मुंबई : महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या 6 जागा बिनविरोध होण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीसह विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडूनही प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी मुंबईतील विधान परिषदेच्या दोन जागा आता बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झालाय. कारण सुरेश कोपरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. कोपरकर यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर कोपरकरांना काँग्रेसनं पाठिंबा दिला होता. मात्र, आता कोपरकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता भाजप उमेदवार राजहंस सिंह आणि शिवसेनेचे उमेदवार सुनील शिंदे यांचा मार्ग मोकळा झालाय.
काँग्रेसच्या सुरेश कोपरकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक तिरंगी होणार होती. कोपरकर यांच्या उमेदवारीमुळे सुनील शिंदे यांना दगाफटका होणार का? याबाबतही महापालिकेत चर्चा रंगली होती. मात्र, आता कोपरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी दूर झाली आहे.