शिवसेनाचा हा `चुनावी जुमला' तर नव्हे!

भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांचा टोला

    20-Nov-2021
Total Views |

Thane _1  H x W





ठाणे
: ठाणे महापालिकेच्या निवडणुकीला तीन महिन्यांचा अवधी राहिला असताना, शिवसेनेला वचननाम्याची आठवण झाली आहे. भाजपाने सातत्याने पाच वर्ष आठवण दिल्यानंतर, शिवसेनेने ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी जाहीर केली. त्याचबरोबर आता प्रशस्त रस्ते, पिण्याचे भरपूर पाणी अशा आभासी आश्वासनांची सरबत्ती केली जात आहे. ठाणेकर मतदारांना भुलविण्यासाठी हा `चुनावी जुमला' तर नव्हे, असा टोला भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी मारला आहे. राज्याचे नगर विकास मंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्यामुळे, महापालिकेच्या ठरावाला मंजुरीची कोणतीही अडचण नाही. त्यामुळे शिवसेनेने महिनाभरात मालमत्ता करमाफीची पूर्तता करावी, अशी मागणी श्री. डुंबरे यांनी केली आहे.
 
 
मालमत्ता करमाफी आणि पाणीपुरवठ्यासाठी नवीन धरणाचे वचन शिवसेनेने २०१७ च्या निवडणुकीत दिले होते. मात्र, त्याचा सत्ताधारी शिवसेनेला विसर पडला होता. या संदर्भात भाजपाकडून सातत्याने आंदोलने व महासभेत विषय उपस्थित केल्यावर अखेर महापालिका निवडणुकीला तीन महिने राहीले असताना मालमत्ता करमाफीचा ठराव मंजूर करण्यात आला. भाजपाच्या दबावामुळेच शिवसेनेला हा निर्णय घेणे भाग पडले, असा दावा भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला. राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे. त्यामुळे ठाण्यातील शिवसेना नेत्यांनी मालमत्ता करमाफीच्या ठरावाला महिनाभरातच राज्य सरकारची मंजुरी घ्यावी. अन्यथा, हा `चुनावी जुमला'च असल्याचा टोला डुंबरे यांनी लगावला.
 
 
गेल्या काही दिवसांपासून ठाणेकरांना प्रशस्त रस्ते, वाहतूककोंडी मुक्त परिसराचे आश्वासन दिले जात आहे. तर जलकुंभाचे उद्घाटन करून भरपूर पाणीपुरवठ्याचा आभास निर्माण केला जात आहे. प्रत्यक्षात अवघ्या चार महिन्यांपूर्वी ठाणेकरांनी खड्डेमुक्त रस्त्यांचा अनुभव घेतला होता. काही अधिकाऱ्यांना निलंबित करून कारवाईचा आभास निर्माण केला. मात्र, अजूनही काही रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. आता घोडबंदर रोडवर जलकुंभाचे उद्घाटन करून, भरपूर पाणी उपलब्ध होणार असल्याचा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात या जलकुंभामध्ये पाणी आणणार कोठून हा प्रश्न आहे. आगामी निवडणुकीच्या निमित्ताने केवळ धूळफेक करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका मनोहर डुंबरे यांनी केली.
 
 
७०० चौरस फुटांच्या मालमत्ताधारकांचा विसर
 
५०० चौरस फुटांपर्यंत घरे असलेल्या सर्व नागरीकांचा मालमत्ता कर माफ, तर ७०० चौरस फुटांपर्यंत घरे असलेल्यांना मालमत्ता करातून अंशत: सवलत, तर ७०० चौरस फुटांवरील घर असलेल्या गृहसंकुलांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग, सिव्हरेज ट्रिटमेंट प्लांट, घनकचरा व्यवस्थापन, सोलार आदी पर्यावरणस्नेही उपक्रम राबविल्यास मालमत्ता करातून सवलत, असे आश्वासन शिवसेनेने वचननाम्यात दिले होते. मात्र, आता केवळ ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफीचा ठराव करून ७०० चौरस फुटांपर्यंत घरे असलेल्या नागरीकांना वाऱ्यावर सोडले. वचननाम्यातील या मुद्द्याचा सत्ताधारी शिवसेनेला सोयिस्कर विसर पडला आहे, अशी टीका गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली.

 
गल्लोगल्ली वचननाम्याची आठवण करून देणार - मनसे
 
 
शिवसेनेने वचननाम्यात अनेक आश्वासने दिली होती.मात्र, आता केवळ ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफीचा ठराव करून ७०० चौरस फुटांपर्यंत घरे असलेल्या नागरीकांना वाऱ्यावर सोडले. वचननाम्यातील मुद्यांचा सत्ताधारी शिवसेनेला सोयिस्कर विसर पडला असून येत्या निवडणूकीत गल्लोगल्ली सेनेच्या 'त्या' वचननाम्याची आठवण मनसे करून देणार आहे.
- अविनाश जाधव (मनसे ,ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष)