महामारी फैलावून अवघ्या जगाला उद्ध्वस्त करण्याची आणि आपल्या बनावट औषधे व लसींच्या माध्यमातून आर्थिक लुटीची योजना आखणाऱ्या चीनवर त्याचाच डाव उलटल्याचे दिसते. चीनला कसलाही सुगावा लागू न देता, याच आपत्तीला एका सोनेरी संधीत परिवर्तित करून त्याच्याच शेजारी देशाने भीषण आपत्तीकाळात जगाला केवळ आशाच दाखवली नाही, तर चीनच्या नापाक इराद्यांना नेस्तनाबूतही केले. तो देश अर्थातच भारत!
गेले वर्षभर वुहान-कोरोना विषाणूच्या संकटाने ग्रासलेले जग, आता त्यावर मात देऊन हळूहळू का होईना, सामान्य वा नियमित दैनंदिनीच्या मार्गावर परतत असल्याचे दिसून येते. मात्र, ते एकाएकी झालेले नाही, तर त्यात बहुतांश प्रमाणात भारताच्या उच्च गुणवत्तेच्या, तथापि, किफायतशीर लसीचा सिंहाचा वाटा आहे. भारतीय लस जगभरातील लसनिर्मात्यांच्या तुलनेत केवळ स्वस्त आणि विश्वासपात्रच नाही, तर चीनच्या दुय्यम-तिय्यम दर्जाच्या लसीपेक्षा अधिक सुरक्षितदेखील आहे. मागील दोन-तीन महिन्यांत भारताने वुहान-कोरोना विषाणूविरोधातील लसीच्या निर्मिती व पुरवठ्यात चीनला कित्येक मैल मागे पछाडले असून, आजची परिस्थिती अशी आहे की, चीनची लस टोचून घ्यायला त्याचा निकटचा मित्र पाकिस्तानसुद्धा तयार नाही. उलट तो देश संयुक्त राष्ट्रांच्या लसीकरण उपक्रमांतर्गत आपल्यासाठी लस आणत आहे, ज्यात योगायोगाने भारतीय लसीचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त भारत आपल्या लसनिर्मिती क्षमतेला दररोज सातत्याने वाढवत असून चीन इच्छा असूनही त्याची स्पर्धा करू शकत नाही. तथापि, भारताच्या लसीमुळे नुकसान सोसावा लागणारा चीन एकमेव देश नाही. ‘मॉडर्ना फायझर’ लसीच्या दुष्परिणामांमुळे आता जगभरातील अनेक देश भारतीय-भारतात निर्मिती केलेल्या लसीला प्राधान्य देत असून, त्यामुळे ‘बिग फार्मा’ कंपन्या चांगल्याच रागावलेल्या दिसत आहेत.
दरम्यान, ह्युस्टनस्थित ‘बेलर कॉलेज ऑफ मेडिसिन’चे प्राध्यापक डीन डॉ. पीटर होटेज यांनी एका वेबिनारमध्ये भारतीय लसीचे कौतुक केले. ते म्हणाले की, “ज्या प्रकारे भारताने वुहान-कोरोना विषाणूचा सामना करणारी लस तयार केली, ती प्रशंसनीय आहे. वुहान-कोरोना विषाणूचा सर्वनाश करणारी लस, भारताने जगाला दिलेली अनमोल भेट आहे. ज्या प्रकारे या देशाने जगातील ‘बीसीएम’ आणि ‘ऑक्सफोर्ड’ विद्यापीठासारख्या अव्वल संस्थांच्या बरोबरीने सदर लस तयार केली आणि जगाला वुहान-कोरोना विषाणूच्या प्रकोपापासून वाचवले, त्याकडे आपण कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करू शकत नाही,” असे स्पष्ट केले. सदर वेबिनार ह्युस्टनमधील ‘इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ ग्रेटर ह्युस्टन’ने आयोजित केले होते. त्यातच डॉ. पीटर होटेज पुढे म्हणाले की, “मी, प्रत्येक आठवड्याला भारतातील माझ्या सहकाऱ्यांशी संवाद साधतो. आताच्या महामारीला पराभूत करणे अजिबात सोपे नव्हते आणि दुर्दैवाने भारताच्या परमार्थाबाबत कोणीही चर्चा करत नाही, त्यामुळे भारताच्या प्रयत्नांचे कौतुक करतो.”
दरम्यान, भारताच्या लस अभियानाच्या प्रभावामुळे जगातले कित्येक शक्तिशाली देशदेखील त्याच्याशी स्वतःला जोडून घेऊ इच्छितात. उदा. भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलियाच्या समावेश असलेल्या ‘क्वाड’ गटाच्या आगामी बैठकीत, अन्य विविध विषयांसोबतच भारताच्या लस अभियानाला वैश्विक स्तरावर यशस्वी कसे केले जाऊ शकते, यावर भर देण्यात येणार आहे. त्याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अमेरिकन प्रशासनाशी निगडित अधिकाऱ्याने सांगितले की, या अभियानामागे ‘क्वाड’चा मुख्य उद्देश लसनिर्मितीत येणाऱ्या अडचणी संपवणे, लसीकरणाच्या प्रक्रियेत गती आणणे, हा आहे. हे आवश्यक आहे, कारण विषाणू म्युटेट करत असेल, तर जितक्या वेगाने लसीकरण होईल, तितक्या वेगाने आपण म्युटेशनवर नियंत्रण मिळवू शकतो आणि त्यासोबतच आपल्या निर्मितीक्षमतेतही गती येऊ शकते. अर्थात, भारतीय लस आता आणखी व्यापकस्तरावर जगभरातील देशांत पोहोचू शकते.
दरम्यान, एक काळ असाही होता की, ‘पेनिसिलिन’सारख्या औषधासाठीही भारताला परकीय देशांवर अवलंबून राहावे लागत होते. आज, मात्र भारत लसनिर्मितीबाबत जगाचा अघोषित सम्राट झाला असून तो निःस्वार्थ भावनेने जगाला वुहान-कोरोना विषाणूच्या संकटातून बाहेर काढत आहे आणि कोणत्याही शस्त्राचा वापर न करता चीनला त्याची लायकी दाखवून देत आहे.