
पुणे : २०२० मधील मार्च महिन्यात पुणे शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. महाराष्ट्र राज्यातील हा पहिलाच कोरोना रुग्ण होता. काही दिवसातच कोरोनाने पुणे शहराभोवती विळखा घातला. गेल्या वर्षी पुणे शहरात ४५०० जण कोरोनाने मृत्युमुखी पडले. हिंदू धर्माच्या रितीरिवाजानुसार घरात एखाद्याचे निधन झाल्यास वर्षभर त्या घरात कोणतेही सण-उत्सव साजरे होत नाहीत.
वर्षभरात कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांकडे पुणे महानगरपालिकेतर्फे गेल्या वर्षी दिवाळीचा फराळ पाठवण्यात आला; दिवाळी फराळासोबतच एक संदेश पत्र देखील पाठवण्यात आले. २०२० ह्या वर्षी पुणे शहरात ४५०० पेक्षा जास्त घरी पुणेमहानगरपालिकेतर्फे फराळ आणि संदेशपात्र पाठवण्यात आले. तर ह्या वर्षी ५००० पेक्षा जास्त पुणेकरांच्या घरात पुणेमनपा तर्फे संदेशपत्र आणि दिवाळी फराळ पाठवण्यात आला आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे दुःखात असलेल्या कुटुंबियांना आधार देणे आणि त्यांच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहणे ह्या उद्देशातून हा उपक्रम मागच्या वर्षी सुरु करण्यात आला.
२०२० मध्ये ४५०० पेक्षा जास्त तर ह्या वर्षी ५००० पेक्षा जास्त कुटुंबीयांकडे दिवाळी फराळ पाठवण्यात आला आहे. ह्या उपक्रमाची माहिती देताना ''गेल्या दीड-पावणे दोन वर्षात जवळपास साडेनऊ हजार कुटूंबियांच्या घरी दुःखाचे सावट होते. ज्यांनी कुटूंबियांतील सदस्य गमावले, त्यांचे दुःख कमी होणारे नसले तरी अशा कुटूंबियांना आधार देणे आवश्यक होते. म्हणूनच त्यांना आधार देण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून संदेशपत्र आणि फराळ पोहोचवत आहोत'' अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. कोरोनाच्या संकटकाळात एकूणच नकारात्मक वातावरणात निर्माण झाले होते, त्यात कोरोनाची लागण होऊन अनेक जण मृत्युमुखी पडले. ह्या पार्श्वभूमीवर दुःखाचा डोंगर मागे सारून नवी पहाट अशा कुटूंबियांमध्ये आणणे आवश्यक होते.