पहिली ते नववी व ११ वीच्या लाखो विद्यार्थ्यांच्या परिक्षा बाबत निर्णय घ्यावा
अनिल बोरनारे यांची शासनाकडे मागणी
संग्रहित फोटो
डोंबिवली : दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्याचे शासनाने निश्चित केले आहे मात्र पहिली ते नववी तसेच अकरावीच्या लाखो विद्यार्थ्यांबाबत शासन नेमके काय करणार आहे असा सवाल करीत याविषयीचा संभ्रम दूर करण्याची मागणी भाजपा शिक्षक सेल प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल बोरनारे यांनी केली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा बंद होत्या त्यामुळे ऑनलाईन अध्यापन शिक्षक करीत होते . ऑनलाईन वर्गाला केवळ ३० ते ४० टक्के विद्यार्थी हजर राहत होते. ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी सुविधा नसल्याने असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले अशा विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभागाने कोणतेही ठोस निर्णय घेतले नाही .कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच मुंबई ठाणे वगळता राज्यातील अनेक भागात शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु मागील १५ दिवसांपासून ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे अनेक जिल्ह्यातील शाळा बंद झाल्या आहेत.
त्यातच शिक्षकांचा ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण झाला असून परीक्षा घ्यायच्या की नाहीत ? ऑनलाईन शिक्षण न घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत काय करावे असे अनेक प्रश्न शिक्षक, मुख्याध्यापकांना पडले आहेत. त्यातच पुढील महिन्यापासून १० वी १२ वीच्या परीक्षा सुरू होतील. राज्यात विशेषतः मुंबई, ठाणे व कोकणात उन्हाची तीव्रता वाढत असून विद्यार्थ्यांच्या परिक्षांबाबत कोणता निर्णय घ्यावा असाही प्रश्न शाळा प्रशासनाला पडला असून याबाबत शासनाने स्पष्ट निर्देश देण्याची गरज असल्याचे बोरनारे यांनी सांगितले.