मुंबई: ग्राहक हक्कांबद्दल तसेच ग्राहक तक्रार निवारण आयोगाबद्दल लोकांना पुरेशी माहिती नाही. या संदर्भात व्यापक जनजागृतीची गरज असून समाजातील सुज्ञ लोकांना ग्राहक जनजागृतीच्या कार्याशी जोडले गेले पाहिजे असे सांगून पिडीत ग्राहकांना शीघ्र गतीने न्याय मिळण्यासाठी राज्यातील ग्राहक न्यायालयांचे बळकटीकरण केले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. जागतिक ग्राहक दिनानिमित्त राज्य ग्राहक न्यायालयातर्फे आयोजित चर्चासत्राला संबोधित करताना राज्यपाल बोलत होते.
आज पारंपारिक दुकानांशिवाय ई-कॉमर्सच्या माध्यमातून लोक वस्तू विकत घेत आहेत. अनेकदा ग्राहकांना नवनवीन अडचणी येत असतात परंतु त्यांचे निवारण कसे व कुठे करायचे हे त्यांना माहिती नसते. ग्राहक न्यायालयांनी केवळ न्यायदानाचे काम न करता व्यापारात नैतिकतेचा आग्रह धरला पाहिजे असे त्यांनी सांगितले. ग्राहक न्यायालयांनी इंग्रजीचा वापर न करता स्थानिक भाषेत कार्यालयीन कामकाज करावे अशीही सूचना राज्यपाल कोश्यारी यांनी केली.
राज्यात विविध स्तरावर फसवणूक झालेल्या ग्राहकांना न्याय मिळविण्यासाठी न्याय व्यवस्था उपलब्ध आहे. केंद्राने ग्राहक संरक्षणासाठी चांगले कायदे केले आहेत. दिवंगत बिंदुमाधव जोशी यांनी ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून ग्राहकांच्या हक्कासाठी मोठे काम केल्याचे स्मरण देऊन राज्यातील ग्राहक न्यायालयांनी न्यायदानाबाबत नवी दिशा दिली पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.