‘कोरोना’वर्षात ‘ई-कॉमर्स’ला ‘अच्छे दिन’

    29-Apr-2021
Total Views | 80

e commerce_1  H


जनसामान्यांमध्ये ‘कोविड-१९’च्या संदर्भातील आजार-निदान आणि उपचार यापोटी व्याप्त असणारी प्रचंड भीती. यातूनच फार मोठ्या संख्येने लोकांनी घराबाहेर न पडताच, घरपोच वस्तू-सेवा पुरवण्याचा पर्याय निवडला व त्याला वाढता प्रतिसाद मिळत गेला व ‘ई-कॉमर्स’ व्यवसायाला अशाप्रकारे ‘अच्छे दिन’ प्राप्त झाले.


‘कोविड-१९’नंतरच्या मार्च २०२० ते मार्च २०२१ या कोरोनावर्षात विविध क्षेत्रातील उद्योग-व्यवसायांवर कमी-अधिक स्वरूपात विपरीत परिणात झाला. तरी घरगुती स्वरूपातील उत्पादन सेवांवर विशेषत: ग्राहकोपयोगी वस्तूंची घरपोच सेवा वेळेत व खात्रीशीर स्वरूपात सातत्याने देणार्‍या ‘ई-कॉमर्स’ वा ‘ई-शॉपिंग’ व्यवसायाने मात्र व्यावसायिक सुगीसह प्रगती साधली असल्याची लक्षणीय बाब कोरोनाकाळाच्या वर्षपूर्तीनंतर स्पष्ट झाली आहे. कोरोनाकाळातील निर्बंध, मार्गदर्शक तत्त्व, जमावबंदी, संचारबंदी, वाहतूकबंदी व विविध प्रकारच्या निर्बंधांमुळे घरगुती गरजेच्या नित्योपयोगी, जीवनावश्यक व दैनंदिन व्यवहारांसाठी आवश्यक वस्तू मिळण्यासाठी खात्रीच्या सेवेसाठी ‘ई-कॉमर्स’ कंपन्यांच्या सेवेची साथ लाभली. दरम्यान, वक्तशीर व भरवशाच्या सेवेमुळे ग्राहकांना ही सेवा पद्धती एवढी भावली की, कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतरही त्यांनी याच माध्यमातून खरेदीचे सातत्य कायम ठेवल्याचे दिसून आले.


‘ई-कॉमर्स’ला कोरोनाच्या निमित्ताने लाभलेली ही लोकप्रियता व त्यामुळे मिळालेली व्यवसायवाढ यासंदर्भात प्रामुख्याने लक्षात आलेली बाब म्हणजे, कोरोनानंतर शासन-प्रशासनाद्वारे तातडीने केलेली उपाययोजना म्हणून जीवनाश्यक वस्तू-पुरवठा म्हणून किराणामाल-भाजीपाला व औषधांसह नित्योपयोगी वस्तूंची विक्री दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. अनपेक्षितपणे आलेली परिस्थिती व नियंत्रणे यामुळे जनसामान्यांमध्ये काळजीसह असुरक्षेची भावना निर्माण झाली व त्यातून जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांच्या रांगा लागू लागल्या. बाजारातील गर्दी या दुकानांमध्ये आली व त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची खरेदी आवश्यक असली, तरी त्यासाठी होणारी गर्दी अनावश्यक असल्याने ती टाळण्यासाठी ‘ई-कॉमर्स’ सेवेचा सोपा-सुलभ व खात्रीशीर पर्याय सर्वांपुढे आला. या नव्या पर्यायाला सर्वांनी उचलून धरले व त्याला चांगला आणि वाढता प्रतिसाद मिळत गेला, हा इतिहास तसा ताजा आहे. विविध निर्बंधामधून ‘मॉल्स’ आणि ‘डिपार्टमेंटल स्टोर्स’पण न सुटल्यामुळे त्या ठिकाणी विविध प्रकारच्या खरेदीसाठी एरवी गर्दी करणार्‍यांनीही ‘ऑनलाईन’ खरेदीलाच प्राधान्य दिले असल्याचे दिसून आले.


ग्राहक-नागरिकांना संपर्क साधून त्यांच्या गरजांनुरूप सूचित करणार्‍या व त्यांच्याशी संपर्क साधण्याचे काम ‘ऑनलाईन’ पद्धतीने करणार्‍या ‘माय गेट’ या अ‍ॅपची ग्राहक संख्या कोरोनाकाळात २५ लाखांनी वाढली, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे. ‘माय गेट’ अ‍ॅपचा उपयोग मोठी महानगरे व शहरांमधील मोठ्या निवासी सोसायट्यांमध्ये राहणार्‍यांसाठी आता वाढत्या प्रमाणात केला जातो. ‘माय गेट’च्या कोरोनादरम्यानच्या प्रत्यक्ष वापरावर आधारित सर्वेक्षण गेल्या वर्षात दोन वेळा करण्यात आले. मुंबई, बंगळुरू, दिल्ली-राजधानी क्षेत्र, चेन्नई, कोलकाता, पुणे, अहमदाबाद व हैदराबाद या निवडक महानगरांमध्ये केेलेल्या ‘माय गेट’ सर्वेक्षणानुसार वरील मोठ्या महानगरांमध्ये गेल्या वर्षी कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी-संचारबंदीनंतर प्रत्येक कुटुंबाने आठवड्यात सुमारे चार वेळा ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून ‘ई कॉमर्स’ सेवेचा वापर केला, तर टाळेबंदीच्या शेवटच्या टप्प्यात याच रहिवाशांनी आठवड्यात चक्क सहा वेळा म्हणजेच दररोज ‘ई-कॉमर्स’चा आधार घेतला. हा तपशील या सर्वेक्षणातील अधिकृत माहिती संकलनाद्वारे प्रकाशात आला आहे.

‘माय गेट’चे सह-संस्थापक अभिषेककुमार यांच्यानुसार, सर्वेक्षणातील उपलब्ध माहितीनुसार टाळेबंदीदरम्यान देशांतर्गत महानगरांमधील ग्राहक-नागरिकांच्या ‘ई-कॉमर्स’ सेवा वापराच्या प्रमाणात झालेली तुलनात्मक वाढ सुमारे ४५ टक्के म्हणजेच लक्षणीय स्वरूपात होती. सर्वेक्षणात समाविष्ट व वर नमूद केलेली महानगरे व त्यांची लोकंसख्या पाहता, ‘ई-कॉमर्स’चा वाढता प्रसार आणि उपयोग प्रकर्षाने नजरेत भरतो.‘माय गेट’चे सर्वेक्षण निवडक व प्रमुख महानगरांपुरते मर्यादित असले, तरी ‘ऑनलाईन’ पद्धतीने ‘ई-कॉमर्स’ची सेवा कोरोनाकाळात वाढत्या प्रमाणात घेण्याकडे अन्य शहरांमधील ग्राहक-नागरिकांचा कल ‘ऑनलाईन’ खरेदीकडे टाळेबंदीकाळात वाढत्या प्रमाणावर असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.


या संदर्भातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, विभिन्न राज्यातील मोठी शहरे वा जिल्हा मुख्यालय स्तरावर राहणार्‍यांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीत व त्यामुळे ‘ई-कॉमर्स’ सेवा व्यवसायात कोरोनाकाळात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. ‘ई-कॉमर्स’ क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी असणार्‍या ‘फ्लिपकार्ट’ कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे एक वर्षापूर्वी म्हणजेच कोरोनानंतरच्या टाळेबंदीनंतर मध्यम शहरे व जिल्हा मुख्यालय क्षेत्रात त्यांचा व्यवसाय सुमारे ५० टक्क्यांनी वाढला होता, तर, आता टाळेबंदीच्या एका वर्षानंतर याच भौगोलिक व्यवसायक्षेत्रात आधीच्या वर्षाच्या तुलनेत सुमारे ६५ टक्क्यांची व्यवसायवृद्धी झालेली आहे. या आकडेवारीवरून ‘ई-कॉमर्स’ची व्यावसायिक पाळेमुळे देशातील विविध भागांत व विशेषत: शहरी क्षेत्रात वाढली आहेत, हे टक्केवारीसह स्पष्ट होते. कोरोनाकाळात टाळेबंदी, संचारबंदी, व्यवसायबंदी, संचारबंदी, कामगारांची कमतरता, कच्च्या मालाची वाहतूकबंदी, प्रशासकीय निर्बंध इ. विविध अडचणींच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गतच नव्हे, तर जागतिक स्तरावरदेखील व्यवसायमंदी प्रकर्षाने जाणवली. त्या पार्श्वभूमीवर विविध वस्तू, सेवा, उत्पादने, ग्राहकोपयोगी वस्तूंची गरज आणि मागणी मात्र कायमच होती. त्याला जोड मिळाली ती कोरोनादरम्यानच्या दीर्घकालीन निर्बंधांची व त्यातच भर म्हणून जनसामान्यांमध्ये ‘कोविड-१९’च्या संदर्भातील आजार-निदान आणि उपचार यापोटी व्याप्त असणारी प्रचंड भीती. यातूनच फार मोठ्या संख्येने लोकांनी घराबाहेर न पडताच, घरपोच वस्तू-सेवा पुरवण्याचा पर्याय निवडला व त्याला वाढता प्रतिसाद मिळत गेला व ‘ई-कॉमर्स’ व्यवसायाला अशाप्रकारे ‘अच्छे दिन’ प्राप्त झाले.


ग्राहकांच्या विविध वस्तूंची सेवा घरपोच देण्याच्या या गरजांमध्ये ‘ई-कॉमर्स’ क्षेत्राने मोठी व्यावसायिक संधी हुडकून काढली. त्यासाठी आवश्यक असणारे कर्मचारी त्यांना तसे सहजगत्या मिळाले. कारण, त्यादरम्यान अनेक छोटे-मोठे व्यवसाय बंद होते अथवा मर्यादित स्वरूपात सुरू होते. त्यामुळे अनपेक्षितपणे बेकारीचा सामना कराव्या लागलेल्या या कर्मचार्‍यांना घरपोच सेवेच्या कामाद्वारे काही प्रमाणात का होईना; पण पर्यायी रोजगाराच उपलब्ध झाला. त्यादरम्यान कुरिअर-पार्सलसेवा पूर्णपणे बंद झाली होती व ते काम करणार्‍या कुरिअर कर्मचार्‍यांची चपखल सेवा ‘ई-कॉमर्स’ कंपन्यांच्या नेमकी कामी आली. कारण, कुरिअर कर्मचार्‍यांना त्यांच्या शहर-क्षेत्रातील सर्व ठिकाणे आणि पत्ते नेमके माहीत असतात. व्यावसायिक निर्णयाच्या संदर्भात पण एक अक्षम व समर्थ पर्याय या निमित्ताने पुढे आला. अनेकांची गरज भागली, तर अनेकांचे संसार सावरले गेले.कोरोनाकाळात व नंतरच्या शिथिलतेमुळे विविध उद्योग-व्यवसायांना मोठ्या मंदीचा सुमारे वर्षभर सामना करावा लागला असताना, त्याचदरम्यान आणि विविध स्वरूपातील बंदी या आव्हानात्मक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणि एका वेगळ्या व्यावसायिक संदर्भात ‘ई-कॉमर्स’ प्राप्त केलेले व्यावसायिक यश आगामी काळासाठी व्यवस्थापन आणि व्यावसायिक संदर्भात दिशादर्शी ठरणारे आहे.


- दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर व व्यवस्थापन सल्लागार आहेत.)
९८२२८४७८८६

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121