नवी दिल्ली - देशातील नक्षलवादी हिंसाचाराच्या घटनांमध्ये ७० टक्क्यांनी घट झाल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत दिली आहे. २००९ साली २,२५८ नक्षली हिंसाचाराच्या घटना नोंदवण्यात आल्या होत्या. मात्र, २०२० मध्ये देशभरात केवळ ६६५ नक्षली हिंसाचाराच्या घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.
ना
"डाव्या विंगचे अतिरेकी हे सुरक्षा दलांवर संधी साधून हल्ले करतात. तसेच नागरिक आणि सार्वजनिक मालमत्तेला देखील लक्ष्य करतात. तथापि, डाव्या विंगच्या अतिरेक्यांच्या हिंसाचाराच्या २,२५८ घटना २००९ मध्ये नोंदवल्या गेल्या. ज्या आतापर्यंतच्या सर्वोच्च घटना होत्या. मात्र, आता अशा घटना ७० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. २०२० मध्ये अशा प्रकाराच्या केवळ ६६५ घटनांची नोंद करण्यात आली आहे," असे राय यांनी आपल्या लेखी उत्तरात राज्यसभेत सांगितले. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार विजय पाल सिंह तोमर यांनी भारतातील नक्षलवादी हिंसाचाराबद्दल राज्यमंत्र्यांकडे विचारणा केल्यानंतर हे लेखी उत्तर समोर आले आहे.
गृहराज्यमंत्री राय यांना नक्षलवादी हिंसाचारात ही घट झाल्यामुळे मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे का ? असेही विचारण्यात आले. त्यावर २०१० साली नागरिक आणि सुरक्षा दलाचे जवान मिळून १,००५ लोकांचा नक्षली घटनांमध्ये मृत्यू झाला होता. परिणामी २०२० मध्ये ही संख्या ८० टक्क्यांनी घटून १८३ वर आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. हिंसेचा भौगोलिक प्रसार कमी झाला असून २०१३ मध्ये १० राज्यांमधील ७६ जिल्ह्यांच्या तुलनेत नऊ राज्यांमधील केवळ ५३ जिल्ह्यांमध्ये डाव्या विंगच्या नक्षलवाद्याच्या संबंधित हिंसाचाराची नोंद झाली आहे.