
डाॅ. शुभांगी पारकर - टोकियो २०२०’ ऑलिम्पिक अनेक गोष्टींमुळे लक्षात राहील. अर्थात, अशाप्रकारे जागतिक पातळीवरील स्पर्धा, त्या खेळापलीकडे तिथे घडणार्या खेळाशी आणि खेळाडूंशी निगडित अशा अनेक घटना आणि कथांमुळे गाजत असते. पण, यावेळी ही स्पर्धा काही विशेष घटनांमुळे गाजली. मुख्यत्वेकरून सिमोन बायल्स या ख्यातनाम खेळाडूने आपल्या मानसिक आरोग्याचे रक्षण करण्याच्या हेतूने ‘ऑलिम्पिक’ स्पर्धेतून घेतलेल्या माघारीने संपूर्ण जगात दि. ३ ते १० ऑक्टोबर हा आठवडा ‘मानसिक आरोग्य सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने खेळामध्येही मानसिक आरोग्य सर्वसामान्य जनांच्या मानसिक आरोग्याइतकेच महत्त्वपूर्ण आहे, हे अधोरेखित होते. सिमॉनने आपण शारीरिकदृष्ट्या पूर्ण सक्षम असूनही मानसिकदृष्ट्या या स्पर्धेतून स्वत:च्या सुरक्षेचा निर्वाळा देऊ शकत नाही म्हणून या स्पर्धेतूनआपण बाहेर पडत आहोत, असे जाहीर केले. अनेक खेळाडूंसाठी एक आदर्श ‘रोल मॉडेल’ असलेली सिमॉन मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा जगण्यासाठी प्रथम विचार केला पाहिजे, सुवर्णपदक आणि विजय हे यानंतरची बाब आहे, असा एक सशक्त आणि सकारात्मक संदेश उत्सुकभावी खेळाडूंसह संपूर्ण जगाला विचारपूर्वक गेला. जगप्रसिद्ध ‘टाईम’ मासिकाने या प्रसंगानंतर टोकियो ‘ऑलिम्पिक’नंतर खेळाडूंच्या मानसिक आरोग्याची भाषा आणि संकल्पना किती महत्त्वाची झाली आहे, ही बातमी जगासमोर मुख्य बातमी म्हणून सादर केली. जेसिक बार्टले या अमेरिकन ‘ऑलिम्पिक’ आणि ‘पॅरालिम्पिक’ समितीच्या मानसशास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनीही जाहीर केले की, या स्पर्धेच्या दरम्यान त्यांना निनावी पत्रातून किंवा प्रत्यक्ष विनंतीतून, ‘क्वारंटाईन’च्या समस्या आणि कोरोना संसर्गाच्या भीतीपासून ते आपण अपयशी होऊ वा सर्वोत्तम कामगिरी करता न येण्याच्या भीतीपोटी जवळजवळ दहातरी विनंती अर्ज खेळाडूंकडून दररोज मिळत असत. ज्यात आपल्या भावनिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांचा विशेष उल्लेख असे.
जगातील क्रमांक एकचा टेनिसपटू नाओमी ओसाकाने या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या मानसिक आरोग्याचे संरक्षण करण्याच्या हेतूने सामन्यांनंतरच्या मुलाखती टाळण्याचा जबरदस्त निर्णय घेतला. इंग्लडचा क्रिकेटपटू बेन स्टोक्स याने मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेण्याचे ठरविले. सुवर्णपदक विजेता ब्रिटिश जलतरणपटू अॅडमपिटी याने ‘टोकियो २०२०’ झुंजीनंतर एका महिन्याची मानसिक आरोग्याची विश्रांती घेणार असल्याचा निर्णय जगजाहीर केला. एकामागून एक असे अनेक खेळाडू आपल्या साथीदारांचा आदर्श समोर ठेवत आपल्या मानसिक आरोग्याचे संवर्धन करण्याच्या प्रयत्नांवर अधिक जोर देऊ लागले आहेत. शारीरिक तंदुरुस्ती हवीच, पण खेळाडूंना आता पूर्ण उमगायला सुरुवात झाली आहे की, मानसिक आरोग्याशिवाय आरोग्याची संकल्पना टिकाव धरूच शकत नाही. किंबहुना, पूर्ण जगाला व
आधुनिक क्रीडापटू आज ज्या जगात आपला खेळ आजमावत आहेत, कार्यरत आहेत ते जग सातत्याने विकसित होत आहे. खेळांमधील स्पर्धेचे स्वरूप आता पूर्वीपेक्षा जवळजवळ १८० अंशांनी बदलले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. खेळांच्या स्पर्धांमध्ये पूर्वीसारखी सादगी आणि खेळाची शुद्ध प्रेरणा आता उरली नाही. सोशल मीडिया, वैश्विक टीव्ही कव्हरेज, कोट्यवधींची जाहिरातबाजी काही खेळांमध्ये प्रचंड प्रमाणात आर्थिक लाभ, वरच्या पातळीवर होणारे व्यवहार या गोष्टींचा अलीकडच्या क्रीडापटूंना विषारी तणाव आणि प्रचंड भावनिक दबाव सहन करावा लागतो. यामुळे पूर्वीपेक्षा कित्येक पटीने अधिक प्रमाणात खेळाडूंना मानसिक समस्या सहन करावी लागत आहे. आपण अनेक खेळाडूंना ज्यांनी खेळात अभूतपूर्व झेप घेतलेली पाहिली आहे आणि ते आश्चर्यकारकरीत्या खेळाच्या क्षितिजावरून गायब झालेलेही पाहिले आहे. त्यात क्वचित राजकीय कुटनीती असू शकते, पण पूर्वी वाच्यता न करता आलेल्या मानसिक आरोग्याच्या समस्याही असू शकतात.
खेळाडूंवरचा दबाव आपण कल्पनाही करू शकणार नाही, इतका जबरदस्त असतो. एखाद्या खेळाडूची कामगिरी त्याच्या क्षमतेनुसार होत नसेल, तर तो स्वतःच्या नजरेत घसरतो, त्याचे नैतिक खच्चीकरण होत जाते. आपल्या मनासारखे स्पर्धेत यश मिळत नाही तेव्हा आपले पूर्ण जग कोसळते आहे की काय, असे खेळाडूंना वाटते. बहुतेक वेळा तुम्ही जेव्हा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे क्रीडापटू असता तेव्हा ती तुमची आयुष्यभराची ओळख असते. खेळांमध्ये कसे वेग आहे, अवसान आहे, ऊर्जा आहे, धाडस आहे, शौर्य आहे. त्यामुळे त्यामध्ये आराम, विश्रांती, चिंतन, वाटाघाटीसारख्या संथ-मवाळ संकल्पनांना वाव मिळत नाही. खरेतर आपल्यापैकी प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी विश्रांती घेऊन स्वतःलापुनःप्रस्थापित करायची गरज असते. भूतकाळाला थकवा घालवून नव्या जोमाने आयुष्य जगण्याची शास्त्रीय गरज असते. आपण झाडाच्या फांद्या पावसाळ्याच्या सुरुवातीला छाटतो आणि झाडांना पुन्हा एकदा मिळालेली घनदाट हिरवाई पाहतो. माणसांसाठीसुद्धा मानसिक आणीबाणीच्या वळणावर विसावण्याची गरज असते. पुन्हा उत्साहवर्धक जीवन जगण्यासाठी खेळाडूंचे भावनिक आणि मानसिक अनुभव शेवटी सामान्य माणसाच्या अनुभवाचेच प्रतिबिंब आहे. अर्थात, सर्व खेळाडूंना असा उत्साहवर्धनासाठी विसावा घेणे जमेलच असे नाही. कारण, खेळ ही तशी अमुक वेळेतच करता येणारी नोकरी नसून जोपर्यंत तुम्ही कृतिशील आहात तोपर्यंत ती जीवनशैली आहे. ती खेळाडूंकडे शारीरिक फिटनेस किंवा दुखापतीच्या संदर्भात पाहतो. कधीकधी त्यांना आपण ‘सुपरमॅन’ समजतो, पण त्यांना भावनिक आणि मानसिक अशक्तपणा येत असेल आणि त्यासाठीही उपाययोजना आवश्यक आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्या क्रीडापटूंच्या मानसिक आरोग्याचे महत्त्वसुद्धा समजून घ्यायला हवे. खेळाच्या विश्वात उमगलेले मानसिक आरोग्य आज प्रत्येकाच्या दर्जेदार जगण्यासाठी आवश्यक आहे.