उद्योजकीय क्षेत्रातील आधुनिक हिरकणी

    25-Feb-2021
Total Views |
vaishali _1  H

वैशालीसारखी महिला उद्योजिका, तर ई-कचरा व्यवस्थापन आणि शुद्धीकरण या क्षेत्रातील भारतातील पहिली महिला उद्योजिका म्हणून आपले पाय रोवून उभी आहे. त्यांच्यासारख्या आधुनिक हिरकणीच महाराजांच्या स्वराज्याचा हा आर्थिक बुरुज बळकट करणार आहेत.
पहाटे ४ वाजता तिचा दिवस उजाडायचा. दोन मोठे डब्बे भरून पोहे, शिरा, उपमा घेऊन ती ६ वाजताची डोंबिवलीवरून लोकल पकडायची. ७.३०-८ वाजल्यापासून छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या बाहेरील फूटपाथवर शिरा-पोहे विकायची. ते विकून झाले की, ती तशीच तिच्या ऑफिसमध्ये कामाला जायची. संध्याकाळी ६-६.३० वाजता ऑफिसमधून सुटली की, घरी कधी जाईन, असे तिला वाटू लागायचे. कारण, तिचा चिमुरडा तिची वाट पाहत असायचा. ८.३०-९पर्यंत घरी पोहोचली की, पुन्हा जेवण आणि दुसर्‍या दिवशीच्या शिरा-पोह्यांची तयारी करून मध्यरात्री १२ -१२.३० वाजता झोपायची. तिची ही अशी दैनंदिनी काही माहिने चालली. आधुनिक काळातली ती हिरकणीच जणू! मात्र, मग तिने एक निर्णय घेतला आणि तिने स्वत:चं उद्योगसाम्राज्यच निर्माण केलं. ही रोमांचक कथा आहे शून्यातून शिखर गाठू पाहणार्‍या आणि ई-कचरा व्यवस्थापन व शुद्धीकरण उद्योगक्षेत्रातील कदाचित भारतातील पहिली महिला उद्योजिका व ‘श्रीकृष्ण रिफायनरी अ‍ॅण्ड रिसायकलिंग’ची संचालिका वैशालीची. मुळात वैशाली अशी मुलगी नव्हतीच. तिच्या अंगी अभिनयाचे कलागुण होते. शाळा-महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा असो की अभिनय स्पर्धा, तिचा नंबर ठरलेलाच असायचा. कांजूरमार्गच्या सरस्वती विद्यालयात प्राथमिक शिक्षण, तर डोंबिवलीच्या आदर्श विद्यालयात तिचं दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं. केळकर महाविद्यालयातून बीएच्या दुसर्‍या वर्गात शिकत होती. विद्यापीठात तिने अनेक एकांकिकांमध्ये कामही केली. तिच्या अभिनयाचं कौतुक सर्व शिक्षक-विद्यार्थी करत असत. तिच्या आई-बाबांना मुलींनी असं नाटकात कामं करणं पसंत नव्हतं. तिचे वडील पोलीस दलात अधिकारी होते. मूळचे हे कुटुंब सांगली जिल्ह्यातील विट्याचे. या दाम्पत्याला तिन्ही मुलीच. या मुलींपैकी एक होती वैशाली.


काही वर्षांपूर्वी भारतात एक पद्धत जास्तच प्रचलित होती. मुलगी १८ वर्षांची झाली किंवा अगदी बारावी झाली की, तिचं लग्न उरकायचं. वैशाली बीएच्या दुसर्‍या वर्षाला शिकत असतानाच तिचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर तिला मुलगादेखील झाला. सहा महिन्यांच्या चिमुरड्या ध्रुवला घेऊन वैशाली परीक्षा द्यायला महाविद्यालयात जायची. मात्र, प्रपंचाचा गाडा असा प्रचंड निघाला की, शिक्षणाची गाडी मध्येच अडकली. वैशालीचं शिक्षण थांबलं.२०१० मध्ये वैशालीने साकीनाक्याच्या ‘सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग संस्थान’मधून ‘गोल्ड अप्रेजल’ नावाचा एक अभ्यासक्रम पूर्ण केला. यामध्ये सोन्याच्या शुद्धीकरणाचा शास्त्रोक्त अभ्यास होता. त्यानंतर तिने कुर्ल्याला शुद्धीकरणाचा कारखाना सुरू केला. मात्र, तो काही कारणास्तव तोट्यात गेला. हा तोटा तिच्यासाठी खूप प्रचंड होता. या तोट्यातून बाहेर येण्यासाठी काही काळ नोकरी करणे आवश्यक होते. ती एका शैक्षणिक संस्थेत समुपदेशक म्हणून काम करू लागली. सकाळी १० ते ६ अशी कामाची वेळ होती. डोंबिवलीला राहणारी वैशाली कामासाठी आता छशिमटला येऊ लागली. त्याचवेळी तिला शिरा-पोहे विकण्याची कल्पना सुचली. मुंबई ही मायानगरी आहे. इथे माती पण विकली जाते, मग आपण तयार केलेले शिरा-पोहे तर हमखास विकले जातील, हा तिचा आत्मविश्वास दांडगा होता. या दांडग्या आत्मविश्वासाला कृतीची जोड मिळाली.


वैशाली पहाटे 4 वाजता उठून शिरा-पोहे तयार करत असे. सकाळी ६-६.१५ला डोंबिवलीवरून भला मोठ्ठा डब्बा घेऊन ट्रेनमध्ये चढे. थेट छशिमटला उतरून समोरच्या फुटपाथवर ती शिरा-पोहे विकायला सुरुवात करी. शिरा आणि पोहे चवीला उत्तम असल्याने काही वेळातच संपून जात. ते संपल्यानंतर सामानाची आवराआवर करून ती ऑफिस गाठे. संध्याकाळी ऑफिस सुटलं की धावतपळत, गर्दीतून मार्ग काढत, डब्बे सांभाळत ती ट्रेन पकडे. तोपर्यंत तिचा लहानगा ध्रुव तिची वाट पाहत कासावीस होत असे. ही माऊली मग घरी गेल्यावर त्याला छातीशी कवटाळे. मग रात्रीचं जेवण उरकून पुन्हा दुसर्‍या दिवशीच्या शिरा-पोह्याची तयारी करत असे. हे असे तिने तीन-चार महिने केले. भर पावसाळ्यात हे सारे करताना तिची अक्षरश: दमछाक होई. फक्त हाच व्यवसाय तिने केला नाही, तर मोसमानुसार वस्तूही विकल्या. दिवाळीच्या मोसमात पणत्या, रांगोळ्या विकल्या. तेल, साबण विकले. उद्देश एकच पैसे मिळवणे. दहा वर्षे त्या शैक्षणिक संस्थेत काम केल्यानंतर तिला एका कंपनीतून नोकरीचा प्रस्ताव आला. ती गुजरातची कंपनी होती. कचरा व्यवस्थापनात अग्रेसर असणार्‍या काही मोजक्या कंपन्यांपैकी एक. त्या कंपनीचं मुंबईसह भारतातलं पूर्ण मार्केटिंग वैशाली सांभाळे. कामानिमित्ताने तिला कॉर्पोरेट कंपन्यांचं ऑफिस असो किंवा अगदी कचर्‍याची विल्हेवाट, जिथे लागते अशा ठिकाणीदेखील जावे लागे. “या ठिकाणी एकसुद्धा महिला नसे. सगळेच पुरुष. प्रत्येकाच्या नजरा वेगळ्या. मात्र, आपण आपल्या कामाशी ठाम असलो की, कोणाची काही आगळीक करण्याची हिंमत होत नाही,” असे वैशाली सांगते. ही नोकरी करत असतानाच वैशालीच्या वडिलांनी तिचं ज्ञान आणि संवादकौशल्य पाहून याच क्षेत्रात उद्योग करण्याविषयी प्रोत्साहित केले. एव्हाना या ई-कचरा व्यवस्थापनात वैशाली चांगलीच तरबेज झाली होती. २०१७ पासून ती पूर्ण तयारीनिशी या क्षेत्रात उतरली.


तिचं ज्ञान, या क्षेत्रातलं नेटवर्क, त्यात या रिफायनरी क्षेत्रातली ती पहिली महिला उद्योजिका यामुळे इतर स्पर्धकांना धडकी भरली. ‘आप यहाँ काम मत करो’ अशी थेट धमकीसुद्धा दिली गेली. पण, वैशाली डगमगली नाही. धाडसाने पाय रोवून ती उभी आहे. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, दिल्ली या राज्यांमध्येदेखील तिच्या कंपनीचा विस्तार होत आहे. लवकरच तिचा शुद्धीकरण कारखाना सुरू होणार आहे. लॉजिस्टिक, ऑपरेशनल टीम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विपणन आणि मनुष्यबळ आदी २२ कर्मचारी व सर्व पायाभूत सुविधांसह हा कारखाना सुरू होण्यास सज्ज आहे. सध्या ती वाया गेलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू विविध कंपन्यांकडून गोळा करते आणि त्याचं रिसायकलिंग करणार्‍या कंपन्यांना ती तो माल पुरवते. ‘टाटा’, ‘रिलायन्स’, ‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो’, ‘जीटीएल इन्फ्रा’, ‘बीपीटी’, ‘कस्टम’ अशा अनेक कॉर्पोरेट व सार्वजनिक आस्थापनांना वैशालीची ‘श्रीकृष्ण रिफायनरी अ‍ॅण्ड रिसायकलिंग’ ई-कचरा व्यवस्थापनाची सेवा पुरवते. ई-कचर्‍याची विल्हेवाट ही शास्त्रोक्त पद्धतीने झाली पाहिजे, यावर तिचा भर असतो. ‘संधीचं सोनं करा’ हे कंपनीचं घोषवाक्य जपणारी वैशाली इतर महिला उद्योजिकांना आवर्जून सांगते की, “आपल्याला आयुष्यात खूप कमी संधी मिळतात. त्यामुळे जी संधी मिळेल ती वाया घालवू नका. दुसर्‍या संधी वाट पाहू नका. मिळालेल्या संधीचं सोनं करा.”


आज प्रत्येक घरात, प्रत्येक कारखान्यात ई-कचरा तयार होतो. ई-कचरा म्हणजे वाया गेलेल्या वा नादुरुस्त अवस्थेतल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू. आपल्या घरातील घड्याळापासून ते मोबाईल आणि टीव्हीपासून ते अगदी संगणकापर्यंत जवळपास प्रत्येक गोष्ट विद्युतभारावर चालते. या गोष्टी बिघडल्या वा नादुरुस्त झाल्या, तर त्या आपण रद्दीवाल्याला विकतो किंवा अडगळीत टाकून देतो. असा हा कचरा नीट वापरला गेला तर त्यापासून चांगले पैसे मिळू शकतात आणि त्याची विल्हेवाटसुद्धा नीट लावता येते. परिणामी, पर्यावरणास एकप्रकारे मदत होते. ई-कचर्‍याविषयी ही जागरुकता सर्वसामान्यांमध्ये निर्माण व्हावी, याकरिता वैशाली ‘ई-कचरा व्यवस्थापन जनजागृती मोहीम’ राबविणार आहे. यासाठी महानगरपालिका व स्वराज्य संस्था यांचे सहकार्य त्यांना अपेक्षित आहे. नुकतीच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होऊन गेली. शिवरायांनी जुलमी राजवटींविरुद्ध संघर्ष करून स्वत:चं साम्राज्य उभारलं. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मराठी उद्योजक आपलं साम्राज्य उभारत आहेत. वैशालीसारखी महिला उद्योजिका, तर ई-कचरा व्यवस्थापन आणि शुद्धीकरण या क्षेत्रातील भारतातील पहिली महिला उद्योजिका म्हणून आपले पाय रोवून उभी आहे. त्यांच्यासारख्या आधुनिक हिरकणीच महाराजांच्या स्वराज्याचा हा आर्थिक बुरुज बळकट करणार आहेत. किंबहुना, अशा महिला उद्योजिकांना सर्वतोपरी मदत करणे म्हणजेच महाराजांना खरा मानाचा मुजरा असेल.