
आ. भातखळकरांच्यावतीने कांदिवलीत कोरोना योद्ध्यांचा सत्कार
मुंबई, दि. २१ ऑक्टोबर (प्रतिनिधी): कोरोना महामारीविरुद्धच्या युद्धात भारताने मोठी कामगिरी साध्य केली असून आज लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा केवळ २७३ दिवसांत पार करून विश्वविक्रम केला आहे. या निमित्ताने भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या वतीने कांदिवली पूर्व येथील कामगार रुग्णालय लसीकरण केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात १०३ कोरोना योद्धे व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. ‘भारताने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार करत एक नवा इतिहास रचून जगभरात डंका वाजवली आहे, यातून ‘मोदी है तो मुमकिन है’ हे संपूर्ण जगाने पुन्हा एकदा अनुभवले असल्याचे मत आमदार अतुल भातखळकर यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी १०० फुगे आकाशात सोडत सर्वांनी हा सुवर्णक्षण साजरा केला.
कोरोनामुळे संपूर्ण जग भयभीत झाले असताना सुद्धा नरेंद्र मोदी यांनी आपली कार्यकुशलता दाखवत एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम केले, २ लाख कोटी रुपयांची गरीब कल्याण योजना जाहीर करून ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य देत उपाशी झोपण्याची वेळ येणार नाही असा सर्व भारतीयांना विश्वास देणे असो किंवा २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करत समाजातील प्रत्येक घटकाला कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी केलेली मदत असो, अत्यंत कमी काळात देशभर आरोग्य सुविधा उभारणे असो किंवा शास्त्रज्ञ व डॉक्टरांना आर्थिक व प्रशासकीय मदत देत केवळ ४ महिन्यांच्या काळात लस शोधणे असो, मोदीजींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशाला कोरोना महामारीतून सुखरूप बाहेर पाडण्याचे काम केले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत भारताची लस उत्पादन क्षमता २०० कोटी इतकी होणार आहे त्यामुळे भारतात संपूर्णपणे लसीकरण पूर्ण होण्यासोबतच जगातील १५० देशांना भारत लसींचा पुरवठा करणार असल्याचा विश्वास सुद्धा आ. भातखळकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यावेळी कामगार हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. नायर, डॉ. छेडा, नगरसेविका सुनिता यादव, भाजपा पदाधिकारी राणी द्विवेदी, आप्पा बेलवलकर, सुधीर शिंदे, नितिन चौहान, रवी विश्वकर्मा व अनेक ज्येष्ठ पत्रकार यांची प्रमुख उपस्थिती होती.