प्रत्युत्तरासाठी सज्ज

    30-Oct-2021
Total Views | 89

china_1  H x W:




भारत-पाकिस्तान सीमेवर असलेली एक कोर आता चीनच्या विरुद्ध आक्रमक कोर म्हणून काम करेल. याशिवाय काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी अभियानामध्ये गुंतलेल्या सैनिकांना आता काढून लडाखमध्ये पाठवण्यात आले आहे. आता भारताची आक्रमक सतरा कोर चीनवर हल्ला करण्याकरता सज्ज झालेली आहे. यामुळे चीनला प्रत्युत्तर देण्याची क्षमता पुष्कळच वाढली आहे.




 चीनमध्ये अंतर्गत आव्हाने वाढत आहे




सीमेवरून आपले सैन्य मागे घेण्याबाबत वाद कायम आहे. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकार्‍यांची चर्चेची ताजी तेरावी फेरी अयशस्वी ठरली.उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ’अरुणाचल प्रदेश’ला भेट दिली. सीमा तंटा वाढेल, अशी कोणतीही कृती भारताने करू नये, असा सल्ला चीनने दिला. त्यावर, त्वरित उत्तर देऊन भारताने आपली कणखर भूमिका स्पष्ट केली.चीन भारत-चीन सीमेवर ६५० लहान गावे वसवत आहे, हेतू आहे भारतीय सीमेवरती लक्ष ठेवणे. भारत-चीन सीमेवर चिनी सैन्याची तैनाती ५० - ६०हजार हून जास्त आहे. चिनी सैन्य परत जायची शक्यता दिसत नाही. लडाख भागात चिनी सैन्याला आणखी एका कठोर हिवाळ्यास सामोरे जाणे भाग आहे, असे दिसते आहे.



चीनच्या ‘नॅशनल हेल्थ कमिशन’ने इशारा दिला आहे की, सुमारे एका आठवड्यात ‘कोविड’चा संसर्ग ११  राज्यांमध्ये पसरला आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. ऊर्जा टंचाईपासून अनेक समस्यांनी चीन गांजला आहे. यामुळे असे वाटते की, चिनी जनतेचे लक्ष अंतर्गत समस्येपासून काढण्याकरिता, भारतावरती हल्ला करू शकतो.जर युद्ध झाले तर चीनला प्रत्युत्तर देण्याकरिता भारतीय सैन्य तयार आहे का? देशाने काळजी करू नये. आत्ताच पूर्व कमांडचे मुख्य लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी माध्यमांना ‘इंटरव्ह्यू’ दिला आणि त्यामध्ये भारतीय सैन्य प्रत्युत्तर देण्याकरिता कशी तयारी करत आहे, हे मांडले. जनरल मनोज पांडे म्हणाले की, पूर्व क्षेत्रामध्ये चीनचे पेट्रोलिंग थोड्या प्रमाणात वाढलेले आहे. याशिवाय चीन वेगवेगळे युद्ध अभ्याससुद्धा इथे करत आहे. परंतु, पूर्व कमांड सगळ्या प्रकारच्या चिनी आव्हांनाना तोंड देण्याकरिता तयार आहे.

चिनी सैन्याची घुसखोरी करण्याची पद्धत
चिनी सैन्य नेमके काय करते? ज्या ठिकाणी भारतीय सैन्य नाही अशा ठिकाणी चिनी सैन्य घुसखोरी करते. घुसखोरी झाली की, भारतीय सैन्य तिथे जाऊन चिन्यांना हुसकावते. असा लपाछपीचा डाव, चिनी सैन्य भारत-चीन सीमेवरती खेळत असते. सीमा डोंगराळ असल्यामुळे, लांब असल्यामुळे सगळीकडे सैन्य तैनात करणे व्यावहारिक नाही. अशा परिस्थितीमध्ये भारत चीनची घुसखोरी कशी थांबू शकेल आणि घुसखोरी झाल्यास त्यांना कसे हुसकावून लावू शकेल? जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली किंवा युद्ध झाले तर भारतीय सैन्य नेमके काय करेल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जनरल मनोज पांडे यांनी माध्यमांना ‘इंटरव्ह्यू’मध्ये दिली.

भारताने चिनी सीमेवर आपली टेहाळणी करण्याची क्षमता रात्री आणि दिवसाच्या वेळेला मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. त्याकरिता इस्रायली बनावटीची ‘हेरॉन ड्रोन’ वापरली जात आहेत. हे ड्रोन ३० हजार फूट उंचीवरून उडते आणि २४ ते ३० तास एका वेळेला टेहळणी करू शकते.

‘इंडिपेंडंट एव्हिएशन ब्रिगेड’ तैनात

याशिवाय आकाशातून लक्ष ठेवण्याकरिता भारतीय सैन्याने एक ‘इंडिपेंडंट एव्हिएशन ब्रिगेड’ या भागांमध्ये तैनात केली आहे. त्याच्या मदतीने हेलिकॉप्टर, ड्रोन आणि इतर उडणार्‍या शस्त्रांना इथून ‘कंट्रोल’ केले जाते. त्यांच्याकडून मिळणारी माहितीही एकत्रित केली जाते. आपले अत्याधुनिक ‘लाईट हेलिकॉप्टर्स रुद्रा’सुद्धा या भागांमध्ये तैनात आहे. थोडक्यात, या भागांमध्ये रात्री आणि दिवसा चांगले लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळेच मागच्या आठवड्यात आपण घुसखोरी करणार्‍या २०० चिनी सैनिकांना पकडले होते.


भारतीय सैन्याकडे रडार आहेत, जी खराब हवामानाच्या वेळेलासुद्धा सीमेवर लक्ष ठेवू शकतात.


आज लडाख आणि अरुणाचल या दोन्ही सीमावर्ती भागात लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करून त्या दीर्घकाळपर्यंत तिथेच ठेवण्याची ताकद, तसेच सिमेवरील महत्त्वाच्या ठाण्यांवर ठाण मांडून बसण्याची हिंमत भारतीय सैन्यामध्ये आहे.
रस्ते मोठ्या प्रमाणात बांधण्यात आलेया भागांमध्ये रस्ते मोठ्या प्रमाणात बांधण्यात आले आहेत. आता सेला बोगद्याच्या मधून सामरिक दृष्टीने महत्त्वाच्या तवांगला वर्षातून बारा महिने जोडता येईल. पहिले बर्फ पडला की तवांग देशापासून तुटले जायचे. आता तसे होणार नाही. यामुळे या भागात सैन्याला आपण कधीही चांगल्याप्रकारची, सर्व प्रकारची मदत करू शकतो. या बोगद्यामधून सगळ्या प्रकारची शस्त्रे आणली जाऊ शकतात.सीमावर्ती भागांमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी गेल्या सात वर्षांत सरकारने आर्थिक बजेट वाढवले आहे. लडाख आणि अरुणाचल प्रदेश रेल्वे, रस्ता आणि हवाई अशा तीनही मार्गांनी उत्तमरित्या जोडले गेले आहेत. त्यामुळे चीनलाच आता भारतीय सैन्याच्या हालचालीकडे लक्ष द्यावे लागत आहे.

लष्कराच्या परिवर्तनाची दिशा, वेग ऐतिहासिक

चीन हाच मुख्य शत्रू हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून २०१४ पासून तीनही सैन्यदलांच्या शस्त्रखरेदीत तसेच सेना मजबुतीकरणात वाढ झाली आहे. लष्कर आणि हवाई दल यांच्यावर लक्ष केंद्रित करून पूर्वेकडील कमांडसाठी उपयुक्त ठरतील, अशा अतिरिक्त तुकड्यांपासून, युद्धसामग्रीपर्यंत सगळ्यात वाढ करण्यात आली, अति उंच भागात निष्णात असलेल्या जवानांच्या तुकड्या तयार करण्यात आल्या, दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि तोफा, ईडब्ल्यू युनिट्स, हवाई संरक्षण, एम ७७७ लाइट गन आणि अवघड व उंचावर असलेल्या ठिकाणांपर्यंत रसद पुरवण्यासाठीच्या अत्याधुनिक सुविधांची निर्मिती या सर्व गोष्टींवर भर देण्यात आला आहे.

भारतीय हवाई दलाकडे सी-१७ आणि सी-१३० ही अनुक्रमे सामरिक वहन आणि विशेष कामगिरी पार पाडण्यात सक्षम असलेली विमाने सुपूर्द करण्यात आली, तसेच लष्करी तुकड्यांची तातडीने ने-आण करण्यासाठी आणि लडाख, पूर्व भागातील पर्वतराजी असलेल्या ठिकाणांवर रसद पुरवठ्यासाठी चिनुक हेलिकॉप्टर्स नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर एएच-६४ ई हे बहुआयामी लढाऊ हेलिकॉप्टरही हवाई दलाच्या दिमतीला देण्यात आले आहे.


अलीकडेच राफेल लढाऊ विमानांची एक तुकडी हवाई दलात सामील झाली असून लवकरच दुसरी तुकडीही भारतात येणार आहे. रशियाशी झालेल्या करारानुसार यंदा एस-४०० ट्रायम्फ ही जमिनीवरून हवेत मारा करू शकणारी क्षेपणास्त्र यंत्रणाही हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहे. भारतीय लष्कराच्या परिवर्तनाची दिशा आणि वेग ऐतिहासिक आहे.

आक्रमक कोर पूर्णपणे तयार

याआधी भारत-चीन सीमेवर असलेले सैन्य हे केवळ सीमेची सुरक्षा करण्याकरिता होते. मात्र, चीनच्या आत जाऊन हल्ला करण्याची आपल्याकडे क्षमता नव्हती. आता लढाई झाल्यास चीनवर आक्रमण करण्याकरिता आपल्याकडे आक्रमक सैन्य उपलब्ध असेल.भारत-पाकिस्तान सीमेवर असलेली एक कोर आता चीनच्या विरुद्ध आक्रमक कोर म्हणून काम करेल. याशिवाय काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी अभियानामध्ये गुंतलेल्या सैनिकांना आता काढून लडाखमध्ये पाठवण्यात आले आहे.आता भारताची आक्रमक सतरा कोर चीनवर हल्ला करण्याकरता सज्ज झालेली आहे. यामुळे चीनला प्रत्युत्तर देण्याची क्षमता पुष्कळच वाढली आहे.


ईशान्य भारतामध्ये पुष्कळसे सैन्य तेथील बंडखोरी विरुद्ध कार्यरत असते. आता बंडखोरांवर नियंत्रण ठेवण्याचे काम पूर्णपणे आसाम रायफलला देण्यात आले आहे आणि भारतीय सैन्याला भारत-चीन सीमेवर लढाई करता तयार करण्यात येत आहे. यामुळे कुठलीही कठीण परिस्थिती उद्भवली, तरीही भारत स्वतःचे रक्षण करण्यास समर्थ राहील.याशिवाय ईशान्य भारतात दहशतवादी विरोधी अभियानामध्ये काम करणार्‍या आसाम रायफलला सुद्धा सैन्याच्या मदतीला पाठवले जाऊ शकते.चीन हा भारताचा क्रमांक एकचा शत्रू आहे. मात्र, काही तज्ज्ञांच्या सल्ल्याला बळी पडून भारताचे लक्ष भारत-पाकिस्तान सीमेवर केंद्रित असायचे. परंतु, आता ते भारत-चीन सीमेकडे वळविण्यात आलेले आहे. आगामी काळामध्ये भारत-चीन सीमावाद संपवण्याचा चीन कुठलाही प्रयत्न करणार नाही. त्यामुळे भारताला चीनविरोधात आपला पवित्रा अधिक आक्रमक करावा लागेल.


गेल्या काही महिन्यांत पद्धतशीरपणे भारताने चिनी सीमेवर तैनात असलेल्या दोन लाख सैनिकांची संख्या वाढवली आहे. त्यातच सीमेवर अजून ५० हजार सैनिक पाठवले आहेत. या सगळ्या भागातील सीमेवर सैन्य वाढवण्यात येत आहे. यामुळे चीनला घुसखोरी करणे कठीण होईल.





- (नि.) ब्रि. हेमंत महाजन




अग्रलेख
जरुर वाचा
गडचिरोलीत एक लाख झाडे तोडणार हे धादांत खोटे! , - वनविभागाचे स्पष्टीकरण; पर्यावरणाची हानी भरून काढण्याच्या अटीवरच लोहखनिज प्रकल्पाला परवानगी

गडचिरोलीत एक लाख झाडे तोडणार हे धादांत खोटे! , - वनविभागाचे स्पष्टीकरण; पर्यावरणाची हानी भरून काढण्याच्या अटीवरच लोहखनिज प्रकल्पाला परवानगी

गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथे लोहखनिज प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारे एकावेळी किंवा अनियंत्रित झाडांची कत्तल करण्यास परवानगी दिलेली नसून, पर्यावरणीय हानी कमी ठेवत टप्प्याटप्प्याने काम करण्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे. तसेच नवीन झाडे लावून होणारी हानी भरून काढण्यात येणार आहे, त्यामुळे ‘एक लाख झाडांची कत्तल’ ही माध्यमातून प्रसिद्ध होणारी माहिती वस्तुनिष्ठ बाबींवर आधारित नसून अतिरंजित आणि दिशाभूल करणारी असल्याचा खुलासा वनविभागाने केला आहे. ‘लॉई..

गडचिरोलीत एक लाख झाडे तोडणार हे धादांत खोटे! , - वनविभागाचे स्पष्टीकरण; पर्यावरणाची हानी भरून काढण्याच्या अटीवरच लोहखनिज प्रकल्पाला परवानगी

गडचिरोलीत एक लाख झाडे तोडणार हे धादांत खोटे! , - वनविभागाचे स्पष्टीकरण; पर्यावरणाची हानी भरून काढण्याच्या अटीवरच लोहखनिज प्रकल्पाला परवानगी

गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथे लोहखनिज प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारे एकावेळी किंवा अनियंत्रित झाडांची कत्तल करण्यास परवानगी दिलेली नसून, पर्यावरणीय हानी कमी ठेवत टप्प्याटप्प्याने काम करण्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे. तसेच नवीन झाडे लावून होणारी हानी भरून काढण्यात येणार आहे, त्यामुळे ‘एक लाख झाडांची कत्तल’ ही माध्यमातून प्रसिद्ध होणारी माहिती वस्तुनिष्ठ बाबींवर आधारित नसून अतिरंजित आणि दिशाभूल करणारी असल्याचा खुलासा वनविभागाने केला आहे. ‘लॉई..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121