खानदेशातील बदललेले पक्षीवैभव

    22-Nov-2021
Total Views | 182

khandesh _1  H

प्रत्येक परिसराची पक्षीविविधता कालानुरूप बदलत असते. नैसर्गिक परिसंस्थांमध्ये झालेल्या बदलानुसार पक्ष्यांच्या प्रजातीदेखील त्या परिसरांतून नामशेष होत असतात. अशाच प्रकारे शतकानुरूप खानदेशातील पक्षीजैवविविधतेमध्ये झालेल्या बदलांचा ऊहापोह करणारा हा लेख...


 

डाॅ. प्रा. सुधाकर कुऱ्हाडे - ब्रिटिश राजवटीमध्ये खानदेश प्रदेश म्हणून जो भूभाग ओळखला जात होता, त्याचे क्षेत्रफळ होते १०.४३१ चौरस मैल आणि याचा विस्तार मुख्यत्वे करून दख्खनच्या पठाराच्या उत्तरेस होता. प्रशासकीय सोयीसाठी खानदेश पुढील १६ उपविभागांमध्ये विभागण्यात आला होता. अमळनेर, भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, धुळे, एरंडोल, जामनेर, नंदुरबार, नसिराबाद, पाचोरा, पिंपळनेर, सावदा, शहादा, शिरपूर, तळोदा आणि विरदोल (रानपिंगळ्यांमुळे तळोद्याचे नाव आज सर्वच अभ्यासकांना ज्ञात आहे). खानदेशात सातपुडा पर्वतरांगा हत्ती पर्वतरांगा, अजिंठा आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा विस्तार दिसून येतो. या पर्वतरांगांच्या डोंगरउतारावर नानाविध वृक्षवेली गवत आढळून येत असे. खानदेशात चार उष्ण पाण्याचे झरे असल्याचीही इतिहासात नोंद आहे.

 


 

तत्कालीन राजवटीमध्ये खानदेश हा विस्तृत वनप्रदेश असलेला जिल्हा होता. तथापि १८६० नंतर टिंबर ठेकेदारांनी या वनांची मोठ्या प्रमाणात तोड करून नुकसान केले. इ. स. १८६३ साली खानदेश आणि अहमदनगर वन विभाग एकाच युरोपियन अधिकार्‍याच्या अधिपत्याखाली होते. तत्कालीन खानदेशात २० राखीव वनक्षेत्रे असल्याचा उल्लेख आहे. या वनांमध्ये साग, खैर, अंजन, मोह, आपटा, सलाई, बाभूळ, बांबू आदी उपयुक्त वृक्षराजी असल्याने त्यांच्या व्यापाराच्या दृष्टीनेही खानदेश महत्त्वाचा होता. सी. एस. हॉर्सली या अधिकार्‍याने सातपुड्यातील भिल्ल समाजाच्या दैनंदिन गरजा ओळखून त्यांना वृक्षतोडीस सशर्त परवानगी दिली होती. मोहाची फुले, फळे आणि चारोळी विक्रीतूनही या समाजाच्या उदरनिर्वाहाला हातभार लागत असे. वर उल्लेखित वृक्षासोबतच खानदेशच्या जंगलात शेवगा, अंजन, धावडा, बेल, वड, पिंपळ, उंबर, बेहडा, अर्जुन, वहावा, कदंब, बिबा, बोर, बकान, जांभूळ, चिंच, खुरड, खैर, आंबा, बोदरा, पांगारा, चंदन, भोकर, शिरीष, ऐन, शिसम, शिंदी आदी अनेक वृक्ष मोठ्या संख्येने, दाटीवाटीने उभे असल्यामुळे साहजिकच या वनांमधील पशुपक्षी सृष्टी ही लक्षवेधी होती. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत खानदेशाच्या उत्तरेकडील पर्वतरांगांमध्ये हत्तींचे वास्तव्य आणि त्यांची वीणदेखील मोठ्या प्रमाणात होत होती. परंतु, नंतरच्या मुघल कालखंडात नानाविध कारणांमुळे हत्तींची संख्या कमी-कमी होत गेली. वाघ आणि बिबटे पूर्वीपासूनच या प्रदेशात वास्तव्यास आहेत. यांच्या सोबतच गवा, अस्वल, रानडुक्कर, सांबर, चितळ, भेकर, चिंकारा, काळवीट, नीलगाय इत्यादी वन्यजीव या वनांमध्ये आढळून येतात.


 

तत्कालीन खानदेश जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ आणि वनक्षेत्र मर्यादित असले, तरीही या प्रदेशाची जैवविविधता समृद्ध होती, हे तेथील वृक्ष आणि वन्यजीवांवरून स्पष्ट होते. ’जल, जंगल, जमीन’ ही त्रिसूत्री त्या काळातही एकात्मिक भावनेनं कार्यरत होती, हे अनेक दस्तावेजांवरून सिद्ध होते. रानावनात पक्ष्यांचा किलबिलाट नसला तरच नवल. एकोणिसाव्या शतकामध्ये खानदेशातील पक्षी जीवन हे अतिशय समृद्ध बहरलेले होते, हे इ. स. १८८० च्या शासकीय नोंदीवरून लक्षात येते. जल आणि जंगल यामुळे पक्ष्यांचे अधिवासही नोंद घेण्यायोग्यच होते. वड, पिंपळ, लिंब, ऐन यासारखी झाडे पक्ष्यांना आश्रय द्यायची, तर भोकर, बोर, चिंच, पळस, उंबर आदी वृक्षराई पक्ष्यांची भूक भागवायची. सोबतीला तापी, गिरणा, बोराई, नर्मदा या अमृतवाहिन्या होत्याच. एकूण काय खानदेशचा हा परिसर पक्ष्यांसाठी एक आदर्श अधिवासच होता. महाराष्ट्रातून माळढोक दुर्मीळ होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर कधीकाळी खानदेशातही माळढोक आणि तणमोराचेही सहज दर्शन होत असे. हा इतिहास १८५० ते १८८० दरम्यानचा असावा. आज १७० वर्षांनंतर पाहिले, तर या परिसरात माळढोक दिसून येत नाही आणि तणमोर असलाच, तर त्याच्या अधिवासाबद्दल खूप काही माहीत नाही.


पाणी आणि गवताळ प्रदेश यामुळे सामान्य बटलावा, पट्टेरी बटलावा, टिटवी, माळ टिटवी यांसारखे पक्षी, तर विस्तृत पाणथळींमुळे चक्रवाक, अडई, थापट्या, तलवार बदक, हळदी-कुंकू, गडवाल, शेंडी बदक, पाणडुबी, नकटा, तिरंदाज आदी स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी खानदेश जिल्ह्यात आढळून येत. हा पक्षी अभ्यास, पक्षी नोंदीचा सारा खटाटोप तत्कालीन ब्रिटिश, युरोपियन अधिकार्‍यांनी केला. यातून त्यांचे निसर्गप्रेमच दिसून येते. ब्रिटिश आणि मुघल काळात वन्यजीवांची सर्रास शिकार केली जात होती, हे सर्वश्रुत आहे. शिकारीसाठी खास ’मृगयाक्षेत्र’ राखीव ठेवले जायचे. ही अधिकारी, राजे आणि संस्थानिक मंडळी फक्त वन्यपशुंचीच शिकार करायचे, असे नाही तर ही हौशी, खवय्ये मंडळी स्थानिक आणि स्थलांतरित बदकांचीही शिकार करायचे. याविषयी अनेक शास्त्रीय नियतकालिकातून त्यांनी वेळोवेळी टिपण्णं प्रकाशित केली आहेत.

 



सातपुडा पर्वतरांगांमुळे एक परिपूर्ण अधिवास गिधाडांसारख्या पक्ष्यांना लाभल्यामुळे पांढर्‍या पुठ्यांचे गिधाड, पांढरे गिधाड, लांब चोचीचे गिधाड आणि काळे गिधाड ही या जिल्ह्यात भरपूर संख्येने दिसून येत होती. या गिधाडांच्या अस्तित्वावरून त्या परिसरात पशुधन (गाय, बैल, म्हैस इत्यादी) आणि वन्यपशूही मोठ्या संख्येत असावेत, हे मानण्यास हरकत नसावी. मोर, घारीसारखे शिकारी तेथे सहज दिसत. इतर शिकारी पक्ष्यांमध्ये तिसरा, मधुबाज, शिक्रा, शाहीन ससाणा, लग्गड ससाणा, लाल डोक्याचा ससाणा, नागरीघार, ब्राह्मणी घार यांचा समावेश होता. सध्याच्या परिस्थितीत आजच्या पक्षीमित्रांमध्ये खानदेशची पक्षी ओळख आहे ती ‘फॉरेस्ट आऊलेट’ म्हणजेच ’रानपिंगळ्या’मुळे आणि याचे निर्विवाद श्रेय जाते, पामेला रासमुसन, बेन किंग आणि गिरीश जठार या संशोधकांना.

२००१ ते २००४ या कालावधीत जठार यांनी या रानपिंगळ्याचा सखोल शास्त्रीय अभ्यास करून ‘डॉक्टरेट’ ही सर्वोच्च पदवी प्राप्त केली. यामुळेच ‘तळोदा-रानपिंगळा - डॉ. गिरीश जठार’ हे समीकरण सर्वच पक्षी अभ्यासकांना परिचित आहे. यापूर्वीही म्हणजे, सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी तळोदा आणि शहादा या परिसरातून ‘फॉरेस्ट आऊलेट’ अथवा रानपिंगळ्यांची नोंद घेण्यात आली होती. इ.स. १८८० ते १८८३ या कालावधीत तत्कालीन भारतीय प्रशासकीय सेवेतील पक्षी अभ्यासक अधिकारी जेम्स डेव्हिडसन यांनीदेखील पश्चिम खानदेशातून या दुर्मीळ पक्ष्यांची नोंद घेतली होती. या रानपिंगळ्यांशिवाय मासेमार घुबड, हुमा घुबड, ठिबकेवाला पिंगळा, छोट्या कानाचे घुबड, गव्हाणी घुबड ही निशाचर मंडळीही खानदेशातील पक्षी वैभवाचे घटक होते. पाकोळी, माळ भिंगरी, रेषाळ कंठाची भिंगरी, पर्वतीय पाकोळी, तुरेवाली पाकोळी हे पक्षी खानदेशच्या आसमंतात सकाळच्या वेळेस हमखास दिसून येत. रातवा, चाष, तीनही प्रकारचे धीवर, वेडा राघू, राखी धनेश, पोपट, सुतार, चातक, दोन प्रकारचे तांबट, सामान्य कोकीळ, भारतीय कोकीळ, भारद्वाज, हुप्पो आदी नानाविध रंगाचे पक्षी खानदेशातील जंगलाची शोभा वाढवत असत.



जेम्स डेव्हिडसन यांच्या सूचीनुसार एकोणिसाव्या शतकात (इ.स. १८०० ते १९९०) त्यांनी ज्या उत्तर-पूर्व खानदेशात जास्त प्रवास केला, वास्तव्य केले, त्या प्रदेशात तेथील डोंगर-रांगांमध्ये २९४ प्रजातींचे पक्षी नोंदविले. यापैकी काही दहा-बारा पक्ष्यांच्या बाबतीत ते साशंक होते, हेदेखील त्यांनी प्रामाणिकपणे नोंदविले आहे. जेम्स डेव्हिडसन या सनदी अधिकार्याच्या पक्षीविषयक नोंदी तत्कालीन ख्यातनाम पक्षितज्ज्ञ ह्यूम यांनी तपासून त्या पक्षीविषयक शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्धही केल्या. एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश अधिपत्याखाली असलेल्या खानदेश जिल्ह्याची ही पक्षीसृष्टी आजही नवलाईचा विषय बनून राहिली आहे. रानपिंगळ्याच्या नोंदीने आणि संशोधनातून हा अधिवास जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा होता आणि आहे, हे अधोरेखित केले आहे.

 

(लेखक अहमदनगर जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक असून पक्षी अभ्यासक आहेत.)


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121