मुंबई : मुंबईच्या दैनंदिन जीवनात दळणवळणासाठी प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या मुंबई लोकल संदर्भात लोकल प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेतर्फे प्रथम श्रेणीच्या एकेरी आणि परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देत तिकीट दर कमी करण्याची शक्यता आहे. प्रथम श्रेणी डब्यातील प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी या अशा प्रकारच्या निर्णयाची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, तिकीट दरात होणाऱ्या बदलांचा मासिक किंवा अन्य कुठल्याही पासच्या किमतींवर काहीही परिणाम होणार नसल्याचे बोलले जात आहे.
महापालिका निवडणुकीवर काय परिणाम होणार ?
मुंबईकरांसाठी लोकल हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. येत्या काही महिन्यांमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा निर्णय घेतला जात असेल तर त्याचा महापालिका निवडणुकीत काही परिणाम होऊ शकतो का ? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.