुभव माणसाचं आयुष्य समृद्ध करून जातात, अशा माणुसकीच्या आणि आपुलकीच्या नात्यांच्या अनुभवावर आधारित पुस्तक लिहिण्याची त्यांची इच्छा होती. कार्टूनची एक ‘डिजिटल’ मालिका करण्याचा त्यांचा मानस होता. वास्तव जमिनीवर पाय ठेवून आपल्या आयुष्याचा मार्ग सरळ रेषेत चालणार्‍या या साध्याशा माणसातील असामान्य कलावंताची ही छोटी-छोटी स्वप्नं अखेर अधुरीच राहिली. हे पाहून त्यांनी आजपर्यंत निर्मिलेल्या हजारो कार्टून्सच्या हसर्‍या रेषाही आज त्यांच्या आठवणीत पाणावल्या असतील. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती व सद्गती देवो व त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांना हे अतीव दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करून आदरणीय व परमस्नेही राजेंद्र सरग यांना ही भावांजली अर्पण करते.


- अमृता खाकुर्डीकर
अग्रलेख
जरुर वाचा
मुंबई लोकल अपघात : मृतांचा आकडा ८ वर; वाचा दिवसभरात काय घडलं?

मुंबई लोकल अपघात : मृतांचा आकडा ८ वर; वाचा दिवसभरात काय घडलं?

आठवड्याचा पहिलाच दिवस मध्य रेल्वेसाठी काळा दिवस ठरला आहे. कसारा-सीएसएमटी लोकल मार्गावरून प्रवास करणाऱ्या ८ जणांचा सोमवार दि.९ रोजी रुळावर पडून मृत्यू झाला आहे. कसाऱ्याकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून नऊ ते दहा प्रवासी खाली पडले आणि त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवार, दि. ९ रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. "सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली होती. मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान ही घडली. फूटबोर्डवर उभ्या असलेल्या या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला आणि ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121