‘कोरोना’नंतरचे बदलते काम आणि कामगिरी!

    01-Apr-2021
Total Views |

covid _1  H x W


कोरोनाकाळात जवळपास सर्वच क्षेत्रातील एकूणच कामाकाजाच्या स्वरुपात लक्षणीय बदल झाले. तेव्हा, कोरोना नंतरचे बंदलते काम आणि व्यवस्थापकांच्या भूमिका याच्याविषयीचा आढावा घेणारा हा लेख...


कोरोनाकाळानंतर बहुतांश जणांचे काम, कामाचे स्वरूप, कामकाज आणि कामगिरी यामध्ये लक्षणीय व मोठे बदल झाल्याचे प्रकर्षाने जाणवते. या बदलांमधील लक्षणीय बाब म्हणजे तंत्रज्ञानावर आधारित संगणकीय व अद्ययावत अशा व्यवस्थापकीय व जबाबदारीच्या कामाला आता व्यक्तिगत क्षमतांसह महत्त्वाच्या अशा मानवीय पैलूंची आवर्जून जोड देण्यात येत आहे, हे विशेष. याच बदल आणि बदलांचा दृश्य भाग सध्या आपल्याकडील व्यवस्थापक आणि व्यवस्थापन या उभयतांमध्ये प्रकर्षाने दिसून येतो. परिणामी, विद्यमान व्यवस्थापकच नव्हे, तर विशेषतः नव्याने व्यवस्थापकीय वा जबाबदारीच्या पदांवरील उमेदवार-व्यक्तींची निवड करताना परंपरागत असे तंत्रज्ञान, कार्यपद्धती, अनुभव, संगणकीय पद्धतींचा अवलंब यांच्याच जोडीला उमेदवाराची व्यवस्थापकीय क्षमता-पात्रता पडताळून पाहण्यासाठी त्यांच्यातील निर्णय क्षमता, नेतृत्व गुण, परस्पर संबंध, आव्हानपर स्थितीत काम करणे, समस्यांचा मागोवा वा पडताळा घेऊन त्यावर उपयुक्त तोडगा काढणे व मुख्य म्हणजे, या सार्‍यासाठी आपल्या सहकार्‍यांना प्रत्यक्ष संपर्काविना म्हणजेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने मार्गदर्शन करणे, या बाबींवर विशेष भर देण्यात येत आहे. किंबहुना, नव्याने विशेषतः अधिकारी व्यवस्थापकपदांवर उमेदवारांची मुलाखत घेऊन त्यांची प्रत्यक्ष निवड करताना या महत्त्वपूर्ण मुद्द्यांना पूर्वी कधी नव्हे, एवढे महत्त्व प्राप्त होणे हीसुद्धा कोरोनाचीच करामत ठरली आहे.



साधारण कोरोनापूर्व काळात व्यवस्थापनक्षेत्रात विशेषत: व्यवस्थापक म्हणून काम करणार्‍यांसाठी त्यांचे काम आणि कामकाजाशी संबंधित आकडेवारी, त्याचे आकलन-विश्लेषण हे फार महत्त्वाचे समजले जायचे. व्यवस्थापकांसाठी त्यांच्या व्यक्तिगतच नव्हे, तर व्यावसायिक स्तरावरील निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित माहितीसह आकडेवारी अत्यंत महत्त्वाची मानली जात असे. विविध प्रकारच्या संगणकीय प्रणालींमुळे हे काम अधिक अचूक आणि उपयुक्त स्वरूपात केले जात असे. परिणामी, या सार्‍याच प्रक्रियेला मोठे महत्त्व लाभले होते. आता मात्र, या स्थिती आणि कार्यपद्धतीत मोठे बदल घडून आले आहेत. या बदलत्या व्यवस्थापन शैलीवर भाष्य करताना ‘केपीएमजी’ या विख्यात व्यवस्थापन सल्लगार कंपनीचे माहिती व्यवस्थापन व्यवसायप्रमुख सल्लागार अखिलेश तुटेजा यांच्यानुसार कोरोनानंतर विशेषतः कंपनीस्तरावर व उच्च व्यवस्थापन विषयक जबाबदारीचे काम करणार्‍यांसाठी केवळ विस्तृत, विश्लेषणपर व अद्ययावत माहिती असणेच पुरेसे नसून, या व्यावसायिक माहितीला कर्मचारी, पुरवठादार, ग्राहक, विविध संस्था इ.पर्यंत पोहोचविण्यासाठी संवाद क्षमता, कौशल्य मानवीय दृष्टिकोनासह उत्तम परस्पर संबंध या बाबींची फार गरज असते, या बाबी प्रकर्षाने जाणवल्या आहेत. त्यांच्या मते, ज्या व्यवस्थापकांकडे वर नमूद केलेली व्यवस्थापन कौशल्ये प्रभावीपणे होती, अशांनी कोरोनादरम्यानची विविध आव्हाने आणि समस्यांवर यशस्वीपणे मात केलेली आहे.

त्यामुळेच ‘केपीएमजी’ इंडियाने आपल्या व्यवस्थापन सल्ला सेवा विभागात नव्याने व्यवस्थापकांची निवड-नेमणूक करताना आता उमेदवारांच्या मुलाखतस्तरावर त्यांच्या शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक प्रशिक्षण, संगणकीय क्षमता यांच्याच जोडीला त्यांच्या व्यवस्थापन विषयक क्षमता-पात्रतेची पडताळणी परखून घेण्यावर आता विशेष भर दिला जात आहे. कंपनीच्या व्यवस्थापक निवडीच्या संदर्भातील या महत्त्वपूर्ण बदलाची पार्श्वभूमी म्हणजे कोरोनाने व्यवस्थापक आणि व्यवस्थापन या उभयतांमध्ये पात्रता-क्षमता यांच्या जोडीलाच कामकाजातील व्यावहारिक लवचिकता ही बाब प्रामुख्याने अधोरेखित झाली आहे व त्याचाच हा परिणाम आहे. कर्मचारी-व्यवस्थापकांच्या निवडप्रक्रियेत प्रामुख्याने व विशेष भूमिका आणि जबाबदारी बजावणार्‍या ‘एचआर’ विभागानेही कोरोनाच्या निमित्ताने व्यवस्थापनक्षेत्रात घडून आलेल्या बदलांची वेळेत नोंद घेऊन त्यानुरूप आपले काम आणि बदल केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. ‘एचआर’ विभागाच्या कामकाजात कोरोनादरम्यान कर्मचारी, कामगारांशी निगडित विविध आव्हानपर समस्या, निर्बंध, अडचणी, प्रशासकीय अडचणी व त्यांची सोडवणूक व एवढेच नव्हे, तर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती वैद्यकीय मदत, सल्ला व समुपदेशन अशा प्रकारची स्थित्यंतरे झाली असून, ही बदल प्रक्रिया आता कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या टप्प्यावर पण सुरूच आहे. मुख्य म्हणजे, व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ज्या कंपन्यांमधील ‘एचआर’ विभाग व व्यवस्थापकांनी वरील बदलांचा वेळेत व परिणामकारक स्वरूपात अवलंब केला, अशा कंपन्यांमधील कर्मचारी-व्यवस्थापन या उभयतांना त्याचा फायदा झाला असून त्यांनी कोरोनावर प्रभावीपणे व यशस्वी स्वरूपात मात केलेली दिसते.
या संदर्भात ‘आयबीएम’चे भारत व दक्षिण आशिया क्षेत्रीय ‘एचआर’प्रमुख चैतन्य श्रीनिवास यांच्या मते, आता या बदललेल्या स्थितीत व्यवस्थापकाला बदलाचे व्यवस्थापन यशस्वीपणे करणे ही बाब अपरिहार्य ठरते. याशिवाय या मंडळींकडे अनपेक्षित उद्भवणारी व्यावसायिक- व्यावहारिक स्थितीचा सामना करणे, गरजेनुरूप लवचिक निर्णय घेऊन स्थिती नियंत्रित करणे, या बाबीही विशेष महत्त्वाच्या झाल्या आहेत. श्रीनिवास यांच्यानुसार कोरोनाकाळातील या महत्त्वपूर्ण बदलांमुळे कंपनीअंतर्गत ‘एचआर’ विभागाची भूमिका व जबाबदारीसुद्धा बदलली असून, त्यांना आता व्यवस्थापनांतर्गत सल्लागार-मार्गदर्शकांची भूमिका प्रभावीपणे पार पाडावी लागणार आहे.

याशिवाय आता कर्मचार्‍यांची निवड-नियुक्ती करताना त्यांच्यात शैक्षणिक पात्रता- अनुभव, कामकाज विषयक क्षमता यांच्याच जोडीला आव्हानपर भूमिका घेऊन व्यावसायिक गरजांनुरूप नव्या संदर्भासह-नव्या स्वरूपात काम करण्याची क्षमता पडताळून त्यानुरूप त्यांची निवड करण्यावर भर दिला जात आहे. बहुराष्ट्रीय कंपनी असणार्‍या ‘सनलाईफ एएससी’ (आशिया सर्व्हिसेस) या कंपनीने तर वरील निकषांसह कर्मचार्‍यांची निवड करताना त्यांची मुलाखतपूर्व मानसशास्त्रीय चाचणीची नवी पद्धत सुरू केली, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे. यासंदर्भात ‘सनलाईफ एएससी’चे ‘एचआर’ विभागाचे मुख्याधिकारी राजीव भारद्वाज यांच्यानुसार आज व्यवसाय-व्यवस्थापन पद्धती यशस्वीपणे राबविण्यासाठी कंपनीपासून कर्मचार्‍यांपर्यंत सार्‍यांसाठी केवळ कार्यक्षमच नव्हे, तर त्वरित वा तातडीने काम करणेही तेवढेचे आवश्यक व महत्त्वाचे ठरते. त्याच वेळी या बाबी वैयक्तिक स्तरापासून व्यवस्थापनापर्यंतच्या सर्वच टप्प्यांवर होणे आवश्यक असून, कर्मचार्‍यांची मानसिकता त्यानुरूप बदलणे ही ‘एचआर’ व्यवस्थापनापुढील महत्त्वाची बाब ठरते. नजिकच्या भविष्यकाळात ही बाब व्यवस्थापक आणि व्यवस्थापन या सार्‍यांसाठी अत्यावश्यक जबाबदारी ठरणार आहे, हे निश्चित.

या सार्‍या पार्श्वभूमीवर ‘आयबीएम इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस व्हॅल्यूज’ या व्यवस्थापनक्षेत्रातील प्रथितयश संस्थेने केलेल्या व्यापक सर्वेक्षणाद्वारे कोरोनानंतरचा व्यवसाय, तंत्रज्ञान, कार्यपद्धती, व्यावसायिक आव्हाने व अस्थिरता, आर्थिक निकड, व्यवस्थापनचक्रातील झालेले बदल, कर्मचार्‍यांच्या मनातील भीती व साशंकता या सार्‍यांवर ऊहापोह केला गेला व त्यानुरूप कंपन्यांच्या मुख्याधिकार्‍यांची मते आणि मनोगत जाणून घेतले. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सर्वाधिक म्हणजेच 35 टक्के मुख्याधिकार्‍यांनी विशेषत्वाने नमूद केल्यानुसार कोरोनानंतरच्या अनपेक्षितपणे बदललेल्या व्यावसायिक परिस्थितीत कर्मचार्‍यांपासून कंपनी-व्यवस्थापनापर्यंत सर्वच स्तरांवर मर्यादित स्वरूपातच नव्हे, तर दीर्घकालीन संदर्भात आव्हानपर पद्धतीने व दूरस्थ व्यवस्थापन स्वरूपात काम करणे ही एक अपरिहार्य निकड ठरलेली असून, देश-विदेश स्तरावरील या कंपनी मुख्याधिकार्‍यांमधील या सर्वेक्षणाने पण कंपनीअंतर्गत सर्वांचीच बदलती कामगिरी आणि काम यावर नव्या संदर्भासह शिक्कामोर्तब झाले आहे हे निश्चित.



- दत्तात्रय अंबुलकर 
(लेखक एचआर-व्यवस्थापनसल्लागार आहेत.)
९८२२८४७८८६