समाजक्रांतिकारक सावरकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2021   
Total Views |

veer sawarkar _1 &nb


स्वातंत्र्यवीर सावरकरांचे समाजसुधारणेचे महान कार्य तसे दुर्लक्षित केले गेले आहे. तेव्हा, आज त्यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त समाजक्रांतिकारक सावरकरांच्या विविध पैलूंवर टाकलेला हा प्रकाश...


आधी स्वराज्य की समाजसुधारणा, यावर सावरकर म्हणतात की, “सामाजिक सुधारणा झाल्यावाचून स्वराज्य मिळाले, तर ते तीन दिवससुद्धा टिकणार नाही. मी, सागरात घेतलेली उडी विसरलात तरी चालेल. पण, माझे सामाजिक विचार विसरू नका” असे सांगणार्‍या सावरकरांना आपल्या आयुष्यातील रोमहर्षक घटनेपेक्षा समाजसुधारणेचे कार्य किती महत्त्वाचे वाटत होते याची प्रचिती येते.

सात स्वदेशी शृंखला- सप्तबेड्या

ब्रिटिशांची परदेशी शृंखला झुगारून देण्यासाठी झटणारे क्रांतिकारक सावरकर त्याच त्वेषाने वेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुद्धीबंदी, रोटीबंदी व बेटीबंदी या सात स्वदेशी शृंखला तोडण्यासाठीही अविरत झटताना दिसतात.

वेदोक्तबंदी :
सर्व हिंदूंना वेदादिक धर्मग्रंथावर समान हक्क असावा.


व्यवसायबंदी :
ज्या व्यक्तीस जो व्यवसाय करायची इच्छा व धमक असेल, त्या व्यक्तीस तो व्यवसाय करण्याची अनुमती असावी. अमक्या जातीत जन्मला म्हणून तमका व्यवसायच करावा, इतर व्यवसाय करू नये ही जबरदस्ती असता कामा नये.


स्पर्शबंदी :
“अस्पृश्यता ही तर निव्वळ मानीव, पोथीजात माणुसकीचा कलंक, ती तर तत्काळ नष्ट झाली पाहिजे,” असे सावरकर स्पष्टपणे म्हणतात.


सिंधुबंदी :
परदेशगमन जातीबहिष्कार्य पाप ठरवू नये.


शुद्धीबंदी :
पूर्वी परधर्मात गेलेल्या किंवा जन्मत: परधर्मीय असलेल्या अहिंदूंना हिंदू धर्म स्वीकारायचा असल्यास तशी सोय उपलब्ध असावी.


रोटीबंदी :
‘खाण्याने जात जाते, धर्म बुडतो’ या खुळचट कल्पना आहेत, म्हणणारे सावरकर “धर्माचे स्थान हृदय आहे, पोट नव्हे” असे सांगतात. रोटीबंदी तोडण्यासाठी सावरकरांनी रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात सहभोजने घडवून आणली.


बेटीबंदी :
विवाहासाठी ‘जात’ हा निकष असू नये. गुण, शील, प्रीती, आरोग्य या गोष्टी अनुरूप आहेत का हे पाहावे.
हिंदुत्व, हिंदूराष्ट्र मांडणारे क्रांतिकारक सावरकर समाजक्रांतिकारकही होते, हे विसरता कामा नये. समाजसुधारक व समाजक्रांतिकारक यातील फरक धनंजय कीरांनी नोंदविलेला आहे. कीर म्हणतात की, “सुधारक जुन्याच बांधकामाची पुनर्बांधणी करतो, तर क्रांतिकारक जुनी इमारत उद्ध्वस्त करतो व नव्याची उभारणी करतो.” सावरकर हे नुसते समाजसुधारक नव्हते, तर ते एक कृतिशील समाजक्रांतिकारक होते. आपले सामाजिक विचार मांडण्यासाठी सावरकरांनी ‘संगीत उ:शाप’ हे नाटक, ‘जात्युच्छेदक निबंध’, ‘क्ष किरणे’, ‘विज्ञाननिष्ठ निबंध’ यासारखे ग्रंथ तसेच कविता, कथा असे विविध वाङ् मयीन प्रकार हाताळले. सावरकर एक कृतिशील विचारवंत होते, त्यामुळे सावरकर नुसते विचार मांडून थांबले नाहीत. सहभोजन, मंदिरप्रवेश, पूर्वास्पृश्यांसह सर्व जातीच्या मुलांना शाळेतून एकत्र बसवणे, पूर्वास्पृश्यांसह सर्व जातीच्या लोकांसह घरोघरी दसरा व संक्रांतीला सोने व तिळगूळ वाटप, बँकेकडून कर्ज घेऊन उभारलेला पूर्वास्पृश्यांचा बॅण्ड, १९२९ पासून सुरू केलेल्या अखिल हिंदू गणेशोत्सवातील भंगीबुवांचे कीर्तन, महिलांची प्रकट भाषणे, असे अनेक समाजसुधारणेचे उपक्रम सावरकरांनी यशस्वी केले.
१९३३ साली रत्नागिरीत ‘अखिल हिंदू उपाहारगृह’ काढले, जेथे पूर्वास्पृश्य पदार्थवाटपाचे काम करत व सावरकर त्यांना भेटायला येणार्‍या व्यक्तीस आधी उपाहारगृहात जाऊन चहा पिऊन येण्याची अट घालत. १९३१ साली सर्व हिंदूंना खुले व ज्याच्या न्यासावर पूर्वास्पृश्यांसह सर्व जातींचे पुढारी असतील असे ‘पतितपावन मंदिर’ सावरकरांच्या प्रेरणेने व भागोजी कीर यांच्या आर्थिक पाठबळामुळे सुरू झाले. ‘जुन्या देवळाचा प्रश्न नव्या देवळातील सांघिक पूजेच्या सवयीने अधिक लवकर सुटेल’ हे जाणूनच पतितपावन मंदिर बांधण्यात आले होते. (१) या व अशा अनेक कार्यक्रमातून त्यांनी रत्नागिरीसारख्या सनातन्यांच्या बालेकिल्ल्यात कायापालट घडवून आणला. त्यावेळी गायत्री मंत्र नि वेदमंत्र हे अधिकार ब्राह्मणांपुरतेच मर्यादित होते. अशावेळी सावरकरांच्या पाठिंब्याने अखिल हिंदू गणेशोत्सवात एका भंगी समाजातील हिंदूने गायत्री मंत्र नि वेदमंत्र म्हटले, या प्रकरणाचे निनाद लंडनच्या काही वृत्तपत्रांमधूनही घुमले होते. (२) ५० वर्षांची दोन जन्मठेपेंची शिक्षा ठोठावल्यावरसुद्धा जे सावरकर भावनिक झाले नाहीत, तेच सावरकर १९३१ साली ‘मला देवाचे दर्शन घेऊ द्या, डोळे भरून देवास मला पाहू द्या’ हे पूर्वास्पृश्यांसाठी मंदिरप्रवेशाचे गीत लिहिताना अत्यंत भावनिक होऊन त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. (३)
ब्रिटिश शासनाकडून मिळणारे तुटपुंजे वेतन व इतर चरितार्थाची साधनं अल्प असतानाही सावरकरांनी एका पूर्वास्पृश्य मुलीला दत्तक घेतले होते. सन 1929च्या डिसेंबर महिन्यात ज्या रत्नागिरी हिंदू सभेतर्फे सावरकर कार्य करीत होते, तिच्यापाशी केवळ सव्वा रुपया शिल्लक होता. यावरून आपल्या लक्षात येईल की, किती आर्थिक, सामाजिक व राजकीय प्रतिकूल परिस्थितीत सावरकरांनी समाजकार्य केले होते. समाजसुधारणेविषयी आपले विचार मांडताना सावरकरांनी धर्मग्रंथ, समाजसंस्थेचा पाया, जातिभेद याविषयी मूलगामी विचार मांडले आहेत. ते म्हणतात, “धर्मग्रंथावर समाजसंस्था उभारण्याचे दिवस गेले. उद्या विज्ञानयुगात समाजसंस्थेची जी संघटना करावयाची ती प्रत्यक्ष ऐहिक नि विज्ञाननिष्ठ अशाच तत्त्वांवर केली पाहिजे.” (४)सामाजिक क्रांतीस यशस्वी करण्यासाठी आजच्या जन्मजात जातिभेदाचा उच्छेद करून जाती-जातीतील विषमता आधी नष्ट केली पाहिजे. (५)
रत्नागिरीला आल्यावर राजकारणात भाग घेता येणार नाही म्हणून हिंदू संघटनेच्या दृष्टिकोनातूनच सावरकरांनी अस्पृश्यता निवारण केले, असा आरोप करणार्‍यांनी सावरकरांनी बंधू नारायणरावांना अंदमानातून दि. ६ जुलै, १९२० साली लिहिलेले पत्र वाचावे. ‘हिंदुस्थानवरील परकीयांच्या स्वामित्वाविरुद्ध बंड करून उठावेसे जितके मला वाटते, तितकेच मला जातिप्रथा व अस्पृश्यता यांच्याविरुद्धही बंड करून उठावेसे वाटते.’ आमच्या सात कोटी धर्मबंधूंना निष्कारण पशूहूनही ‘अस्पृश्य’ लेखणे हा मनुष्य जातीचाच नव्हे, तर आपल्या स्वत:च्या आत्म्याचाही घोर अपमान करणे होय, म्हणून ती निघाली (उच्चाटन झाले) पाहिजे.... त्या रूढीपासून हिंदू समाजाचा आंशिक लाभ जरी होत असता, तरीही आम्ही तिच्याविरुद्ध तितक्याच प्रखरपणे खटपट केली असती.... तो मनुष्याविरुद्ध एक अत्यंत गर्ह असा अपराध आहे.” (६) सावरकरांचा समाजसुधारणेमागील हेतू मानवता हाच होता.
१९४७ साली ‘दलित सेवक’चे संपादक वि. न. बरवे यांना लिहिलेल्या पत्रात सावरकर म्हणतात, “जर क्वचित माझी प्रकृती सुधारून सार्वजनिक कार्यात पडण्याइतकी शक्ती आली, तर या अस्पृश्यतेच्या नि पोथिजात जातिभेदाच्या उच्चाटनाचे कार्यच निदान एक-दोन वर्षे तरी करावे आणि त्या घातक रूढीवर आणखी एक अखिल भारतीय चढाई करावी, असे वारंवार मनात येते. इतके हे कार्य मला केवळ हिंदू संघटनार्थच नव्हे, तर मानवी संघटनार्थही निकडीचे वाटते.” म्हणजे रत्नागिरीहून सुटल्यावर राजकारणाच्या धामधुमीत व भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असतानाही सावरकरांच्या मनात जातिभेदाचे समूळ उच्चाटन हाच विचार होता. १९३९च्या कोलकाता, १९४१च्या भागलपूर व १९४२च्या कानपूरच्या हिंदू महासभा अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात सावरकरांनी ‘अस्पृश्यता निर्मूलनाचा’ तात्कालिक कार्यक्रमात समावेश केला होता. १९३७ला संपूर्ण मुक्तता झाल्यावर सावरकरांनी अस्पृश्यता निवारण केले नाही, असा आरोप करणार्‍यांनी वरील गोष्टींची नोंद घ्यावी. रत्नागिरीहून सुटल्यावरही विविध दौर्‍यात पूर्वास्पृश्य वस्तीला भेट व सहभोजन हे कार्यक्रम होत असत.


संदर्भ :

१ . मोरे, शेषराव, सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, राजहंस प्रकाशन, दुसरी आवृत्ती, २०१०, पृष्ठ १७३ व दाते, शं. रा, समग्र सावरकर वाड्.मय-खंड 3, समग्र सावरकर वाड्.मय समिती, महाराष्ट्र प्रांतिक हिंदू सभा, पुणे १९६३-६५, पृष्ठ ४९२
२. कीर, धनंजय, अनुवाद : द. पां. खांबेटे, स्वातंत्र्यवीर सावरकर, पॉप्युलर प्रकाशन, तिसरी आवृत्ती, २००९, पृष्ठ १९६
३. बापट, ना. स., स्मृतिपुष्पे,
प्रकाशक- ना. स. बापट, १९७९, पृष्ठ ६३
४. समग्र सावरकर वाड्.मय-खंड ३, पृष्ठ ६५३
५. उपरोक्त, पृष्ठ ६४१
६. उपरोक्त, पृष्ठ ४८३
@@AUTHORINFO_V1@@