रेल्वेत रात्रीच्या वेळी मोबाईल चार्जिंग पॉईंट बंद करण्याचे हे आहे कारण..

    31-Mar-2021
Total Views |

indian railway_1 &nb


वाचा: काय आहे रेल्वेने काढलेला नवीन नियम!

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वे बोर्ड सतत नवनवीन गोष्टी करत असते. आताही भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या खबरदारीचा उपाय म्हणून नवीन सूचना जाहीर केल्या आहेत. रेल्वेने म्हटले आहे की, यापुढे मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या चार्जिंगसाठी करण्यात येणारा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

रात्रीच्या वेळी रेल्वेगाड्यांमध्ये लागणाऱ्या आगीच्या घटना रोखण्यासाठी खबरदारी म्हणून भारतीय रेल्वेने रात्रीच्या वेळी 'चार्जिंग पॉईंट'साठीचा वीजपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. नुकतीच १ मार्च रोजी देहरादून येथे जाणाऱ्या 'शताब्दी एक्स्प्रेसला 'शॉर्ट सर्किट' झाल्याने आग लागली होती, तर अवघ्या सहा दिवसांनंतर रांची स्थानकात मालवस्तूंच्या ट्रेनच्या इंजीनला भीषण आग लागली होती. तसेच लांबपल्ल्याच्या गाड्यांवरील किरकोळ आगीच्या अनेक घटना इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या जास्त चार्जिंगमुळे घडल्या आहेत. यादृष्टीने भारतीय रेल्वेचा हा निर्णय निश्चीतच प्रवासाच्या हिताचा आहे.


२०१४ मध्ये, बंगळुरू-हजूर साहिब नांदेड एक्स्प्रेसमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेनंतर लगेचच रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी रात्री ११ ते पहाटे ५च्या दरम्यान 'चार्जिंग पॉईंट' बंद करण्याची शिफारस केली होती. अखेर रेल्वे मंडळाने सर्व रेल्वे झोनला असे आदेश दिले आहेत.