
भूविज्ञान मंत्रालयाने व्यक्त केला होता अंदाज
वृतसंस्था (नवी दिल्ली): भारतीय हवामान विभाग (आयएमडी)च्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्रानुसार काल उष्णतेच्या लाटेच्या अनुषंगाने किमान व कमाल तापमानाचे निरीक्षण नोंदवण्यात आले होते. राजस्थानमधील काही भागात आणि पूर्व विदर्भाच्या विविध भागांत उष्णतेच्या लाटांची परिस्थिती दिसून येत होती.
देशातील मध्य प्रदेशाचा पश्चिम भाग, विदर्भ आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेशाचा पूर्व भाग, ओडिशा, छत्तीसगढ, सौराष्ट्र आणि कच्छ, मध्य प्रदेशाचा पूर्व भाग येथे काही ठिकाणी ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त कमाल तापमानाची नोंद झाली होती. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे काल देशातील सर्वाधिक म्हणजे ४३.५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती.
येत्या २४ तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा
या काळात राजस्थान, विदर्भ आणि तामिळनाडूच्या अंतर्गत भागात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचना केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आल्या आहेत. हवामानाच्या अंदाजासाठी 'मौसम', तर मार्गदर्शक सूचनांसाठी 'मेघदूत' तसेच अत्यावश्यक सूचनांसाठी 'दामिनी' हे अॅप नागरिक वापरू शकतात.