मुंबई : लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद झाल्याचा फलक लावल्याने अनेक नागरिकांचे हाल होत आहेत. नागरिकांचा उद्रेक आणि संताप डॉक्टर आणि कोविड योद्ध्यांना सहन करावा लागत आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहेत. जी-उत्तर विभागातील माहीमच्या लेफ्ट गुप्ते मार्गावरील हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेल्या लसीकरण केंद्रावरही असाच गोंधळ उडाला आहे.
मतदार हवेत पण नागरिक नको!
ज्यावेळी मतदान प्रक्रीया करायची असते तेव्हा सर्वांपर्यंत पोहोचण्याची, त्यांची नोंदणी करण्याची जबाबदारी सर्वपक्ष उचलतात, प्रशासन उचलते. मात्र, ज्यावेळी नागरिकांच्या लसीकरणाचा मुद्दा येतो तेव्हा यंत्रणा कुचकामी कशी ठरते, असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.
मुंबईतील लसीकरण व्यवस्थापन कोलमडले कुठे ?
जेव्हा मुंबईचा विचार करतो तेव्हा लोकसंख्येचा विचार का केला गेला नाही. मुंबईतल्या निवडणूकांवेळी मात्र, प्रत्येक मतदार संघात पोहोचण्याची तयारी का केली नाही, असा प्रश्न इथले नागरिक विचारत आहेत. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पळ, लक्ष्मीकांत साटम, दिलीप शिरसाट, राजेश पवार यांनी देखील लोकांना झालेल्या त्रासाबद्दल नाराजी व्यक्त केली.
सरकारी रुग्णालयात लस नाही व खाजगी रुग्णालयात लस उपलब्ध आहे. ह्याकडे लक्ष केंद्रीत करून जर लसीकरणावर राजकारण होत असेल तर ते कृपया थांबवा, अशी विनंती केली आहे. आजपर्यंत किती लस केंद्र सरकारकडून देण्यात आली त्याची आकडेवारी जाहीर करावी अशी मागणी केली आहे.