केवळ राजीनामा पुरेसा नाही ; राठोड यांना तात्काळ अटक करा

    16-Feb-2021
Total Views |

bhatkhalkar_1  



मुंबई :
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. महविकास आघाडीतील मंत्री व शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी याप्रकरणी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा मातोश्रीवर पाठवला असल्याची चर्चा आहे. मात्र केवळ राजीनामा पुरेसा नसून संजय राठोड यांना तात्काळ अटक करावी यामागणीसाठी भाजप आक्रमक होताना दिसतेय.



भाजप आमदार आणि मुंबई प्रभारी अतुल भातखळकर यांनी ट्विट करत संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. ते म्हणतात,"वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मंजुरीसाठी ताबडतोब राज्यपालांकडे पाठवावा.परंतु केवळ राजीनामा पुरेसा नाही संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी." अशी मागणी भातखालकर यांनी केली आहे,




तत्पूर्वी, संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे वृत्त येताच यावर प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली. विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही ट्विट करत सरकारवर निशाणा साधला. ते म्हणतात,"वनमंत्री संजय राठोड यांनी मातोश्रीवर पाठवलेला राजीनामा, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द करावा.कारण एकाने 'मारल्यासारख करायचं, दुसऱ्याने रडल्यासारख करायचं' असं होता कामा नये. तसेच राजीनामा दिल्यानंतर निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी."




मूळची परळीची असलेली २२ वर्षाची पुजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री १च्या आसपास तिनं सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. त्यानंतर व्हायरल झालेल्या ऑडीओ क्लिप्स मधील संभाषणानंतर भाजपने थेट वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच याप्रकरणाचा तपास करून संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करावा यामागणीसह भाजप आक्रमक झाली आहे.