‘फिल्म डिव्हिजन’मध्ये ‘सेट डिझायनर’ ते स्वयंभू हनुमान मंदिराचे विश्वस्त, हरहुन्नरी नकलाकार ते समाजचिंतक, असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व शंकर मोरे यांच्या आयुष्याचा घेतलेला मागोवा...
गिर गिर के मुसीबत में
संभलते ही रहेंगे
जल जाएं मगर
आग पे चलते ही रहेंगे...
“जीवनात संघर्ष असतोच; पण त्या नकारात्मक परिस्थितीवर स्वार होऊन आयुष्यात खंबीर उभे राहायलाच हवे. प्रयत्न करा, परिस्थिती बदलेलच,” शंकर मोरे सांगत होते. विक्रोळी कन्नमवारनगरमध्ये राहणारे शंकर मोरे हे ‘फिल्म डिव्हिजन’मध्ये ‘सेट डिझायनर’ म्हणून काम करतात. विक्रोळीमध्ये स्वयंभू हनुमान मंदिर म्हणजे आस्थेचे आणि श्रद्धेचे प्रतीक. स्वयंभू हनुमान मंदिर, एक जागृत देवस्थान. या मंदिराच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम चालवले जातात. त्यातला मुख्य आणि प्रत्यक्ष उपक्रम म्हणजे या मंदिरात भजन कीर्तनाच्या माध्यमातून धर्मजागरण, लोकजागरण केले जाते. याच माध्यमातून इथे जवळ जवळ १५ तरुण कीर्तनकार झाले आहेत. या कीर्तनाच्या माध्यमातून तरुण समाजाच्या विविध समस्येवर भाष्य करतात, तर या देवस्थानाचे शंकर मोरे हे ट्रस्टी. त्यांचे वडील अनंत हे या मंदिर समितीचे अध्यक्ष होते.
आता कोरोनाकाळात विवाह करण्यासाठी हॉल उपलब्ध नाहीत. अशा वेळी या मंदिराचे सभागृह हिंदू आणि बौद्ध पद्धतीच्या विवाह सोहळ्यासाठी खुले केले आहे. तसेच गरजू गरिबांना महिनाभर पुरेल इतके रेशनही वितरित करण्यात आले. कोरोनाच्या हाहाकारात एक अचैतन्य वातावरण आहे. पण, याही परिस्थितीमध्ये मंदिर आणि सामाजिक बांधिलकीच्या बंधातून हे उपक्रम राबविले जातात. कारण, शंकर यांना सामाजिक जाण जात्याच आहे. त्यामुळे ट्रस्टी म्हणून काम करताना मंदिराबरोबर समाज जोडला जावा, असा त्यांचा प्रयत्न असतो. ते सांगतात की, “माझ्यासोबत माझे सहकारी आणि अन्य पदाधिकारी असतात, त्यामुळे सामाजिक कार्यात अडथळा येत नाही.”‘फिल्म डिव्हिजन’मध्ये सुतार म्हणून नोकरी लागलेले शंकर मोरे आज ‘सेट डिझायनर’ आहेत. हे काही नुसत्या प्रमोशनची फळं नाहीत, तर त्यापाठी शंकर यांची प्रचंड मेहनत आहे. तसेच ते ज्येष्ठांसाठी काम करणार्या ‘प्रभात मंडळा’चे ते आजीवन सदस्यही आहेत.
शंकर यांचे वडील अनंत मोरे हे मूळचे मानगाव घरोशी गावचे. गावात थोडी शेतीभाती. अल्पशिक्षित जरी असले तरी अनंत हे हरहुन्नरी होते. ते माळकरी होते. त्यांची पत्नी सुनंदा अत्यंत धार्मिक गृहिणी. वयाच्या सोळाव्या वर्षी १९४७ सालच्या आसपास अनंत मुंबईला जेजे हॉस्पिटलमध्ये काम करणार्या आपल्या नातेवाइकांकडे आले. तिथे गावचे अमृत कलमकर होते. ते अनंत यांना जेवण द्यायचे. रात्री अनंत रस्त्यावर झोपायचे. काही महिन्यानंतर त्यांना जेजे हॉस्पिटलमध्ये बदली कामगार म्हणून चतुर्थ श्रेणीची नेाकरी लागली. काही वर्षाने ते तिथेच ‘परमनंट’ झाले. तिथेच चतुर्थ श्रेणी कामगारांचे युनियन लिडरही झाले. त्यावेळी सुनंदा गावी नणंदेसोबत राहायच्या. पुढे त्याही छोट्या लेकीला घेऊन मुंबईत आल्या. अत्यंत काटकसरीने त्यांनी ३०० रुपयाला झोपडी विकत घेतली. जेजे हॉस्पिटलच्या आवारालगतची झोपडी उठवली गेली आणि मोरे कुटुंबाला कन्नमवार नगरमध्ये घर दिले गेले.
१९६०च्या दशकातला विक्रोळी कन्नमवार परिसर तसा अप्रगतच. अनेक समस्या. या परिस्थितीमध्ये आपल्या मुलांनी चांगले नागरिक बनावे, यासाठी मोरे दाम्पत्याने खूप कष्ट केले. शंकर यांना लहानपणापासून सुतारकामाची आवड. सिनेमातली दृश्य बघताना नायक-नायिकेपेक्षा त्यांचे लक्ष त्या सेटकडे असे. त्यावेळी त्यांना वाटायचे की आपणही असे सिनेमाचे सेट बनवायचे. शंकर अभ्यासात जेमतेम असले तरी आवाज गोड होता, नकला बेमालूमपणे करत. १९७५च्या आसपास राज्य सरकारच्या कामगारांचा ५६ दिवसांचा संप झाला आणि मोरे कुटंबाला गरिबीने भयंकर त्रासले. एका प्रसंगाने शंकर यांना वाटले की, आपण आयुष्यात काही तरी बनले पाहिजे, परिस्थिती बदलली पाहिजे. ते असे एकदा हट्ट करत होते. त्यावेळी त्यांच्या आई आत डोळे पुसत शंकर यांना म्हणाल्या, “तुझे बाबा किती कष्टाचे काम करतात. तुझ्या चार आत्यांचे लग्न करण्यासाठी त्यांनी कर्ज काढले. ते फेडत असल्यामुळे तुझ्या मागण्या पूर्ण करू शकत नाही.” आईच्या डोळ्यातली ती आसवं पाहून आणि परिस्थिती ऐकून शंकर अंतर्बाह्य बदलले. दहावीला असताना त्यांचे वडील निवृत्त झाले. पण, मुलाचे शिक्षण पूर्ण करावे म्हणून ते मग पुन्हा ‘पार्ट टाईम’ नोकरी करू लागले.
लवकर कामाला लागता यावे म्हणून मग शंकर यांनी ‘आयटीआय’मध्ये सुतार कोर्सला प्रवेश घेतला. परीक्षा दिली. ‘अप्रेंडिसशिप’ही केली. त्या काळात पैसे मिळावे म्हणून ते स्टेज शो करू लागले. ‘मिमिक्री’, ‘स्टॅण्डअप कॉमेडी’ वगैरे ऑर्केस्ट्रामध्ये करू लागले. हे सगळे करत असताना ते विकास रात्रमहाविद्यालयात बारावीपर्यंत शिकले. पुढे अनेक छोट्या-मोठ्या नोकर्या केल्या. अशातच त्यांना ‘एमप्लॉयमेंट’कडून पोलीस, ‘बीएआरसी’ आणि ‘फिल्म डिव्हिजन’चे नोकरीसाठी कॉल आले. जे स्वप्न पाहिले ते पूर्ण करता येईल म्हणून त्यांनी ‘फिल्म डिव्हिजन’मध्ये सुतार म्हणून नोकरी स्वीकारली. तो क्षणही आला त्यांना ‘सेट डिझायनर’ म्हणून कामात बढती मिळाली. शंकर म्हणतात की, “स्वामी विवेकानंदांनी सांगितले आहे की, उठा, जागा जोपर्यंत लक्ष्य पूर्ण होत नाही, तोपर्यंत थांबू नका. हे वचन समाजातील युवकांनी अंगीकारले, तर ते आयुष्यात निर्भेळ आणि निष्पाप यश मिळवू शकतात. मात्र, कष्टाला पर्याय नसतो हे लक्षात ठेवावे.”