संविधानातील दुरुस्त्यांचा अभ्यास आवश्यक!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2021   
Total Views |

constitution.jpg_1 &



आजपासून ७२ वर्षांपूर्वी दि. २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आपण आपले संविधान स्वीकारले. शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यानंतर स्वतंत्र झालेल्या नवजात देशाने स्वत:साठी तयार केलेले लोकतांत्रिक, प्रजासत्ताक संविधान म्हणून या संविधानाची सर्वत्र व्यापक चर्चा झाली. अद्याप होत असते. या सात दशकांच्या काळात आपल्या संविधानात एकंदर १०४ दुरुस्त्या केल्या गेल्या. येणार्‍या काळात संविधानात दुरुस्ती करण्याची गरज वेळोवेळी निर्माण होऊ शकते, ही संभाव्यता घटनाकारांनी सुरुवातीलाच लक्षात घेतली होती व त्यादृष्टीने घटनादुरुस्तीची कार्यपद्धती निश्चित करून दिली होती. त्यानुसार एकंदर तीन प्रकारच्या घटनादुरुस्ती करण्याची तरतूद आपल्या घटनेत आहे. त्यापैकी पहिल्या प्रकारची घटनादुरुस्ती संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये साध्या बहुमताने केली जाते, तर दुसर्‍या व तिसर्‍या प्रकारच्या घटनादुरुस्तीसाठी घटनेच्या ३६८ व्या कलमाचा आधार घ्यावा लागतो.


या कलमानुसार दुसर्‍या प्रकारची घटनादुरुस्ती संसदेच्या दोन्ही सभागृहात किमान दोन तृतीयांश बहुमताने मंजूर करावी लागते, तर तिसर्‍या प्रकारच्या दुरुस्तीसाठी संसदेच्या मान्यतेबरोबरच किमान ५० टक्के राज्यांच्या विधानसभेची मंजुरी आवश्यक असते. आजवर झालेल्या एकूण १०४ घटनादुरूस्त्यांपैकी ४२ दुरुस्त्या तिसर्‍या प्रकारच्या होत्या. आजवर झालेल्या १०४ घटनादुरूस्त्यांची छाननी केली, तर आजवर होऊन गेलेल्या राज्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या व पक्षांच्या स्वभाववैशिष्ट्यांवरही प्रकाश पडतो. या घटनादुरूस्त्यांपैकी बहुतांश दुरूस्त्या स्वाभाविकपणे काँग्रेस राजवटीत झाल्या.



त्यातही नेहरूंच्या काळात १७ , इंदिरा गांधींच्या काळात २९ व राजीव गांधींच्या काळात दहा अशा एकंदर ५६ दुरुस्त्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नेहरू-गांधी परिवाराच्या कारकिर्दीत झाल्या. अटलजींच्या कारकिर्दीत एकूण १९ दुरुस्त्या झाल्या. त्यापैकी बहुतेक दुरुस्त्या वेगवेगळ्या सामाजिक आरक्षणांची व्याप्ती अथवा कालमर्यादा वाढवणार्‍या होत्या. त्यांनी केलेली महत्त्वाची घटनादुरुस्ती म्हणजे केंद्र व राज्य मंत्रिमंडळाच्या संख्येवर निर्बंध घालणारी ९१वी घटनादुरुस्ती! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत सहा दुरुस्त्या झाल्या. त्या सामाजिक आरक्षणे व कररचना यांच्याशी संबंधित होत्या.
 

पं. नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत झालेल्या अनेक घटनादुरुस्त्या अगदी पं. नेहरूंनी केलेल्या पहिल्या घटनादुरुस्तीपासून इंदिरा गांधींनी केलेल्या ४२व्या घटनादुरुस्तीपर्यंत बहुतेक दुरुस्त्या घटनेचा मूळ गाभा बदलणार्‍या होत्या. पहिल्या दुरुस्तीपासून वृत्तपत्रे, विरोधक आणि न्यायालये यांच्यावर नियंत्रण आणू पाहणार्‍या सर्व दुरुस्त्या या नेहरू-गांधी परिवार आणि काँग्रेसने केल्या. संविधानाचा मूळ ढाँचा बदलण्याचा प्रयत्न त्यांनी परत केला.



मात्र, काँग्रेस आणि त्यांचे डावे सहप्रवासी उलटा अपप्रचार सातत्याने करतात. भारताच्या संविधानात आजवर झालेल्या सर्व दुरूस्त्यांचा अधिक अभ्यास व चर्चा झाली पाहिजे. त्यातून अनेक नव्या गोष्टी जगासमोर येतील. संविधानामध्ये झालेले बदल कोणत्या परिस्थितीत आणि का केले गेले? सविंधान दुरूस्ती आवश्यक होती की नव्हती याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.


भारताच्या संविधान लेखनाचा इतिहास व आपल्या संविधानात आजपर्यंत झालेल्या घटनादुरुस्त्या या दोहोंचा अभ्यास करून केलेले लेखन गेल्या पाऊण शतकातील भारताच्या राजकीय इतिहासाच्यादृष्टीने खूप महत्त्वाचे ठरणार आहे. स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ साजरा करीत असताना या अभ्यासाला अधिक चालना मिळणे अत्यंत औचित्यपूर्ण ठरणार आहे.


@@AUTHORINFO_V1@@