पवित्र ‘श्रीमद् भगवद्गीते’चे महात्म्य

    14-Dec-2021
Total Views |

Geeta Jayanti _1 &nb



पवित्र ‘श्रीमद् भगवद्गीते'चे तत्वज्ञान हे शाश्वत आणि नित्यनूतन असून गीतेचा अनुवाद जगातील अनेक भाषांमध्ये करण्यात आला. त्यामुळे गीतेची थोरवी निर्विवाद आहेच. म्हणूनच आजच्या ‘गीता जयंती'च्या दिवसाला ‘विश्व ग्रंथ दिन' म्हणून मान्यता मिळण्याच्या दृष्टीने ‘ग्रंथालय भारती' ही संस्थादेखील प्रयत्नशील आहे. तेव्हा, आजच्या ‘गीता जयंती'च्या निमित्ताने गीतामहात्म्य आणि ‘विश्व ग्रंथ दिना'ची संकल्पना अधोरेखित करणारा हा लेख...



'श्रीमद् भगवद्गीता' हा एक कालजयी महाग्रंथ आहे. हा एका देशापुरता मर्यादित नसून संपूर्ण विश्वकल्याणासाठी बनलेला ग्रंथ आहे. ‘गीता' या दोन अक्षरांत सामावलेला अर्थ व त्यातून निघणारे मर्म हे फारच गहन, गंभीर आणि विचाराला चालना देणारे आहे. गीतेतून मनुष्याला उपदेश मिळत असतात. हा उपदेश कोणत्या जाती वा धर्मासाठी नसून समस्त मानव समाजाकरिता आहे. या गीतेत ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग जे पाहिजे असेल ते प्राप्त होते. फक्त आपण या गीतेतील प्रत्येक श्लोकाचा अर्थ आणि त्यातील मर्माचा कसा उपयोग करून घेतो, यावर सर्व काही अवलंबून आहे.



जीवनातील प्रत्येक क्षण हा विषमता, विपन्नता, द्वंद यात भरलेला आहे. हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. हा क्षण कोणा एका मनुष्याच्या जीवनात आला नाही, असा एकही व्यक्ती या पृथ्वीतलावर शोधून सापडणार नाही. याचा अर्थ मनुष्याच्या जीवनात आनंदाचे क्षण येत नाही असे नाही, तर ते येतातच. परंतु, ते आनंदाचे क्षण आपण कसे अनुभवतो, यावर अवलंबून असते. प्रत्येक मनुष्याच्या अंतरात दोन मनं असतात. एक म्हणजे जीवनात घडणार्‍या, दिसणार्‍या प्रत्येक घडामोडींचा सकारात्मक पद्धतीने विचार करण्याकरिता तयार करणारे, प्रवृत्त करणारे मन, तर दुसरे या सर्वांचा नकारात्मक विचार करायला लावणारे मन.




हे दोन्हीही मन एकाच व्यक्तीच्या, मनुष्याच्या ठायी दिसत असल्याने नकारात्मक विचार करायला लावणारे मन सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करायला लावणार्‍या मनावर नेहमीच कुरघोडी करण्याचा प्रयत्न करित असते. मग यातूनच सुरू होते द्वंद्व. हे द्वंद्व ज्या ठिकाणी सुरू होते तिथे आसुरी शक्तीचा उदय होतो. गीतेच्या १६व्या अध्यायात आसुरी व दैवी शक्तीसंबंधी जे वर्णन केले आहे, ते फार चिंतनशील आहे. या अध्यायात केलेल्या वर्णनावरून पृथ्वीतलावर असणार्‍या प्रत्येक मनुष्याला स्वत:च्या जीवनात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे होणार्‍या कृत्याविषयी अभ्यास, चिंतन करायला प्रवृत्त केले आहे.
सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला, तो मार्गशीर्ष महिन्यातील हा दिवस ‘गीता जयंती' म्हणून ओळखला जातो.




मार्गशीर्ष महिन्यातील ‘शुक्ल एकादशी' हा ‘श्रीमद् भगवद्गीते'च्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे भारतीय जीवनातील सर्वश्रेष्ठतम म्हणावा लागेल. संपूर्ण जगातील लोक भावपूर्ण अंत:करणाने ‘गीता जयंती'चा उत्सव दरवर्षी भक्तिभावाने साजरा करतात. म्हणूनच स्वतः विनोबा भावे यांनी, “माझे शरीर आईच्या दूधावर पोसले, त्यापेक्षा माझे हृदय व बुद्धी यांचे गीतेच्या दुधावर अधिक पोषण झाले आहे. गीता हे माझे प्राणतत्व आहे,” असे गीतेबाबत गौरवोद्गार काढले आहेत.



जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेला प्राय: प्रत्येक विचार गीतेत सांगितला आहे, असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. गीतेने मानव समाजाला जगण्याची हिंमत दिली. भगवंतांनी अर्जुनाला निमित्तमात्र बनवून विश्वातील समग्र मानवी जातीला गीता ज्ञानाद्वारे जीवनाभिमुख करण्याचा चिरंतन मार्ग दाखवला आहे. ग्रंथातून सर्व मानवजातीच्या विकासाचे चिंतन करण्यात आले आहे.



या ग्रंथातील प्रत्येक शब्द अन् शब्द आजही वर्तमान परिस्थितीला लागू होतो. गीतेत दिलेल्या अध्यायाचा जर बारकाईने अभ्यास केला, तर आज ज्या समस्या भेडसावत आहेत, त्या सोडविण्याचे उत्तर आपल्याला निश्चितपणे त्यामध्ये मिळू शकते. कारण, समाजात निर्माण झालेल्या समस्या किंवा उद्भवलेल्या समस्या पाहता, या बहुतांशी मानवनिर्मित, मनुष्याच्या चुकीमुळे निर्माण झालेल्या आहेत. ज्या समस्या नैसर्गिक आहेत असे आपण म्हणतो, त्याला सुद्धा बर्‍याच अंशी मनुष्यच जबाबदार आहे, असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. त्यामुळे त्या सोडविण्यासाठी सुद्धा गीतेमध्ये उपाय आहे.





‘श्रीमद् भगवद्गीता' हा जगातील असा एकमेव ग्रंथ आहे की, ज्याची जयंती संपूर्ण जगात ‘गीता जयंती' म्हणून साजरी करण्यात येते. या ग्रंथाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली असून जगातील प्रमुख भाषांमध्ये या ‘श्रीमद् भगवद्गीते'चे भाषांतर झालेले आहे. म्हणूनच सार्वजनिक वाचनालयाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘ग्रंथालय भारती' या संस्थेने गीतेचे महत्त्व लक्षात घेऊन गीता जयंतीच्याच दिवशी ‘विश्व ग्रंथ दिवस' म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे.
यावर्षी गीता जयंती (मोक्षदा एकादशी) हा दिवस आज, दि १४ डिसेंबर रोजी आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बाहेरील राष्ट्र प्रमुख ज्या ज्या वेळी भारत दौर्‍यावर आले, त्यावेळी त्यांना भारताच्या पंतप्रधानांकडून आग्र्याच्या ‘ताजमहाल'चीप्रतिकृती भेट दिली जात असतं.




हा क्रित्येक वर्षांपासूनचा पायंडा पडला होता. परंतु, वर्ष २०१४ मध्ये केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आले आणि पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आरूढ झाले. तेव्हापासून इतर राष्ट्रप्रमुख ज्या ज्या वेळी भारताच्या दौर्‍यावर आले, त्यांना भारतीय प्रतीक म्हणून त्या त्या देशांच्या भाषेतील ‘श्रीमद् भगवद्गीते'चा ग्रंथ देण्यात येतो. हा पायंडा नरेंद्र मोदी यांनी पाडल्यामुळे त्यांचे अभिनंदन करावे तेवढे कमीच!





‘गीता जयंती' हा दिवस जागतिक स्तरावर ‘विश्व ग्रंथ दिवस' म्हणून साजरा करण्यासाठी ‘ग्रंथालय भारती' सतत प्रयत्नशील असून तसा केंद्र सरकारसोबत पत्रव्यवहार सुरू असून पाठपुरावाही केला जात आहे. या देशातील सामान्य नागरिकांकडूनही यासंबंधी मागणी करून ‘ग्रंथालय भारती'च्या या ‘मिशन'ला सहकार्य करावे, ही विनंती.




देशातील प्रत्येक सार्वजनिक वाचनालयांनी तसेच शालेय/महाविद्यालयातील ग्रंथालयांमधून या दिवसाचे निमित्त साधून एखाद्या वक्त्यांचे जाहीर भाषण वा विविध कार्यक्रम आयोजित करून किंवा ग्रंथालयांचे पदाधिकारी, कर्मचारी आणि वाचक तसेच सामान्य नागरिक यांच्या समवेत ग्रंथदिंडी काढून किंवा ग्रंथालयात ‘श्रीमद् भगवद्गीते'च्या ग्रंथ पूजनाचा कार्यक्रम आयोजित यावा, ही अपेक्षा.


- अनिल पाठक

(लेखक ‘ग्रंथालय भारती'चे कोकण प्रांत प्रमुख आहेत.)