विरार येथील घटना ही नॅशनल न्यूज नाही, असे विधान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
मुंबई : विरार येथील घटना ही नॅशनल न्यूज नाही,असे विधान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. आणखी किती बळी हवे आहेत? असा संतप्त सवाल करतानाच या मंत्र्यांना पायउतार करा, असे प्रवीण दरेकर यांनी म्हंटले आहे.
विरारमधील एका रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिमेकडे विजय वल्लभ नावाचे कोव्हिड रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आज रात्री ३ ते ३.३०च्या दरम्यान भीषण आग लागली. यावेळी रुग्णालयात ९० जण उपचार घेत होतं. तर आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास १७ रुग्ण उपचार घेत होते. यातील आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. यावर माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही बातमी राष्ट्रीय नाही असे असंवेदनशील वक्तव्य केले आहे. यावरूनच आता विरोधी पक्ष भाजपने संताप व्यक्त केला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही विरारमधील घटनेवर दु:ख व्यक्त केले. गेल्या सहा महिन्यातील ही पाचवी घटना आहे. प्रत्येक घटनेनंतर आपण चौकशी करू असे सांगतो. चौकशी केली पाहिजे. प्रत्येक वेळेस फायर ऑडिट करूअसेही सांगितलं जाते. पण केले जात नाही. रुग्णालयांवर ताण आहे. नवी व्यवस्था करायला हवी. सरकारने हॉस्पिटलला मदत केली पाहिजे. विरार ते नाशिकपर्यंतच्या घटना भयानक आहेत. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांबद्दल संवेदना आहे. विरारच्या घटनेची चौकशी करून या घटनेच्या मुळाशी जायला हवे. पुन्हा अशी घटना घडणार नाही, यासाठी प्रभावी पावले उचलली पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी राजेश टोपे यांच्यावरही टीका केली. टोपे यांचं विधान असंवेदनशीलतेचं लक्षण आहे. त्यांनी कोणत्या मानसिकतेत हे विधान केले माहीत नाही. अशा घटनांमध्ये संवेदनशील असावे. अशा प्रतिक्रिया देणं त्यांनी टाळले पाहिजे, असंही ते म्हणाले.