हा पुरस्कार म्हणजे मेहनतीचे फळ : सावनी रवींद्र

    23-Mar-2021
Total Views |

Savani Ravindra_1 &n
 
 
मुंबई : सुमधुर गळ्याची प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र यांना '६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात 'बार्डो' चित्रपटातील 'रान पेटलं' या गाण्यासाठी 'सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका' पुरस्कार जाहीर झाला. यामुळे त्यांचे मराठी चित्रपटसृष्टीत, तसेच सर्व गायन क्षेत्रातील कलाकारांकडून प्रचंड कौतुक होत आहे. त्यांनी यापूर्वी मराठी, हिंदी, तामिळ, पंजाबी अशी विविध भाषांतील गाणी गायली आहेत.
 
 
आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका सावनी रवींद्र राष्ट्रीय पुरस्काराविषयी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतात की, "मला झालेला आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतील, आजपर्यंतच्या इतक्या वर्षांच्या प्रामाणिकपणे केलेल्या मेहनतीचे फळ देवाने आज मला दिले आहे. माझ्या सर्व गुरुजनांचे आशीर्वाद, माझ्या आई-वडिलांचे कष्ट याचा यामध्ये खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आजवर माझ्या आयुष्यात यश संपादन करू शकले. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे आता जबाबदारी वाढली आहे. आजवर मी ज्या पद्धतीने गाणी गायली, त्याहीपेक्षा अजून जास्त मेहनत करून प्रेक्षकांना आवडतील अशी उत्तमोत्तम गाणी गाण्याचा मी कायम प्रयत्न करेन."
 
 
'बार्डो' चित्रपटातील 'रान पेटलं' या गाण्याविषयी अनुभव सांगताना त्या म्हणाल्या की, "बार्डो हा चित्रपट अजून प्रदर्शित झालेला नाही. स्वप्नांवर आधारित असलेल्या 'बार्डो' या चित्रपटाचे दिग्दर्शन भीमराव मुडे यांनी केले आहे. या चित्रपटातील 'रान पेटलं' हे गाणे प्रचंड वेगळे आहे. या गाण्याला आघाडीचे प्रसिद्ध संगीतकार रोहन-रोहन यांचे संगीत लाभले आहे. या गाण्याची विशेषता म्हणजे, हे गाणे रेकॉर्ड करताना संगीतकार रोहन-रोहन यांनी माझ्या मूळच्या टोनमध्ये बदल करून ग्रामीण पद्धतीच्या आवाजात गाणे गाऊन घेतले. मी आजवर रोमॅंटिक, भावनिक अशा पद्धतीची गाणी माझ्या नैसर्गिक आवाजात गायली आहेत. परंतु, यावेळी आवाजाचा पोत बदलून ग्रामीण पद्धतीत गायन करू शकते, हा विश्वास त्यांनी मला दिला आणि एक वेगळी कलाकृती निर्माण झाली. मला अजूनही तो क्षण आठवतो, जेव्हा संगीतकार रोहन-रोहन यांच्या घरच्या सेटपवर हे गाणे आम्ही रेकॉर्ड केले होते. अत्यंत भावूक करणारे हे गाणं आहे.''
 
 
पुढे त्या म्हणाल्या की, ''आयुष्यात पहिल्यांदा मिळालेला पुरस्कार सर्वात खास असतो. मला आजपर्यंत विविध ठिकाणी नामांकन मिळाली. पण, पुरस्कार कधी मिळाला नव्हता. मी, गायलेल्या गाण्यासाठी, मला पुरस्कार मिळावा या प्रतीक्षेत मी होते आणि तो क्षण आलाच; मी गायन केलेल्या 'रान पेटलं' या गाण्यासाठी मला पहिल्यांदाच 'राष्ट्रीय पुरस्कार' मिळाला. त्यामुळे हा पुरस्कार माझ्यासाठी खूप जास्त खास आहे. मी ईश्वराची, प्रेक्षकांची आणि माझ्या सर्व गुरुजनांची कायम ऋणी असेन."