मुंबई : “ ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने गेल्या सहा दशकांत जगाच्या नकाशावर स्वतःची ओळख करण्यात यश मिळवले आहे. पंतप्रधानांचे ‘व्हिजन’ आहे वाहतुकीतून परिवर्तन (Transformation through transportation) घडवून आणणे. याकामी ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ची मोठी भूमिका आहे. आगामी काळात याची ताकद आणखी वाढवण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग खात्याचे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केले.
रविवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या हिरक महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी बंदरे, नौवहन आणि राज्यमंत्री शांतनू ठाकूर, खासदार मनोज कोटक, ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या अध्यक्ष एच.के.जोशी, ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’चे अध्यक्ष राजीव जलोटा यांची उपस्थिती होती.
२०२२ पर्यंत ४०० अब्ज अमेरिकी डॉलर्स निर्यातीचे लक्ष्य साध्य करणार
“भारताला नौवहन क्षेत्रातील जागतिक केंद्र बनवण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. त्यानुसारच पंतप्रधानांनी घालून दिलेले २०२२ पर्यंत ४०० अब्ज अमेरिकी डॉलर्स निर्यातीचे लक्ष्य साध्य करणार असल्याचे सर्वानंद सोनोवाल म्हणाले. यासाठी सर्व मंत्रालय, निर्यातदार एकजुटीने काम करत असल्याचे सोनोवाल यांनी सांगितले.
“मुंबई देशातील प्रमुख केंद्र आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई ओळखले जाते. ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ची यात महत्त्वाची भूमिका राहिली आहे. ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने महिला शक्तीचे उदाहरण दाखवून दिले आहे. यामुळे आगामी काळात या क्षेत्राकडे महिला आणखी मोठ्या प्रमाणात वळतील,” असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी घालून दिलेल्या आदर्शनानुसार सेवा बजावली पाहिजे.
‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने गेल्या सहा दशकांत केलेल्या कामाचे सर्वानंद सोनोवाल यांनी कौतुक केले. आगामी काळात सागरी क्षेत्र विकासासाठी काम करण्याची मोठी संधी आहे. आजच्या कार्यक्रमाचे सर्व आयोजन स्वतः ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने करुन ‘आत्मनिर्भरते’चे उदाहरण दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश जलदरित्या ‘आत्मनिर्भरते’कडे वाटचाल करत आहे, असे याप्रसंगी बोलताना सोनोवाल यांनी म्हटले.
२०३० पर्यंत जगात नौवहन क्षेत्राला सर्वात उंचीवर घेऊन जाण्याचे पंतप्रधानांचे व्हिजन
राज्यमंत्री शंतनू ठाकूर याप्रसंगी बोलताना म्हणाले, “२०३० पर्यंत जगात नौवहन क्षेत्राला सर्वात उंचीवर नेण्याचे पंतप्रधानांचे ‘व्हिजन’ आहे. देशातील प्रमुख बंदरांचा विकास करणे. बंदरांना आंतरराष्ट्रीय नकाशावर आणण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. नौवहन क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी आहेत. त्यासाठी योग्य शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यात येईल. देशांतर्गत जलमार्ग हा पंतप्रधानांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या क्षेत्राला चालना मिळाल्यास कमी खर्चात मालवाहतूक सुविधा पोहोचवणे सुलभ होईल.
“ ‘एससीआय’च्या माध्यमातून जागतिक अर्थव्यवस्थेत भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ला सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल,” असे शंतून ठाकूर म्हणाले. आर्थिक अडचणी असतानाही ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने नवोन्मेषी उपाययोजनांच्या माध्यमातून सागरी क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केल्याचे ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या अध्यक्ष एच. के. जोशी म्हणाल्या.
कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या सहा दशकांच्या कार्याचा आढावा घेणारे ‘कॉफी टेबल बुक’ प्रकाशिक करण्यात आले. तसेच कांडला बंदराहून निर्यात जहाज एम. व्ही. एससीआय चेन्नईला हिरवी झेंडी दाखवण्यात आली.