मुंबई : 'महाभकास आघाडी सरकार कृषी कायद्याच्याबाजूने ट्विट करणाऱ्या सेलिब्रिटींची चौकशी करणार आहे.हा राष्ट्रीय एकात्मतेसाठी बोलणाऱ्या लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर यांचा अपमान आहे! भारतमातेसाठी उभे राहणे हा उद्धव ठाकरे व शरद पवार यांना गुन्हा वाटतो का?' असा सवाल करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
दिल्लीच्या वेशीवर नोव्हेंबर २०२०पासून सुरू असलेल्या तथाकथित शेतकर्यांच्या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्तीचे लेबल लावणारी ग्रेटा थनबर्ग आणि पॉर्नस्टार मिया खलिफाने एकामागोमाग पाठिंबा दिला. त्यानंतर भारतीय क्रीडा आणि कलाक्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांनी आमच्या अंतर्गत प्रश्नात परकीयांनी हस्तक्षेप करू नये, या आशयाची ट्विट्स केली. त्याअंतर्गतच सचिन तेंडुलकरने, “भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड अजिबात मान्य नाही. बाह्यशक्ती फक्त पाहू शकतात, पण हस्तक्षेप करू शकत नाहीत. भारतीयांना भारत माहीत आहे आणि तेच भारताबद्दल ठरवतील. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया,” अशी भूमिका मांडली.
यात भारतरत्न सचिन तेंडुलकर, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, अभिनेते अक्षय कुमार, अजय देवगण आणि सुनील शेट्टी यांचा समावेश आहे. मात्र, हे ट्विट सेलिब्रिटी आणि खेळाडूंनी भाजप सरकारच्या दबावापोटी केले असल्याचा संशय सचिन सावंत यांनी गृहमंत्री यांच्याकडे व्यक्त केला आहे. यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या सर्व सेलिब्रिटींच्या ट्वीट्सची चौकशी करणार असल्याचे माध्यमाशी बोलताना सांगितले. यावरून आता भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.