रत्नागिरी : जिल्ह्यात सरसकट सर्वांच्याच रॅपिड अँन्टीजन टेस्ट केल्या गेल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत असून सर्वसामान्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शांत डोक्याने विचार करून आरटी-पीसीआर वर भर द्यावा. जेणेकरून आरोग्य यंत्रणेवरील ताण आणि जनतेतील भीती कमी होईल, अशा सूचना माजी खासदार निलेश राणे यांनी जिल्हाप्रशासनाला पत्रकारांशी बोलताना केल्या आहेत.
ते म्हणतात, ज्या अँन्टीजेन टेस्ट मधून सर्वाधिक चुकीचा रिझल्ट येण्याची शक्यता आहे, जिल्ह्यात या चाचण्या सरसकट करण्यापेक्षा खात्रीशीर असलेल्या 'आरटी-पीसीआर' टेस्टच कराव्यात. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या १५ दिवसात अचानक रुग्णसंख्येत वाढ झाली असून सर्वाधिक रुग्णसंख्या रॅपिड अँटीजेन टेस्ट केल्याने आढळून आले आहेत. मुळात कोरोनासाठी तीन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. ज्यात एक आरटी-पीसीआर, दुसरी अँटीजेन आणि तिसरी अँटीबॉडी चाचणी यांचा समावेश आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)नेही सुरुवातीपासून कोव्हिडच्या चाचण्यांसंबंधी नियम बनवून दिलेत. आरटी-पीसीआर चाचणी ही कोरोनाचा संसर्ग झालाय की नाही हे खात्रीशीर पद्धतीने सांगू शकते. आयसीएमआरने या चाचण्यांना 'गोल्ड स्टँडर्ड' असं म्हटलंय. तुमच्या शरीरात कोरोनाचा संसर्ग कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात असला तरी तो या टेस्टमार्फत कळू शकतो. रत्नागिरी जिल्ह्यात आरटी-पीसीआरसाठीची करोडो रुपये खर्चून उभारलेली यंत्रणा पूर्ण क्षमतेने वापरावी, असं निलेश राणे यांनी सांगितले.
याउलट रॅपिड अँटीजेन चाचण्यांचे आहे. या चाचण्यांमधून 'फॉल्स निगेटिव्ह' येण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे अँटीजेनमध्ये निगेटिव्ह आलेल्या व्यक्तीची आरटी-पीसीआर चाचणी सुद्धा करवून घ्यावी असं खुद्द आयसीएमीआरने सांगितल आहे. अशा परिस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यात विनाकारण सरसकट अँटीजेन टेस्ट होत आहेत, असेही निलेश राणे म्हणाले. तसेच पुढे ते म्हणतात, रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून शुक्रवारी सायंकाळी आलेल्या अहवालात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५१३ एवढी होती. त्यात ३४४ एवढे रुग्ण अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले. याशिवाय निगेटिव्ह रुग्णांची संख्या खूप आहे. या अँटीजेन चाचणीमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला असून जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करून आरटी-पीसीआर चाचणी वाढवली पाहिजे. त्यामुळे ताण देखील कमी होईल आणि जिल्ह्यातील सर्वसामान्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे तीही दूर होईल, असे निलेश राणे यांनी सांगितले आहे.