मुंबई (प्रतिनिधी) - वानरांमुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. तालुक्यातील वृक्ष संपदेने संपन्न असलेल्या ग्रामीण आणि दुर्गम भागात ही तोड केली जात आहे. यामध्ये कडुलिंब, जांभूळ, करंज, निलगिरी, आंबा, वड, पिंपळ, उंबर, काटेसावर अशी देशी झाडे कापण्यात आली आहेत.
शिराळा तालुक्यातील या वृक्षतोडीबाबत प्लॅनेट अर्थ फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर असे आढळून आले की, लोकांनी वानरांच्या त्रासाला कंटाळून ही वृक्षतोड केली आहे. शेतीच्या बांधावर असणारी मोठी झाडे तोडल्यानंतर वानरांचा त्रास कमी होईल, असे शेतकऱ्यांचे मत आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी बांधावरची आणि ओढया शेजारील मोठी झाडे विचार न करता तोडली आहेत. या प्रकारामुळे गावात असलेली सर्व झाडे नष्ट होत आहेत. तसेच माणूस आणि वानर यांच्यातील संघर्षाचे दृष्टचक्र वृक्षतोड करून थांबल्याचे दिसत नाही. कारण, यामुळे वानरांचे शेतीवरील हल्ले कमी होण्यापेक्षा अधिक वाढले आहेत. वानरांना उपलब्ध होणारे नैसर्गिक अन्न कमी झाल्यामुळे आणि त्यांचे नैसर्गिक अधिवास संपल्यामुळे वानरे जास्त प्रमाणात शेतीकडे आकर्षित होत आहेत.
वृक्षतोडीमध्ये प्रामुख्याने कडुलिंब, जांभूळ, करंज, निलगिरी, आंबा, वड, पिंपळ, उंबर, काटेसावर इत्यादी वृक्षांच्या तोडीचे प्रमाण जास्त आहे. आपल्या पूर्वजांनी बांधावर झाड का ठेवले होते याचा विचार करणे गरजेचे आहे. बांधावरील झाडावर असणाऱ्या मधमाश्या शेतीतील पिकांचे परागीभवन करतात, झाडावरील पक्षी शेतीवरील किडीचा नाश करतात, मोठी झाडे जमिनीची धूप थांबवतात, सुपीक माती टिकवून ठेवतात. तसेच उन्हाळ्यात शेतकऱ्याला बसण्यास सावली, फळे, लाकूड फाटा, आयुर्वेदिक औषधी उपयोग तसेच शेतीला आडोसा असे अनेक फायदे शेतीच्या बांधावरील मोठी झाडे करून देतात. पूर्वज्यांचे हे विचार नव्या पिढीने लक्षात घेतले पाहिजेत. शेतकऱ्यांनी आणि लाकूड तोड करणाऱ्या कंत्राटदारांनी तालुक्यात होणारी वृक्षतोड थांबवावी आणि पर्यावरण समतोल साधण्यास मदत करावी असे आवाहन प्लॅनेट अर्थ फाऊंडेशनचे उपाध्यक्ष आणि पर्यावरण अभ्यासक प्रणव महाजन यांनी केले आहे.