आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात अमूक एक क्षेत्र हे केवळ पुरुषांसाठी वगैरे चित्र तसे नगण्यच! अगदी अंतराळापासून ते अणुसंशोधनापर्यंत महिलावर्ग आज सर्वच क्षेत्रात आघाडीवर दिसतो. पूर्वी वाहन उत्पादन क्षेत्रात पुरुषांचाच पगडा होता. परंतु, आजघडीला हे चित्र पूर्णपणे पालटलेले दिसते. तेव्हा, नवरात्रीच्या निमित्ताने वाहन उद्योगजगतातील ‘नारीशक्ती’चा आढावा घेणारा हा लेख...
उद्योग-व्यवसायातील बदलता काळ आणि कामकाजानुसार विविध क्षेत्रांतील उद्योगांमध्ये महिलांची संख्या आणि त्यांच्या कामाचे स्वरूप यामध्ये गुणात्मक व लक्षणीय स्वरूपात वाढ झाल्याचे दिसते. यामध्ये उत्पादक क्षेत्रातील कंपन्यांनी विशेष प्रयत्न आणि पुढाकार घेतला आहे. त्यातही ‘नेस्ले’, ‘आयटीसी’, ‘कोका कोला’, ‘डियॅजिओ’, ‘वेदांता’ यासारख्या प्रमुख कंपन्यांनी विशेष उल्लेखनीय प्रयत्न केले आहेत. परिणामी, त्यांचे अनुकरण विविध उद्योगांमध्ये करण्यात येत असून, त्याचा तपशील पुढीलप्रमाणे-
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ‘नेस्ले इंडिया’ कंपनीने कंपनीच्या गुजरातमधील सानंद येथील कारखान्यामध्ये ६० टक्के महिला कर्मचार्यांची नेमणूक करण्याचा धोरणात्मक निर्णय कंपनीने घेतला आहे. सद्यःस्थितीत एखाद्या कंपनीत महिला कर्मचार्यांची नेमणूक एवढ्या मोठ्या संख्येत करण्याचा हा उपक्रम नवीन व अभिनव ठरला आहे.
उद्योग व्यवसायातील तज्ज्ञांनुसार यापूर्वी कंपनीत संचालक व्यवस्थापक वा अधिकारी पदावर महिलांची नेमणूक केली जात असे. विशेषतः कंपनीस्तरावर सर्वोच्च अशा संचालक मंडळावर महिलांची नेमणूक करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘सेबी’सारख्या शीर्षस्थ संस्थांनी पुढाकार घेतला असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. मात्र, कंपनी उत्पादनक्षेत्रात महिलांची मोठ्या संख्येत नेमणूक होण्याची उत्साहवर्धक उदाहरणे आता पुढे येत आहेत, हे विशेष.
यासंदर्भात ‘कोका-कोला’च्या धोरणानुसार कंपनीने गेली काही वर्षे त्यांच्या उत्पादन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर फार मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. या यांत्रिक कार्यपद्धतीमुळे कंपनीच्या उत्पादन कामात सुलभता निर्माण झाली आहे. परिणामी, कंपनीने त्यांच्या विविध विभागांमध्ये महिलांची निवड-नेमणूक करण्यास प्राधान्य दिले आहे. परिणामी, ‘कोका-कोला’मधील महिला कामगारांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कंपनी व्यवस्थापनानुसार सद्यःस्थितीत त्यांच्या गुजरातच्या कारखान्यात महिलांची टक्केवारी ४५ टक्के असून, सिलीगुडी येथील प्रस्तावित कारखान्यात महिला कामगारांचे प्रमाण ६० टक्क्यांवर नेण्याचा कंपनीचा मानस आहे.
ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रात काम करणार्या ‘आयटीसी’ कंपनीने या संदर्भात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कंपनीच्या दक्षिण भारतातील कारखान्यांच्या संदर्भात सांगायचे झाल्यास ‘आयटीसी’च्या तामिळनाडू व कर्नाटक राज्यांमधील कारखान्यांमध्ये सध्या महिला कामगार बहुसंख्य आहेत, तर ‘आयटीसी’च्या म्हैसूरमधील कारखान्यात महिला कामगार तर तीन पाळ्यांमध्ये काम करू लागल्या आहेत. महिला कामगारांच्या संदर्भातील हे बदल मोठे आणि लक्षणीय ठरले आहेत.
अॅल्युमिनिअम उत्पादन क्षेत्रात काम करणार्या ‘वेदांता’ या कंपनीने तर कंपनीत महिलांची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. कंपनीच्या उत्पादन विभागात काम करणे व त्यासाठी प्रसंगी खाणीत काम करणे, या गोष्टी अवघड समजल्या जातात. त्यामुळे या क्षेत्रात काम करणार्या महिलांची संख्या आधी नगण्यच असायची, या आव्हानात्मक परिस्थितीत ‘वेदांता’ कंपनीने महिला कर्मचार्यांची निवड-नेमणूक करण्यास योजनापूर्वक सुरुवात केली. त्यासाठी प्रयत्नपण केले.
परिणामी, आज कंपनीतील महिला कर्मचार्यांची संख्या ३० टक्क्यांच्या वर गेली आहे. ‘वेदांता’ उद्योग समूहातील ‘ईएसएल स्टील कंपनी’त तर आज पोलाद उत्पादन क्षेत्रात अत्यंत अवघड समजल्या जाणार्या फर्नेस विभागातसुद्धा महिला तंत्रज्ञ काम करण्यासारखे आक्रित घडले आहे. आता कंपनीच्या ‘कास्टिंग’ विभागातही महिलांची नेमणूक केली गेली आहे.
वाहन-उपकरणे उत्पादनक्षेत्रातही महिला कर्मचार्यांनी आघाडी घेतलेली दिसून येते. काही ठिकाणी तर महिला कर्मचार्यांकडे महत्त्वाची जबाबदारी दिल्याचेही दिसून येते. यासंदर्भात विशेष व उल्लेखनीय बाब म्हणजे ‘एमजी मोटर्स कंपनी’च्या हलोल-गुजरात येथील कारखान्यातून ५० हजारावा ट्रॅक्टर बाजारात आणला गेला. ५० हजार ही आकडेवारी महत्त्वाची आहेच; पण मुख्य म्हणजे या विशेष ट्रॅक्टरचे संपूर्ण उत्पादन महिला तंत्रज्ञ अभियंत्यांनी केले आहे, ही बाब उत्पादन-उद्योगक्षेत्रातील एकूणच महिलांसाठी अभिमानास्पद ठरली आहे.
वाहन उद्योगक्षेत्रात अग्रणी अशा ‘टाटा मोटर्स’, ‘महिंद्र अॅण्ड महिंद्र’, ‘एमजी मोटर्स’, ‘डॅमलर इंडिया’, ‘मदरसन ग्रुप’, ‘टोयाटो’ यांसारख्या कंपन्या महिलांची निवड करण्यासाठी नव्या संदर्भात प्रयत्न करीत आहेत, या प्रयत्नांना यशदायी प्रतिसाद लाभत आहे. परिणामी, आज ‘एमजी मोटर्स’ कंपनीमध्ये सुमारे ३८० महिला तंत्रज्ञ-कर्मचारी काम करीत असून, कंपनीतील एकूण कर्मचार्यांच्या संख्येत त्यांची संख्या एक तृतीयांश ठरली आहे.
‘स्वराज ट्रॅक्टर्स’सारख्या कंपनीने आपल्या प्रत्यक्ष कारखान्यातील कामासाठी ६२ महिला तंत्रज्ञांची नेमणूक केली आहे. या महिला ट्रॅक्टर्स उत्पादनाशी निगडित अशा जुळणी, रंगकाम, तांत्रिक बाबी या महत्त्वाच्या व जोखमीच्या कामांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. ‘स्वराज ट्रॅक्टर्स’च्या संदर्भातील अन्य महत्त्वाची बाब म्हणजे कंपनी पात्रताधारक महिलांची प्रशिक्षणार्थी वा शिकाऊ उमेदवार म्हणून नेमणूक करतात. त्यांना ट्रॅक्टर्स उत्पादन क्षेत्रातील विविध विभागांमध्ये प्रशिक्षण दिले जाते व त्यातून निवडक महिलांची तंत्रज्ञ म्हणून कंपनीत नेमणूक केली जाते. कंपनीच्या या धोरणात्मक निर्णयाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.
यासंदर्भात ‘टाटा मोटर्स’च्या संदर्भातील उल्लेखनीय बाब म्हणजे, कंपनीच्या उत्पादन विभागात विविध कामे करण्यासाठी महिलाही त्यांच्या पुरुष सहकार्यांच्या बरोबरीने कार्यरत आहेत, यामध्ये कार्यालयीन कामांव्यतिरिक्त असेंब्ली उत्पादनापर्यंतच्या सर्व विभागांचा समावेश आहे, हे विशेष. ‘टाटा मोटर्स’मध्ये कुशल कामे करणार्या महिला कर्मचार्यांच्या संख्येत २०१६-१७ पासून उल्लेखनीय वाढ झालेली दिसून येते. परिणामी, सध्या ‘टाटा मोटर्स’मध्ये कंपनीस्तरावर सुमारे १,८०० महिला कार्यरत असून, त्यामध्ये कंपनीच्या जमशेदपूर येथील कारखान्यातील फिटिंग व इलेक्ट्रॉनिक उपकरण विभागात जवळ-जवळ १०० टक्के महिला कर्मचारी आहेत. याशिवाय ‘टाटा मोटर्स’च्या पुणे येथील कारखान्यातही ६५० महिला कर्मचारी आहेत.
‘टोयाटो किर्लोस्कर मोटर कंपनी’मध्ये तंत्रज्ञान अभियांत्रिकी याशिवाय उत्पादनाला साहाय्यक अशा सर्वच विभागांमध्ये महिला कर्मचारी कार्यरत आहेत. याशिवाय नजिकच्या भविष्यात कंपनीमध्ये महिलांची संख्या वाढविण्यासाठी योजनापूर्वक प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी कंपनीच्या पुढाकारातून ‘टोयाटो टेक्निकल इन्स्टिट्यूट’द्वारा महिलांना विशेष प्रशिक्षणही दिले जाते.
तंत्रज्ञान उत्पादन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, वाहन-उद्योग क्षेत्रात सर्वच प्रकारची कामे करण्यासाठी महिला पुढाकार घेत आहेत. त्यांना संबंधित कंपनी व्यवस्थापनांची साथ मिळत असून, त्याचाच हा परिणाम म्हणावा लागेल. एकूणच तंत्रज्ञान-अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी महिलांचा कल वाढता आहे, तर त्याचवेळी प्रत्यक्ष कारखाना उत्पादन क्षेत्रात जिद्दीने, चिकाटीने व मुख्य म्हणजे कार्यक्षमपणे काम करून या महिला कर्मचार्यांनी वाहन उत्पादन क्षेत्रात काम करण्यासाठी आपली पात्रता, क्षमता व कार्यक्षमता या सर्वच बाबी सिद्ध केल्या आहेत.
- दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर व्यवस्थापक व सल्लागार आहेत.)
९८२२८४७८८६