डाॅ. मंदार पाटकर - कोरोना साथीच्या काळात अनेक गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या व त्यातील फार महत्त्वाची बाब म्हणजे होमियोेपॅथिक उपचारांना मिळालेली सापत्न वागणूक! गेल्या २०० वर्षांपासूनही जास्त काळ काळाच्या व निसर्गाच्या प्रत्येक निकषावर तावूनसुलाखून आपली उपयुक्तता व श्रेष्ठत्व सिद्ध करुनही सरकार दरबारी होमियोपॅथीला राजमान्यता नाही, ही औषधशास्त्रात व सरकारसाठी अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. होमियोपॅथी औषधशास्त्राला ही दुय्यम वागणूक नेहमी जाणूनबुजून दिली जाते. होमियोपॅथिक डॉक्टर नेहमीच अॅलोपॅथी डॉक्टरांचा मान राखतात. परंतु, याउलट अॅलोपॅथीचे डॉक्टर नेहमीच होमियोपॅथीला नावे ठेवताना दिसतात आणि ही गोष्ट बरेचदा त्यांच्या होमियोपॅथीबद्दलच्या अज्ञानातून होत असते. होमियोपॅथीचा वाढता पसारा बघता मग फार्मा कंपन्यांनासुद्धा पोटशूळ उठतो. दर काही दिवसांनी होमियोपॅथीविरुद्ध ‘पेड न्यूज’ पसरवली जाते.
कोरोना काळातही अनेकदा होमियोपॅथीची परिणामकारकता सिद्ध होऊनही सरकारने होमियोपॅथीच्या उपचाराला हॉस्पिटलमध्ये परवानगी दिली नाही. औषधशास्त्रात एकमेकांच्या संगनमताने चालायचे सोडून फक्त होमियोपॅथी कशी वाईट व होमियोपॅथी कसे ‘प्लेस्बो इफेक्ट’ देते, यावर कित्येक अॅलोपॅथीचे डॉक्टर भरभरून बोलताना दिसतात. परंतु, होमियोपॅथीमुळे मिळणारे ‘रिझल्ट’ हे लोक विसरतात व त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करतात. स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी दुसर्याला कमीपणा आणण्याची अजिबातच गरज नसते. स्वत:च्या कामातूनच स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करावे लागते. परंतु, इथे असे होताना दिसत नाही. कोरोना काळातही होमियोपॅथीने अतिशय मोलाची कामगिरी बजावली असतानाही कोरोना ‘टास्क फोर्स’मध्ये होमियोपॅथीचा समावेश केला गेला नाही.
जगात सर्व लोकांनी फक्त अॅलोपॅथीची औषधे घ्यावी व इतर पॅथीची औषधे घेऊच नये यासाठी अप्रत्यक्षरीत्या केला गेलेला हा प्रयत्न आहे व जो प्रयत्न सतत चालूच असतो. याला ‘लोकशाही’ म्हणत नाहीत. इतकेच काय, पण ज्या लोकांना होमियोपॅथीची ‘प्रॅक्टिस’ करण्यात व होमियोपॅथीत काहीही स्वारस्य नसते, असे महाभाग होमियोपॅथिक डॉक्टर्स स्वतःच आम्हाला अॅलोपॅथी करू द्या, अशी विनवणी करत स्वतःच्याच आईला (होमियोपॅथीला) कमीपणा आणतात. अशा डॉक्टर्सचे होमियोपॅथीची पदवी घेण्यामागचे एकच ध्येय असते व ते म्हणजे पदवी होमियोपॅथीची घ्यायची व प्रॅक्टिस अॅलोपॅथीची करायची. जर अशा डॉक्टरांचा होमियोपॅथीवर विश्वासच नसतो, तर असे लोक होमियोपॅथीला प्रवेश घेतातच का? कारण, कमी मार्कांमध्येही होमियोपॅथीला प्रवेश देण्याची वाईट सवय सरकारने यांना लावली.
होमियोपॅथीचे अधःपतन येथेच सरकारकडून केले जाते. अॅलोपॅथीला मात्र जास्त मार्क हवेत आणि होमियोपॅथीला कमी मार्क चालतील, असा भेदभाव इथे करण्यात येतो. मग काय अॅलोपॅथी प्रॅक्टिस करण्यासाठी फक्त होमियोपॅथीची पदवी घ्यायची व बिनधास्त अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करायची, असा शिरस्ता झाला. त्यातूनच मग जशी बांडगुळे येतात तशी जिकडे तिकडे होमियोपॅथीची महाविद्यालये उभी राहिली आणि अॅलोपॅथिक डॉक्टर होण्याचा एक स्वस्त आणि मस्त पर्याय लोकांना मिळाला. होमियोपॅथीचे दुर्दैव दुसरे काय! होमियोपॅथिक औषध प्रणाली काय, अॅलोपॅथी काय किंवा आयुर्वेद काय या तिन्ही शाखा आपापल्या ठिकाणी श्रेष्ठच आहेत. प्रत्येक औषधशास्त्राचे स्वत:चे असे एक बलस्थान आहे, तसेच प्रत्येक औषधशास्त्राच्या मर्यादा पण आहेत आणि म्हणूनच एक दुसर्याला कमीपणा न दाखवता सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची नितांत गरज आहे. होमियोपॅथीला यासाठी राजमान्यता मिळणे फार गरजेचे आहे.
त्यासाठी फार महत्त्वाचे म्हणजे अॅलोपॅथी व फार्मा कंपन्यांच्या दबावाला बळी न पडता स्वत: लोकहिताचे निर्णय घेणे फार गरजेचे आहे. होमियोपॅथी, आयुर्वेद व अॅलोपॅथीसाठी निराळ्या प्रवेश परीक्षा असणे फार गरजेचे आहे. कारण, एकाच परीक्षेमुळे होमियोपॅथी व आयुर्वेदावरआपोआपच अन्याय होतो. कारण, ज्यांना अॅलोपॅथीला प्रवेश नाही मिळत ते लोक होमियोपॅथी व आयुर्वेदाकडे वळतात. आपोआप दुय्यम वागणुकीची सुरुवात इथे होते. प्रत्येक पॅथी जर आपल्या ठिकाणी श्रेष्ठ आहे, तर मग त्यांना त्याचा मान मिळालाच पाहिजे. याचबरोबर ज्यांनी जी पदवी घेतली आहे, त्याच पॅथीची ‘प्रॅक्टिस’ त्यांनी करावी, ही साधी अपेक्षा आहे. परंतु, आपल्याकडे हे होताना दिसत नाही. होमियोपॅथी ही आताच्या काळात जगात क्रमांक दोनची वापरली जाणारी औषध प्रणाली आहे. तिच्यावर असा अन्याय होता नये. डॉ. हॅनेमान यांनी माणसाला निरोगी व रोगमुक्त करण्यासाठी होमियोपॅथीचा शोध लावला. त्याची राजकारणामुळे वाट लागू नये, हीच इच्छा...!
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)
9869062276