अन्यथा आंदोलन करण्याचा भाजपचा इशारा
मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळासाठी पाचशे कोटींचा निधी द्या, अशी मागणी या महामंडळाचे माजी अध्यक्ष व भाजपा नेते अमित गोरखे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. गोरखे यांनी सांगितले की, 'अनुसूचित जातीतील मातंग समाज व इतर पोट जातीतील समाजासाठी अस्तित्वात आलेले महामंडळ आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकार मध्ये झालेल्या मोठया भ्रष्टाचारामुळे हे महामंडळ आजतागायत सावरू शकलेले नाही.'
अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात उपरोक्त महामंडळाला शंभर कोटी देण्याची घोषणा केली. मात्र, हा निधी अपुरा आहे. भागभांडवल निधी संपुष्टात आल्यामुळे महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये महामंडळाच्या हिश्याची रक्कम (महामंडळाचा सहभाग निधी) बँकांकडून मंजूर झालेल्या कर्ज प्रकरणांमध्ये कर्ज व अनुदान वितरण करता येत नाही.
राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ मर्या. नवी दिल्ली (एन.एस.एफ.डी.सी.) यांचेकडून घेतलेल्या कर्जापोटी रक्कम ९४ कोटी या महामंडळाकडे थकीत असून, मागील दहा वर्षापासून त्यांचेकडून या महामंडळास वित्त पुरवठा करणे बंद आहे. त्यामुळे या महामंडळासाठी पाचशे कोटींचा निधी राज्य शासनाने द्यावा.एवढा निधी न दिल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशाराही गोरखे यांनी दिला.