नाशिक : नाशिकमध्ये होणार्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकांच्या नावावर शनिवारी अखेर शिक्कामोर्तब झाले. प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्धाटन होणार असून विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गीतकार जावेद अख्तर उपस्थिती लावणार आहेत. संमेलनाचा समारोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते होणार आहे.
९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे भूमिपूजन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते ‘मेट भुजबळ नॉलेज सिटी’ येथे शनिवारी सांयकाळी पार पडले. या कार्यक्रमास नाशिकचे पालकमंत्री तथा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ उपस्थित होते. यावेळी भुजबळ यांनी या संमेलनाचे उद्घाटन दि. ३ डिसेंबर रोजी होणार असून संमेलनाचे उद्घाटन प्रख्यात कादंबरीकार विश्वास पाटील करणार असल्याचे सांगितले.
दि. ३ ते ५ डिसेंबर दरम्यान भुजबळ नॉलेज सिटीमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार आहे. खगोलशास्त्रज्ञ, विज्ञान लेखक जयंत नारळीकर या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे विज्ञानवादी साहित्य संमेलन या संमेलनाचा पाया आहे. बालसाहित्य, कवीकट्टा, कथाकथन, ग्रंथ दिंडी, असे भरगच्च कार्यक्रम साहित्य संमेलनात आहेत.
राजसत्ताचा निर्दयीपणा, मराठी नाटक एक पाऊल पुढे, दोन पावले मागे, कोरोनानंतरचे अर्थकारण मराठी साहित्य व्यवहार, ऑनलाइन वाचन वाङ्मय विकासाला तारक की मारक साहित्य निर्मितीची कार्यशाळा गरज की थोतांड, गोदतीराच्या सतांचे योगदान, नाशिक जिल्ह्याला १५१ वर्ष पूर्ण झाल्याबाबत जिल्ह्याचा जागर अशा परिसंवादाची मेजवानी या साहित्य संमेलनात अनुभवायला मिळणार आहे.