स्वप्नातील घर साकारणारे संजेश

    11-Mar-2021
Total Views |

sanjesh paatakar_1 &
कोरोनाचा जोरदार फटका इतर क्षेत्रांप्रमाणे बांधकाम व्यवसायालाही बसला. कोरोना काळात एकीकडे बांधकामासाठी मजुरांची कमतरता होती, तर दुसरीकडे बांधकाम साहित्यही उपलब्ध नसल्याने सामग्रीच्या किमतीही वधारल्या होत्या. पण, ग्राहकांना शब्द दिल्याप्रमाणे नियोजित वेळेत घराचा ताबा देण्याची कटिबद्धता ‘मनोरमा बिल्डर अ‍ॅण्ड डेव्हलपर्स’च्या संजेश पातकर यांनी या संकटकाळातही पाळली. तसेच मजुरांना अधिकची मजुरी देऊन काम पूर्ण करून घेतले. असे हे सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घर आणि तेही स्वस्त दरात साकारणारे संजेश पातकर हे बांधकाम व्यावसायिक म्हणूनच ‘कोविड योद्धे’ ठरतात.
संजेश पातकर हे ‘मनोरमा बिल्डर अ‍ॅण्ड डेव्हलपर्स’चे मालक. त्याचबरोबर इतर बांधकाम व्यावसायिकांसोबतही ते बांधकाम प्रकल्पांवर काम करतात. संजेश हे त्यांचे मोठे बंधू श्रीराम पातकर यांच्यासोबतच गेल्या २० वर्षांपासून बांधकाम व्यवसायात कार्यरत आहेत. बंधू श्रीराम यांच्याच मार्गदर्शनाखाली संजेश यांचा बांधकाम व्यवसायाचा विस्तार होत गेला. एका इमारतीपासून सुरु केलेल्या कामानंतर हळूहळू संजेश यांचा आत्मविश्वास दुणावत गेला आणि आजघडीला त्यांनी पन्नासएक मोठमोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांच्या घरांचे स्वप्न साकार केले आहे. मराठी माणूस हा उद्योजकतेकडे फारसा वळत नाही, तो आपली आठ तासांची नोकरी एवढेच चाकोरीबद्ध आयुष्य जगत असतो, या समजाला संजेश पातकर यांनी छेद देत वेगळा मार्ग निवडला. या प्रवासात वेळोवेळी मिळत गेलेल्या संधीचे त्यांनी सोने केले. आपले सर्वस्व अर्पण करुन मेहनत करण्याची तयारी असेल, तर उद्योग क्षेत्रातही यशस्वी होता येते, हे पातकर यांच्या नेत्रदीपक वाटचालीवर नजर टाकली असता प्रकर्षाने जाणवते.
संजेश यांना एकूण चार बहिणी. त्यात संजेश हे भावंडांमध्ये लहान असल्याने सर्वांचेच लाडके. संजेश यांचे वडील गोपाळ पातकर हे सरपंच होते आणि वडिलांचा हा राजकीय वारसाही त्यांनी जपण्याचा प्रयत्न केला. अपक्ष नगरसेवक म्हणून ते भरघोस मतांनी निवडूनही आले. परंतु, संजेश यांचे मन हे राजकारणात फार रमले नाही आणि त्यांनी २०१० साली राजकारणाला कायमचा रामराम ठोकला.
खरंतर कोरोनाच्या प्रारंभीचा सहा महिन्यांचा काळ हा पातकर यांच्यासाठीही तितकाच आव्हानात्मक होता. व्यवसाय म्हटला तर चढ-उतार हे ओघाने आलेच. तेव्हा, पातकर यांनी कोरोनाच्या या संकटाचाही तितक्याच धैर्याने सामना करायचे ठरवले. कोरोना काळात बांधकाम व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची पातकर यांना परवानगी मिळाली खरी, पण त्यातही अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागला. त्याचबरोबर कंत्राटदारांनाही खूप त्रास सहन करावा लागला. ‘लॉकडाऊन’ची अनिश्चितता आणि रोजीरोटीच्या संकटापायी जवळपास या क्षेत्रात कार्यरत बांधकाम मजूर आपापल्या गावी निघून गेले होते. ‘लॉकडाऊन’ जाहीर होताच काही मजुरांनी त्यांना गावी जाऊ देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पातकर यांच्याकडे केली. तेव्हा, बांधकामही बंद असल्याने पातकर यांनी त्या मजुरांना भरपगारी रजा दिली. त्यात जे थोडेफार मजूर शहरात उपलब्ध होते, त्यांच्या मजुरीचे दरही ५०० रुपये प्रति दिवसावरुन १५०० रुपयांपर्यंत वधारले होते. पण, पातकर यांनी पैशाचा विचार न करता, जे मजूर त्यांच्या बांधकाम प्रकल्पावर कार्यरत होते, त्यांना कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली. शिवाय कंत्राटदारांनाही मजुरांची योग्य ती काळजी घेण्यास पातकर यांनी सांगितले होते.
 
sanjesh paatakar_1 & 
 
 
या दरम्यान स्टीलच्या दरांमध्येदेखील अंदाजे २० ते २५ रुपयांनी वाढ झाली होती. घरांचे दर निश्चित केलेले होते. त्यात ‘रेरा’ कायद्यानुसार ग्राहकांना घराचा ताबा ठरविलेल्या मुदतीत देणेही बंधनकारक होते. त्यामुळे पैशांचा विचार न करता, काम विहीत वेळेत कसे पूर्ण करता येईल, याकडे पातकर यांचा कटाक्ष होता.
 
 
  
कार्यालयीन कामकाज पाहणार्‍या कर्मचार्‍यांनाही शासनाच्या नियमावलीचे पूर्ण पालन करुन पातकर यांनी कामावर रुजू केले. तसेच त्यांच्याही वेतनात कुठल्याही प्रकारची कपात केली नाही. कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन कर्मचार्‍यांना करण्यात आले होते. एका कार्यालयात कमीत कमी २० कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व कर्मचार्‍यांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन केले. परिणामी, संजेश व त्यांच्या एकाही कर्मचार्‍याला कोरोनाची बाधा झाली नाही. त्यातच कोरोनाने अनेक जवळच्या लोकांना हिरावून घेतल्याचे शल्यही पातकर बोलताना व्यक्त करतात. आर्किटेक्ट सतीश ओक हे संजेश यांचे अगदी जवळचे मित्र कोरोना काळात वारले. त्यामुळे संजेश यांना मोठा धक्का बसला. या सगळ्या प्रसंगांना धैर्याने तोंड देत स्वत:ला सावरल्याचे पातकर सांगतात.
 
 
परंतु, केवळ आपले कर्मचारी आणि कुटुंबीय इतका संकुचित विचार न करता, संजेश पातकर यांनी कोरोना काळात अनेक सामाजिक संस्थांनाही मदतीचा हात दिला. वनवासी पाड्यांमध्ये जाऊन अन्नधान्याच्या पाकिटांचेही त्यांनी वाटप केले. या काळात नुसता ‘कोरोना’ हा शब्द जरी उच्चारला तरी अनेकजण घाबरत होते. त्यांच्या मदतीला धावून जाणे, ही गोष्ट तर दूरची. पण, तरीही पातकर यांनी गरजूंना मानसिक आधार देण्याचे काम केले. कोरोना चाचणीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्यानंतर गरजूंना रुग्णालयात दाखल करेपर्यंत संजेश पातकर त्या रुग्णांच्या कुटुंबीयांसोबत असत. समाजकार्य करताना पातकर यांनी स्वत:चीदेखील योग्य ती काळजी घेतली. तसेच या काळात कोरोनावरील उपचार खर्च प्रत्येकाला परवडणारा नव्हता. कोरोना काळातील रुग्णालयांची बिले पाहूनच अनेकांनी धसका घेतला होता. कोरोना आपल्या कर्मचार्‍यांना झाला, तर त्याला सामोरे जाताना त्यांची आर्थिक अडचण होऊ नये म्हणून कर्मचार्‍यांचादेखील त्यांनी तीन लाख रुपयांचा कोरोना विमा काढला.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्यांना आर्थिक पाठबळाची गरज होती, अशा उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून दिले. व्यावसायिकांना या आर्थिक पाठबळाचा नक्कीच फायदा झाल्याचे पातकर सांगतात. तसेच सरकारने ‘स्टॅम्प ड्युटी’ कोरोना काळात कमी केली होती. तरीही बांधकाम व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाचे काय होईल, याची चिंता सतावत होती.
सरकारने ‘स्टॅम्प ड्युटी’मध्ये दिलासा दिल्याने ग्राहकांना एक लाखांच्या रकमेऐवजी ते काम ३० ते ४० हजार रुपयांमध्ये होऊ लागले. बांधकाम व्यावसायिकांनाही ‘स्टॅम्प ड्युटी’ कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात फायदा झाला. त्यांच्याकडे ग्राहक मोठ्या प्रमाणात आकर्षित होऊ लागले. व्यवसाय चांगला झाला. बांधकाम व्यवसायावर ज्यांची रोजीरोटी आहे, त्यांचे काम आता सुरळीत सुरु असल्याचे पातकर आवर्जून नमूद करतात.
 
 
 
संजेश पातकर त्यांच्या प्रत्येक ग्राहकाला त्यांच्या गरजेनुरुप चांगल्या सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असतात. त्यामुळे पातकर यांच्याकडे घरखरेदीसाठी दाखल होणारे ग्राहक आपल्या नातेवाईकांनाही ‘या ठिकाणीच घर विकत घ्या,’ असे सांगतात. त्यामुळेच पातकर यांना त्यांच्या कामाची कधी जाहिरात करावी लागली नाही.
कुळगावमध्ये पातकर यांची मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांची कामे सध्या सुरु आहेत. ‘मनोरमा बिल्डर्स’चे बदलापूर येथील हेद्रेंपाडा येथे एका गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे, तर ‘मनोरमा नगर’ या नावाने कुळगाव (पूर्व) मध्ये, तर ‘वक्रतुंड एंटरप्रायझेस’च्या कात्रप येथे तीन इमारतींचे, ‘एसपी ग्रुप’च्या तीन इमारतींचे कामही पातकर यांच्या कंपनीने केले आहे. इमारतींसह त्यांनी ‘रो हाऊसेस’देखील या परिसरात उभारली आहेत. आपल्याच गावातील रहिवाशांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पातकर सांगतात.

"तरुण उद्योजकांनी कितीही अवघड परिस्थितीवर मात करण्याची तयारी ठेवावी. स्वत:हून पुढे येऊन काम केले पाहिजे. देशावर आलेले संकट आपण परतावून लावले आहे. तसेच आपण आपल्यावर आलेल्या संकटांना पिटाळून लावले पाहिजे. मेहनत करण्याची तयारी ठेवा."