‘सत्तातुराणां न भयं न लज्जा’ असे वचन सध्या महाराष्ट्रात चांगलेच प्रचलित झाले आहे. म्हणूनच तर शिवसेना पक्षाची आणि कट्टर मुस्लीम पंथाचे पाईक असलेल्या एमआयएम पक्षाची अमरावतीमध्ये युती झाली. तथापि, कोणत्याही थराला जाऊन, असंगाशी संग करुनही अमरावतीमध्ये स्थायी समितीचा अध्यक्ष भाजपचाच झाला. पण तरीही या युतीकडे गांभीर्याने पाहायला हवे. तीन पिढ्या ज्यांनी उभे आयुष्य शिवसेनेच्या आंदोलनात घालवले, मोर्चांमुळे तुरूंगात तरुणपण काढलेल्या त्या खर्या शिवसैनिकाला काय वाटत असेल? आता काही लोक म्हणतील, मग काय झाले? बाळासाहेब असतानाही शिवसेनेने एकेकाळी ‘मुस्लीम लीग’शी युती केली होती. केली असेल, पण त्यानंतर पुढच्या काळात कधीही बाळासाहेबांनी त्या युतीबद्दल गौरवोद्गार काढले का? उलट शिवसेनेने भारतीय जनता पक्षाशी युती केल्यानंतरच दोन्हीही पक्षांचे महाराष्ट्रात सुवर्णयुग सुरू झाले. 2019चे शिवसेना आमदार कुणामुळे जिंकून आले हे सत्य तर जगजाहीर आहे. आता यावर काहीजण म्हणतात, भाजपने नाही का काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्तींशी युती केली होती! यावर एकच म्हणणे आहे की, महाराष्ट्रातील मराठमोळा अमरावती जिल्हा आणि त्यावेळी पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यामुळे होरपळून निघालेले काश्मीर यांची तुलना कधीही करता येणार नाही. कारण काश्मीरमध्ये भाजपची निवडणुकोत्तर सत्ताही आली होती. दुसरीकडे अमरावती महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीमध्ये सभापती निवडून येण्यासाठी शिवसेनेला इतकी तडजोड करावी लागत असेल आणि इतके करूनही पदरी हारच पडत असेल तर मग काय बोलावे? देवलोकांमध्ये इंद्राची राजधानी असलेला अमरावती जिल्हा, सातवहन राजाच्या सत्तेची राजधानी. त्या अमरावतीमध्ये आता एमआयएम-शिवसेनेची युती झाली. ते म्हणतात ना, ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या वाण नाही, पण गुण लागला. शिवसेनेच्या या युतीमुळे दिल्लीच्या मॅडम आणि बारामतीचे काका खूश झाले असतील. कारण, त्यांचे काम फत्ते झाले. ‘आम्हाला हिंदुत्व शिकवू नका’ म्हणणारे सत्तेसाठी हिंदुत्वाला बासनात बांधायला तयार झाले. भगवा ते हिरवा प्रवास मुबारक हो...!
माओकडे गेले की काय?
भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले म्हणून पश्चिम बंगालमध्ये ‘कौशिक कर’ या नाट्यकलाकाराला नाटकातून बाहेर काढले आहे. सौरव पालोदी हा कम्युनिस्ट पक्षाचा समर्थक ‘इचामोटो’ नावाचे थिएटर चालवतो. त्याने उत्पल दत्ता लिखित ‘घुमनी’ नाटकातून कौशिक यांना काढून टाकलेे. सौरव पालोदी याने कारण सांगितले की, कौशिकने भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व घेतले आहे. सौरव पालोदी याच्या समर्थनार्थ कम्युनिस्ट पक्ष पुढे आला. ज्यांना पश्चिम बंगालचे राजकारण माहिती आहे, त्यांना कळेलच की, हिंसा, दडपशाही याचा वापर करत कम्युनिस्ट पक्ष लोकांच्या मनात भीती उत्पन्न करतो. लोकांना लाचार-मजबूर करतो की, त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या म्हणण्यानुसार वागावे. आजही पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे राज्य असले तरी कम्युनिस्टांच्या हिंसेमध्ये काही कमी आलेली नाही. प. बंगालच्या प्रमुख महाविद्यालयांमध्ये, विद्यापीठांमध्ये एनकेनप्रकारेण प्रवेश मिळवून तेथील विद्यार्थ्यांच्या मनात समाज-संस्कृती-धर्म आणि देशाबद्दल विद्रोह पेरायचा काम ते करत असतात. कम्युनिस्ट कोणताच धर्म मानत नाहीत, असे सांगतात, पण हे सगळे थोतांड आहे. त्यांची प्रत्येक कृती हिंदू समाजाच्या विरोधातच आहे. प. बंगालमध्ये तर त्यांची कितीतरी वर्षे सत्ता होती. त्यावेळी कम्युनिस्ट विचारांनी ठार वेडे झालेल्या व्यक्तींना मोक्याच्या ठिकाणी पेरण्याची कामगिरी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. त्याची फळे आता प. बंगाल भोगत आहे. कविवर्य रवींद्रनाथ टागोर, नेताजी सुभाषचंद्र बोस हे प. बंगालचे मानबिंदू. पण हे दोघेही देशविरोधी संस्कृतीच्या विरोधात नव्हते. पण त्यांच्याच प. बंगालमध्ये कम्युनिस्ट देशविरोधी षड्यंत्र रचतात. स्वतंत्र भारतात प्रत्येक नागरिकाला सर्वच गोष्टींमध्ये स्वातंत्र्य आहे. ते स्वातंत्र्य कौशिक करलादेखील आहे. पण त्यांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य असहिष्णुपणे तेथील कम्युनिस्टांनी नाकारले. त्यांनी संविधानाचा अपमान केला. कम्युनिस्टांची टोळी समर्थक ‘डफली गँग’ महाराष्ट्रात सक्रिय आहे. आता यांच्या ‘डफल्या’ मोडल्या की ते माओकडे नरकात गेले? देवाकडे गेले असे म्हणत नाही. कारण, हे माओचे भक्त आहेत.
9594969638