अलीकडच्या काळात शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या घटू लागली आहे. निसर्गाचा ढासळणारा समतोल राखण्यासाठी ‘चिमणी वाचवा’ याविषयी जनजागृती करण्याचे काम चिमणीप्रेमी शैलेंद्र भगत करीत आहेत.
गावातील मातीत आणि निसर्गाच्या सान्निध्यात बालपण घालविलेल्या शैलेंद्र यांना लहानपणापासूनच चिमण्यांविषयी प्रेम वाटत होते. चिमण्यांविषयी असणारी आस्था अशीच सोडून न देता त्याबाबत जनजागृतीसाठी खारीचा वाटा उचलण्याचे काम शैलेंद्र करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले, तर काही प्रमाणात का होईना, चिमण्यांची संख्या वाढेल, अशी आशा त्यांना आहे. चिमणी हा माणसाच्या अगदी जवळचा पक्षी आहे. त्यांची संख्या आता कमी कमी होत आहे. त्यामुळे चिमण्यांची संख्या वाढविण्यासाठी जागतिक पातळीवरदेखील जनजागृतीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.
दि. २० मार्च हा ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी केवळ चिमण्यांबाबत जनजागृती केली जाते. शैलेंद्रदेखील या दिवसाच्या निमित्ताने चिमणी वाचविण्यासाठी प्रबोधन करीत असतात, पण ते केवळ एवढ्यावरच थांबत नाहीत. चिमण्यांची संख्या वाढावी, चिमण्या घरट्यात येऊन बसाव्यात, यासाठी ते स्वत:च्या हाताने चिमण्यांची घरटी तयार करतात. ही घरटी ते नागरिकांना विनामूल्य देत असतात. आतापर्यंत १५ ते २० हजार नागरिकांना त्यांनी या घरट्यांचे वाटप केले आहे. कल्याण, डोंबिवली, ठाणे जिथे शक्य आहे, त्याठिकाणी ते जनजागृती करीत असतात. यंदाच्या वर्षी कोरोनामुळे त्यांना प्रत्यक्षरीत्या जनजागृती करता आली नाही, तरी ते स्वस्थ बसणार नाहीत.
शैलेंद्र यांचे बीएस्सीपर्यंतचे शिक्षण झारखंड राज्यातील त्यांच्या मूळगावी झाले. १९९५ नंतर ते ठाकुर्ली येथे वास्तव्याला आले. ‘मॅनेजमेंट’चा अभ्यासक्रमही त्यांनी मुलुंडच्या ‘एमसीसी महाविद्यालया’तून पूर्ण केला. चिमणीप्रेम त्यांना लहानपणापासून होतेच. त्यामुळे घरातील खिडकीत ते चिमणीला दाणा-पाणी ठेवत असत. सुरुवातीला ५० चिमण्या खिडकीत येत होत्या. तरीही हळूहळू चिमण्यांची संख्या कमी कमी होऊ लागली आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यातूनच त्यांनी चिमण्यांची संख्या वाढावी, चिमण्या वाचाव्यात, यासाठी जनजागृतीचा वसा घेतला.
शैलेंद्र हे पवई येथील एका इंजिनिअरिंग कंपनीत काम करीत आहेत. आपली नोकरी सांभाळून जसा वेळ मिळेल तसे ते चिमण्या वाचविण्यासाठी खर्च करीत आहेत. हे काम त्यांनी २०११ला हाती घेतले आहे. सध्या केवळ सहा ते सात चिमण्या खिडकीत येतात. चिमणीप्रेमामुळे त्यांनी त्यांची माहिती मिळविण्यासाठी अनेक पुस्तकांचेदेखील वाचन केले आहे. शहरांमध्ये ‘मोबाईल टॉवर्स’मधून होणारे विद्युत चुंबकीय उत्सर्जन, आधुनिक प्रकारची घर बांधणी, घरट्यांच्या जागेची अनुपलब्धता, शहरातील वाढते प्रदूषण तसेच शेतात होणारा रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर यांसारख्या असंख्य कारणांमुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.
तसेच चिंच, बोर अशी मोठी झाडे नसल्याने चिमण्यांना आपली घरटी बनविता येत नाही. सध्या शहरात कावळा आणि कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्यामुळे चिमणी वाचविणे गरजेचे आहे. चिमण्यांचे अनेक प्रकार आहेत. पण ते सगळ्यांनाच माहीत आहेत असे नाही. ‘पीतकंठ चिमणी’ला ’रान चिमणी’देखील संबोधले जाते. ही चिमणी नाशिक शहराबाहेरील जंगल परिसरात आढळते. या चिमणीची शिकार केली जात असल्याने तिची संख्यादेखील कमी होऊ लागली आहे. चिमण्यांना पाहिल्यावर माणसांचे मन प्रफुल्लीत होत असते. म्हणून चिमण्या वाचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. सामान्य नागरिकसुद्धा आपले घर, कार्यालय, दुकाने, फॅक्टरी, बाल्कनी, सरकारी कार्यालये आणि पार्किंगच्या वरच्या जागेत चिमण्यांची कृत्रिम घरटी लावू शकतो.
जर्मनीमध्ये चिमण्यांची संख्या वाढावी, यासाठी मोकळ्या जागेतील उद्यानांमध्ये त्यांच्यासाठी घरटी बांधली जातात. डोंबिवलीतसुद्धा ‘स्पॅरो गार्डन’ विकसित केले आहे, पण त्यांची संख्या अजून वाढण्याची गरज आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेकडूनही पक्ष्यांसाठी पाणी ठेवले जात आहे. पण महापालिकेने घराच्या बाहेर, सोसायटीच्या आवारात आणि दुकानांच्या बाहेर झाडे लावून वर्षभर त्यांची देखभाल करण्यासाठी सांगितले पाहिजे, त्यांनी तशी नियमावलीच केली पाहिजे. प्रत्येक शाळेच्या, कार्यालयाच्या आवारात मोठी झाडे लावणे बंधनकारक केले पाहिजे. आपले शहर ‘ग्रीन झोन’ कसे होईल, हे पाहिले पाहिजे. चिमण्या आपल्यासाठी खूप उपयोगी आहे, हे माणसाने लक्षात घेऊन त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
ती केवळ पर्यावरणाचे रक्षण करण्याचेच काम काम करीत नाही. ती ‘प्रोस्परिटी’ वाढवते, पिकांवरील कीटक खाऊन उत्पादन चांगले येण्यासाठी मदत करते. वाया गेलेले अन्न खाऊन सफाई कर्मचार्यांसारखे काम करते. चिमणी स्वत: घरट्यामध्ये खरफूट टाकून अंडी घालते आणि सामान्य माणसाला हिंमत न हारण्यासाठी प्रेरणा देते. लहान मुलांनासुद्धा चिमणी पाहायला खूप आवडत असते. चिमण्यांचा गोड आवाज ऐकून तणाव दूर होतात, मनाला शांती मिळते, असेही शैलेंद्र यांनी सांगितले.
- जान्हवी मोर्ये