नवी दिल्ली : 'ईडी’तर्फे ’पीएमएलए’ कायद्यांतर्गत नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि विजय मल्ल्या यांसारख्या कर्जबुडव्यांची १८,१७०.०२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ही संपत्ती बँकांच्या झालेल्या एकूण नुकसानीच्या ८०.४५ टक्क्यांच्या बरोबर आहे. त्यातील एक हिस्सा सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. हस्तांतरित केलेल्या संपत्तीची किंमत ९,३७१.१७ कोटी रुपये आहे.
नीरव मोदी याची बहीण पूर्वी मोदी हिने ‘ईडी’ला आपल्या खात्यातून १७.२५ कोटी रुपये परत केले आहेत. ’ईडी’तर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, नीरव मोदी याने पूर्वी मोदी हिच्या नावे ‘युनायटेड किंग्डम’मधील एका बँकेत खाते उघडले होते, त्याची माहिती बहिणीला नव्हती. त्याची माहिती मिळाल्यानंतर त्या खात्यातील १७.२५ कोटी रुपयांची रक्कम पूर्वी मोदी हिने ’ईडी’कडे हस्तांतरित केली आहे. केंद्र सरकारच्या विविध तपास यंत्रणांकडून कर्जबुडवे आणि त्यांच्याशी संबंध असणार्या अनेकांकडून आत्तापर्यंत कोट्यवधींची मालमत्ता जप्त करण्यात आले आहेत.
माघारी परतण्याशिवाय कुठलाही पर्याय नाहीच : नरेंद्र मोदी
“देशात आर्थिक गैरव्यवहार करून परदेशात पसार झालेल्या ‘हाय-प्रोफाईल’ फरारी आर्थिक गुन्हेगारांना माघारी आणण्यासाठी केंद्र सरकार सर्व मार्गांचा उपयोग करत आहे. विविध देशांतील धोरणे आणि कायद्यांचे पालन करत केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा कारवाई करत आहेत. आत्तापर्यंत पाच लाख कोटींहून अधिक वसुली झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे देशात माघारी परतण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही,” असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कर्जबुडव्यांना इशारा दिला. मात्र, यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कोणत्याही कर्जबुडव्यांच्या नावांचा उल्लेख केला नाही.
पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी ‘ग्लोबल इन्होवेशन समिट’मध्ये बँकिंगसह विविध क्षेत्रांवर संबोधित केले. ते म्हणाले की, “देशातील बँकाची स्थिती अधिक बळकट झाली आहे. २०१४ मध्ये आपले सरकार आल्यापासून बँकांच्या स्थितीत खूप सुधारणा झाली आहे. गेल्या सहा-सात वर्षांत केंद्र सरकारने केलेल्या सुधारणांमुळे ‘बँकिंग’ क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. आम्ही बँकांची अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) समस्या सोडवली आहे. बँकांसाठी नवीन भांडवल उपलब्ध करून दिले आहे. दिवाळखोरी कायदा आणला आहे आणि कर्जवसुली न्यायाधिकरणाला अधिकार देण्यात आले आहेत. भारतीय बँका आता देशाच्या अर्थव्यवस्थेत नवीन ऊर्जा ओतण्यासाठी मजबूत स्थितीत आहेत. यामुळे भारताचा स्वावलंबी होण्याचा मार्ग मोकळा होईल,” असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.