‘कोरोना’काळात ६ हजार किमी रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण
नवी दिल्ली: कोरोनाकाळातील संपूर्ण जग ठप्प झालेले असताना भारतीय रेल्वेने मात्र आपत्तीचे संधीत रूपांतर केले आहे. गेल्या वर्षभरात तब्बल सहा हजार किलोमीटरहून अधिक रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. देशातील एकूण रेल्वेमार्गापैकी ७१ टक्के मार्गाचे विद्युतीकरण ३१ मार्च, २०२० पर्यंत पूर्ण झाले आहे.
सध्या देशाच्या आयातीत पेट्रोलियम इंधन म्हणजेच डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्याचे धोरण केंद्र सरकार राबवित आहेत. त्याचप्रमाणे भारताची ऊर्जासुरक्षा वाढविणे, प्रवाशांना जलद आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी उपलब्ध करून देणे, यासाठी रेल्वेचे विद्युतीकरण करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. भारतीय रेल्वेचे सध्याचे ‘ब्रॉड गेज नेटवर्क’ ६३ हजार ९४९ किमी आणि कोकण रेल्वेचे ७४० किमी असे एकूण ६४ हजार ८८१ किमी रेल्वेमार्गांचे जाळे आहे. त्यापैकी ४५ हजार ८८१ किमी म्हणजेच ७१ टक्के मार्गाचे विद्युतीकरण ३१ मार्च, २०२० पर्यंत पूर्ण झाले आहे. यातील उल्लेखनीय बाब म्हणजे, २०२०-२१ या वर्षांत म्हणजेच कोरोना संकटाच्या काळात तब्बल सहा हजार १५ किमी मार्गाचे विद्युतीकरण करण्यास यश आले आहे. विशेष म्हणजे, २०१८-१९ मध्ये कोरोना संकट नसतानाही केवळ पाच हजार २७६ किमी रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करण्यास यश आले होते.
गेल्या सात वर्षांत म्हणजेच २०१७ ते २१ या काळात, आधीच्या सात वर्षांच्या म्हणजेच २००७ ते २०१४ च्या तुलनेत पाचपटींहूनही अधिक विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. २०१४ पासून आजपर्यंत २४, ०८० किमी रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले असून, एकूण कामांपैकी ३७ टक्के काम पूर्ण झाले आहे. वर्ष २००७ ते १४ या काळात केवळ ४,३३७ किमी रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले होते. आतापर्यंत एकूण ४५,८८१ किमी रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले असून, त्यापैकी ३४ टक्के काम गेल्या तीन वर्षांत पूर्ण झाले आहे.
विद्युतीकरण झालेले महत्त्वाचे रेल्वेमार्ग
- मुंबई-हावडा मार्गे जबलपूर
- दिल्ली-दरभंगा-जयनगर
- गोरखपूर-वाराणसी मार्गे अनुरिहार
- जबलपूर-नैनपूर-गोंदिया- बल्लारशाह
- चेन्नई-त्रिची
- इंदौर-गुणा-ग्वालियर-अमृतसर
- दिल्ली-जयपूर-उदयपूर
- नवी दिल्ली-न्यू कूचबिहार- श्रीरामपूर आसाम-मार्गे पटना आणि कटिहार
- अजमेर-हावडा
- मुंबई-मारवाड
- दिल्ली-मोरादाबाद-तानकपूर