मुंबई : राज्यात रोज कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण वाढवण्यासाठी केंद्र वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. या व्यतिरिक्त केंद्र सरकारने महाराष्ट्राला दर आठवड्याला 20 लाख डोस द्यावे, अशीही मागणी त्यांनी केंद्राकडे केली आहे.
याबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले की, राज्य सरकारने केंद्र सरकारकडे 367 लसीकरण केंद्रांची मागणी केली आहे. यातील 209 केंद्राना परवानगी देण्यात आली असून, इतरच्या केंद्रांनाही परवानगी देणे गरजेचे आहे. शिवाय, सरकारने लसीकरण केंद्रासाठी 100 बेडच्या रुग्णालयाची जी जाचक अट घातली आहे, ती रद्द करावी आणि 50 पेक्षा कमी बेडची संख्या असलेल्या
रुग्णालयांनाही लसीकरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केल्याचेही टोपेंनी सांगितले.
राज्यात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेसाठी केंद्र सरकारने कोरोना लसीचे 2.20 कोटी डोस पुरवावेत, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात टोपे यांनी नमूद केले आहे की, आठवड्याला 20 लाख डोस पुरवावेत. राज्यात 45 वर्षांवरील आजारी लोक आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना डोस देण्यासाठी येत्या साडेतीन महिन्यांत 2.20 कोटी डोसची गरज पडेल.