मुंबई : "मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी राजकीय दबावाखाली येत आणि पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून प्रभाग रचना केली आहे. मात्र नव्याने करण्यात आलेली ही प्रभाग रचना संविधानाचे नियम आणि निर्देश धाब्यावर बसवत लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवून करण्यात आली आहे. प्रभाग रचनेत करण्यात आलेल्या या फेरफारीबाबत आणि कथित घोटाळ्याबाबत आणि या माध्यमातून करण्यात आलेल्या मुंबईकरांच्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही महापालिका आयुक्तांना गुलाबपुष्प देत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करत आमची भूमिका मांडत आहोत," असे महापालिकेतील भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे. सोमवार, दि. ०१ नोव्हेंबर रोजी भाजपच्या वतीने पालिका मुख्यालयात महापालिका आयुक्तांना गुलाबपुष्प देत आंदोलन करण्यात आले.
भाजपचा न्यायालयात जाण्याचा इशारा
नवी प्रभाग पुनर्रचना सत्ताधारी शिवसेनेने केवळ आपला राजकीय फायदा पाहून केली आहे. भ्रष्टाचाराची गटारगंगा अव्याहत वाहत ठेवण्यासाठी आणि पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठीच ही प्रभाग रचना केली असल्याची टीका भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली . निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे म्हणून निवडणूक आयोगाने याबाबत पावले उचलून प्रभाग आराखड्याची पडताळणी नि:पक्षपातीपणे करावी अशी आमची मागणी आहे. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येतील असा इशारा शिंदे यांनी यावेळी दिला.
प्रभाग रचनेत मोठी फेरफार
मुंबई महापालिकेच्या फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचना आराखडा पालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला सादर केला आहे. शिवसेनेने एका बाह्य खाजगी एजन्सीकडून आपल्याला अनुकूल अशी प्रभाग रचना बनवून रातोरात आयुक्तांच्या संगनमताने पेन ड्राइव्ह बदलल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. यामध्ये प्रभागांच्या सीमारेषांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकिय सोयीसाठी बेकायदेशीर फेरफार करण्यात आला असून ह्या पुनर्रचनेमुळे मुंबईकरांची गैरसोय होणार आहे. पश्चिम उपनगरातील अनेक प्रभागांमध्ये मोठा फेरफार करण्यात आल्याचा दावाही भारतीय जनता पक्षाने केला आहे.