पुणे : एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकरने टोकाचे पाऊल उचलले. यानंतर राज्यभर याचे पडसाद उमटले. अशामध्ये आता आणखी एका विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले आहे. पुण्यातील दौड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. आता दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथील मल्हारी नामदेव बारवकर या युवकाने आज गळफास घेऊन आत्महत्या केली.
मल्हारी बारवकरने एमपीएससीच्या तीन परीक्षा दिल्या होत्या. नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक सुसाईड नोटदेखील लिहिली होती. यामध्ये त्याने लिहिले आहे की, "मी तुम्हाला दाखवलेली स्वप्न पूर्ण करु शकत नाही आणि तुमचे पडलेले चेहेरही पाहू शकत नाही. आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही. अतिविचार, संपलेला आत्मविश्वास, भविष्यातही काही सकारात्मक चित्र दिसत नाही. चांगले जगण्याचा सगळ्या आशा संपल्या आहेत. मला माफ करा..."